Monday, November 2, 2009

कडकलक्ष्मी

दिवस: लक्ष्मीपूजन(भारतात). अमेरिकेत ठाऊक नाही(किंवा काही फरक पडत नाही.)

वेळ: सकाळची(अमेरिकेतली)

उठल्या उठल्या सवयीप्रमाणे Gmail, Orkut आणि University चं email account check केलं. सकाळी उठल्या उठल्या ही accounts check करायची इतकी सवय झालीय ना, की कदाचित मी अन्न, हवा, पाणी आणि internet browser या गोष्टींशिवाय जगूच शकत नाही असं माझं मत व्हायला लागलंय..! ( अजून एक गोष्ट सापडली की ‘5 things I can’t live without’ असं Orkutवर टाकता येईल!)

माझ्या advisor चा mail आला होता. Research updates पाठवायला सांगितले होते. हा माणूस इतका का हात धुवून मागे लागतो, मला खरंच कळत नाही. दर आठवड्याला research updates घेऊन याच्याकडे जा. मग तो आपल्या आवडत्या लालबुंद शाईच्या पेनाने माझ्या research updates वर चित्र काढणार. स्वतःला डॉक्टर समजून अतिशय घाणेरड्या अक्षरात corrections लिहिणार (आता PhD म्हणजे तू Dr.आहेस ठीक आहे, पण उगाच 'खऱ्या'(!) डॉक्टरांसारखं अक्षर काढायची काय गरज आहे बाबा?!) आणि मी घरी येऊन त्याच्या अक्षराचा अर्थ लावत पुढील आठवड्याच्या research updates ची तयारी करणार हे अगदी ठरलेलं.. परवा तर मला स्वप्नं पडलं की माझ्या advisor च्या अंगात रक्त नाही तर ती लालबुंद शाईच वाहतीय! आणि आता तर त्याला पेनाचीही गरज नव्हती ! तो डाव्या हातात टाचणी घेऊन बसला होता. Correction द्यावीशी वाटली की तो ती टाचणी उजव्या हाताच्या तर्जनीला टोचे. मग एक रक्ताची(लाल शाईची) चिळकांडी उडे.. आणि मग त्या वाहणाऱ्या रक्तातून मला corrections मिळत होत्या. ती रक्ताळलेली research updates माझ्या डोळ्यासमोर नाचू लागली. एक रक्ताचा थेंब माझ्या अंगावर पडला आणि मी झोपेतून खाड्कन जागा झालो! पण ती लाल शाई आता सवयीची झालीय..मागे advisor ला एका conference ला जावं लागल्यामुळे आमची weekly meeting cancel झाली होती. त्या आठवड्यात इतकं चुकल्याचुकल्यासारखं झालं मला..वाटलं लाल पेन घेऊन स्वतःच रेघोट्या माराव्यात! मी खरंच राहू शकत नाही हो त्या लाल शाई शिवाय..(अरे! मिळाली की पाचवी गोष्ट!)

तर तो mail वाचून माझ्या advisor ला मी एक जबरदस्त शिवी हासडली. काल रात्री जागून केलेली homework assignment तशीच गादीवर पडली होती. ती उचलून दप्तरात ठेवली आणि चहा करायला म्हणून उठलो.

हल्ली चहा पावडर थोडी जास्त टाकून चहा थोडा कडक प्यायला लागलोय आम्ही. कारण त्याशिवाय चहा प्यायल्यासारखा वाटतच नाही.तर तो उकळता कडक चहा पीत आम्ही तिघं room-mates नी dining table वर रोजचा कट्टा टाकला!

चहाचा पहिला गरम गरम घोट घशाखाली उतरवला की आम्ही रोज चावून चावून चोथा झालेल्या विषयांचा रवंथ करायला लागतो. विषयाची सुरुवात होते current job scene पासून.. Recession हा किती hopeless प्रकार आहे आणि आपणच बरोब्बर कसे त्याच्या कात्रीत सापडलो..Obama च्या Policies किती बरोबर किती चुकीच्या?(होय, आणि Peace Prize?!!) मग तिथून अफगाणिस्तान..तालिबान..How to fight terrorism?.. अमेरिका किती गेमाड आहे आणि पाकिस्तान, चीन आपल्या देशाचे कसे लचके तोडतायत..बांगलादेशची घुसखोरी, देशातली गरिबी, देशाला लागलेली कीड..इथून पुन्हा फिरून PhD करावी का? खरंच आहे का interest? पैशासाठी किती मनाविरुद्ध वागायचं आणि शेवटी मनाला नक्की काय हवं असतं हे आपल्याला कितपत कळतं..? आणि जरी कळलं तरी ते किती valid असतं? म्हणजे मन हा frame of reference थोडीच आहे? अगदी लहान मुलासारखे हट्ट करणाऱ्या मनाला कितपत भाव द्यावा?! असे International Politics, Economics ते Personal Finance आणि मग Psychology आणि Philosophy वर येऊन सकाळचे विषय संपतात.

पण आज हे विषय चावायची कुणाचीच इच्छा नव्हती. याला कारण की कदाचित भारतात दिवाळी चालू होती आणि biological clock नुसार आमच्या मनातही कुठेतरी..एक मित्र म्हणाला, "वाह! चहा आज चांगलाच कडक झालाय.." आणि त्याचवेळी "अरे, आत्ता लक्ष्मीपूजन चालू असेल ना Indiaत?" असं दुसऱ्याने म्हटलं. त्यावर मी म्हणालो," कडक चहा पीता पीता लक्ष्मीपूजन करणं काय किंवा साधा चहा पीता पीता कडकलक्ष्मीचं पूजन करणं काय, सारखंच ना!" ह्या अतिशय पांचट jokeवर आम्ही तिघं मनापासून हसतानाच माझ्या मनावर कडकलक्ष्मीच्या आसुडाचा एक जोरदार चपराक बसला.. ढोलक्याचा तो तालबद्ध आवाज आणि त्यावर वाजणारी ती घुंघरं.. अधूनमधून कडाडणाऱ्या फटक्यांचे आवाज कानी पडू लागले ...आणि या सगळ्यानी मला काही वर्षे मागे नेऊन सोडलं..

दिवस: लहानपणचा..तारीख, साल..काहीच आठवत नाही..

वेळ: तिही आठवत नाही.

साताऱ्याचं जुनं घर.. समोर अंगणात पडलेला उंबरांचा सडा...घरामागे तूतूच्या झाडाला लाल, गुलाबी, काळे तूतूंचे घोस लगडलेले..शेजारी रिठ्याचं स्थितप्रज्ञ झाड..खाली पडलेल्या रिठ्यांवर गुंजांसारखे केशरीधमक किडे.. मागच्या दाराशी ठेवलेला तो मोठ्ठा बंब..त्यात खाली काही अर्धवट जळलेली लाकडं आणि जळलेल्या लाकडांची मऊ राख..फिक्कट हिरव्या रंगाची दारं आणि त्याच रंगाच्या लोखंडी गजाच्या खिडक्या.. खिडकीवर कोनाडे, त्याच्या बाजूला लाकडी खुंटी आणि त्यावर आजोबांचा पांढराशुभ्र सदरा...माझं अख्खं बालपण या घरी गेलं. घराच्या एका बाजूला बोळ होता.(जो बहुतेक आजीशी तासनतास cricket खेळायलाच बांधला होता) घराच्या दुसऱ्या बाजूला एक शेत होतं. त्या शेतात 'अळूच्या पानांवरचा दवबिंदू म्हणजे काय?', 'धुकं कशाला म्हणातात?','बुजगावणं कसं असतं आणि ते कशासाठी वापरतात?' आणि 'काजवा हा नक्की काय प्रकार असतो?' याची प्रात्यक्षिकासहित उत्तरं देणाऱ्या निसर्गमास्तरांची २४ तास शाळा भरलेली असायची..

सकाळी उठून आवरून आजोबांबरोबर फिरायला जायचं. येताना चण्याफुटाण्याच्या दुकानातून एक पुडी आणि एखादा फुगा घेऊन घरी यायचं. मग आजी मला भरवणार. भरवताना एक गोष्ट. दुपारी झोपवताना दुसरी गोष्ट. मग उठल्या उठल्या मी मामाबरोबर त्याच्या कंपनीचं काम करायला बसणार. त्याच्या कंपनीचं सगळं काम मला कसं करता येतं हे मी सगळ्यांना पटवून देणार. मग तो सुद्धा," अरे, या कागदावर मला आजचे reports लिहून दे ना, नाहीतर आपला boss आपल्याला रागवेल!" आणि मी ‘Don’t Worry’ च्या सुरात त्याचं काम झट्दिशी करून देणार.. संध्याकाळी आई आली की बागेत एखादी चक्कर. येताना कोपऱ्यावरच्या पिंपळाच्या झाडाखाली जणू माझीच वाट बघत थांबलेला तो आईस्क्रीमवाला आणि शनिवारी पपा आले की त्यांच्याबरोबर दंगामस्ती..

एकदा असाच आईस्क्रीम खात खात आईबरोबर येत असताना तो चाबकाचा कडकडीत आवाज फाड्कन कानी पडला..पहिल्यांदाच..तोच ढोलक्याचा तालबद्ध आवाज..घुंगरांचा आवाज..ते उग्र वातावरण..आणि त्या कडकलक्ष्मीचं ते भयानक रूप मी पहिल्यांदा पाहिलं..आईचा हात मी घट्ट धरून ठेवला होता आणि कावराबावरा होऊन रडत होतो. दुसऱ्या हातातलं आईस्क्रीम कधीच खाली पडलं होतं. आयुष्य 'कडक' असतं (Life is tough) ची ती पहिली चाहूल..ती पहिली प्रचीती..

चहाचा जिभेला चटका बसला आणि मी भानावर आलो. पण अगदी क्षणभरासाठीच. तेवढ्यात आसुडाचा दुसरा चपराक बसला. आणि 'झपाटलेला' सिनेमातलं ते बाहुलं आठवलं. तो शेवटचा scene आठवला जेव्हा ते बाहुलं लक्ष्याला म्हणतं, 'मला तुला मारायचं. मला तुझ्या शरीराचा ताबा घ्यायचाय..' आसुडाच्या तिसऱ्या फटक्यासरशी शाळेत असताना पाहिलेला कठपुतळ्यांचा खेळ आठवला..ज्यात त्या बाहुल्यांना स्वतःच्या इच्छेविरुद्ध, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. त्याच्या तालावर नाचावं लागतं..मी त्यातलाच एक बाहुला होतो का? माझ्या हातापायाला दोऱ्या बांधल्या होत्या. माझा स्वतःवर ताबाच नव्हता. वरून दोरी हलली की मला मनाविरुद्ध हालचाल करावी लागे. जगाचं रहस्य मानतात अशा ‘String Theory’ चा आणि कठपुतळ्यांच्या दोऱ्यांचा काही संबंध तर नसेल..अशी उगाच शंका मनाला स्पर्श करून गेली..घराच्या बाजूचं ते शेत आठवलं. निसर्गमास्तर डोळे वटारून मला सांगत होते," आता कळलं, बुजगावणं म्हणजे नक्की काय ते.."

मित्राने भानावर आणलं आणि उशीर होईल म्हणून दोघं निघून गेले. आसुडाचा चवथा फटका बसला. आता मी लाकुडतोड्या होतो. माझी कुऱ्हाड विहिरीत पडली होती. पण विहिरीतून प्रश्न विचारायला कोणी वरच येत नव्हतं. मला खरंच प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं होतं हो..अगदी खरं..

काहीवेळाने भानावर आलो. तळहाताकडे लक्ष गेलं. त्या नशीबाच्या रेषांच्या जाळ्यात अडकलेला मी कोळी होतो..मला ते जाळं पुन्हा बांधायचं होतं..अगदी नव्याने..अगदी मनासारखं..पण खूप उशीर झाला होता.माझ्या आधी नियतीनेच ते जाळं बांधलं होतं. तिने माझ्या पायाखाली चिकट डिंक लावला होता..आणि मला आव्हान देत होती..लढण्याचं..जिंकण्याचं..

अशावेळी सणकून इच्छा झाली 'कडकलक्ष्मी' अंगात भिनवायची. मला तो पोतराज व्हावसं वाटलं. भालावर लाल गंध फासून स्वतःला चाबकाचे फटके मारावेसे वाटले..कारण त्या प्रत्येक फटक्याने मला जाग येणार होती..मेंदूला लागलेली जळमटं आणि मतीला आलेली गुंगी प्रत्येक फटक्यासरशी नाहीशी होणार होती..विवेकबुद्धी जागृत करणारे होते ते फटके..स्वतःची स्वतःला ओळख करून देणारे होते..प्रवाहाच्या विरुद्ध जायची ताकद देणारे होते..मला गर्वगीत गाणारा तो कोलंबस बनवणारे होते..

मी हात जोडले..आरती म्हणली..

'आलीया मरीबाई तिचा कळेना अनुभऊ

भल्याभल्यांचा घेती जीव| आलीया मरीबाई

आलीया मरीबाई हा का सुटला तुझा वारा

दुनिया कापते थरथर आलीया मरीआई|'

आणि लक्ष्मीपूजन पूर्ण झालं...

Saturday, August 29, 2009

असं असावं जगणं...


निळ्याशार समुद्रात मनमुराद डुंबावं,

सहस्त्रश्मीची ऊबदार किरणं अलगद अंगावर घ्यावीत,

मनसोक्त शंख शिंपले वेचता वेचता,

एखाद्या पेटीत अचानक मोती सापडणं...

असं असावं जगणं!


बागेत एकटच बसावं निवांत स्वप्न रंगवत,

एखादं फुलपाखरू अलगद हातावर येऊन बसावं,

नकळत मूठ मिटताना आपलं तिकडे लक्ष जावं,

त्याच क्षणी फुलपाखराचं आपल्याकडे बघून विश्वासाने हसणं

असं असावं जगणं!


दऱ्याखोऱ्यात, निसर्गाच्या सान्निध्यात मन रमवायला जावे,

तिथे अचानक काही मोर फिरताना दिसावे,

पावसालाही अचानक अवसान यावे,

त्या फुललेल्या पिसाऱ्याच्या सौंदर्याने डोळ्याचं फिटलेलं पारणं...

असं असावं जगणं!


चांदण्यारात्री तिच्याबरोबर आकाशातले कोटीकण बघत बसावे,

तिचा हात हातात धरून आयुष्यावर बोलत राहावे,

दोघांनी भावी जीवनाची स्वप्ने रंगवतानाच

एखाद्या उल्केचं निखळून पडणं...

असं असावं जगणं!


आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करणं,

कोणाचाचं वियोग सहन होणार नाही असं जाणवणं,

सर्वात आधी मला वर घे असं देवाला विनवणं,

आणि यमराजाने लगेच हसून मान डोलावणं...

असं असावं जगणं!


Monday, August 24, 2009

'त' ची भाषा

" आई, मी तुला कसा झालो गं? बाळ कसं जन्माला येतं? म्हणजे ते असं आईच्या पोटात जातं कुठून?!" छोट्या विनयने आईला एका दमात असे सगळे प्रश्न विचारले. तो आता दादा होणार होता ना...! त्यावर, "विनू, अरे 'ते' तुला तू मोठा झाल्यावर कळेल हं.." असं साधं, सोप्प उत्तर आईने त्याला दिलं. त्यामुळे विनू गोंधळायचा तो गोंधळलाच आणि तिथूनच सुरुवात झाली '' च्या भाषेला..!

"अहो, केबल घेताय, ठीक आहे. पण ते 'तसले' channels block करा. लहान मुलांना नसते अक्कल, बसतात बघत आणि वाईट परिणाम होतात मग मनावर.." असं म्हणून विनूच्या आईने त्याच्या बाबांना 'तसले' channels block करायला लावले. खरं म्हणजे बाबांनाही 'तसलं' काही आता बघायला मिळणार नव्हतं! आईने एकाच दगडात दोन पक्षी मारले होते!

विनय आता मोठा झाला होता. फुल पँट घालून हायस्कूलला जायला लागला होता. मित्रांकडून त्याला आता 'तसलं' knowledge मिळत होतं... 'तसल्या' गप्पा, 'तसले' jokes हा त्याच्या group मधे बोलण्याचा मुख्य विषय असे. मिळालेलं knowledge एकमेकांना देऊन सगळेच 'सुशिक्षीत' होत होते... ज्ञानाचे दीप पेटवून आता सबंध group 'उजळला' होता. 'ते' ज्ञान वाटता वाटता 'एकमेकां साहाय्य करु, अवघे धरु सुपंथ' चा प्रत्यय त्यांच्या group मधल्या प्रत्येक विनयला येत होता. वी मधे ती 'तसली' CD पाहिली, 'तसल्या' websites बद्दल त्याला कळलं आणि मंडळी आता चांगलीच ज्ञानी झाली होती...!

इथे आई बाबानां म्हणाली, "अहो, विनय आता मोठा झालाय, त्याला आपणं 'त्या' बद्दल काही सांगणं अपेक्षित आहे का? उगाच बाहेर चूकीचं काहीतरी शिकून यायचा आणि हल्लीची पिढी तर घसरडे बूट घालूनच जन्माला आलीय! कधी पाय घसरेल सांगता येत नाही...!" त्यावर बाबांचं असं म्हणणं होतं की मुलगे त्यांचे ते शिकतात आणि त्याला काही प्रश्न असतील, तर तो स्वत: मला येऊन विचारेल की! मी खूप friendly आहे त्याच्याशी...विनयचं मात्र मत होतं की आपले आई-बाबा खूप सज्जन आहेत आणि आपण त्यांच्यापेक्षा जास्त 'पोहचलेलो' आहोत..!!

पण एके दिवशी जेवताना आईने बाबांना खूण केली आणि बाबा धीर एकवटून म्हणाले, ."विनय, जरा बोलायचंय तुझ्याशी..तुझा अभ्यास वगैरे व्यवस्थित चाललायं ना? काही problem वगैरे नाही ना? हं, म्हणजे एवढे चांगले marks पडतायत म्हणजे चांगलाच चालला असेल! Good, good! Keep it up! लढत राहा. खूप मोठी स्वप्न बघ...तीव्र इछाशक्ती ठेव आणि ती स्वप्न पूर्ण करायच्या मागे लाग..!!" Friendly म्हणवणारे बाबा पूर्णपणे भरकटले होते...आईने आलेलं हसू दाबलं होतं..विनयला काहीच कळत नसल्याचं पहून आई म्हणाली, " हे बघ विनय, तुझं हे आत्ताचं वय आहे ना, ते थोडसं वेडं असतं. ह्याला कुमारावस्था म्हणतात. या वयात शरीरात आणि मनात बदल होत असतात..." गाडी नेमकी कुठं चाललीय हे ज्ञानी विनयला लगेच समजलं आणि घाईत असल्याचं काहीतरी कारण सांगून तो तिथून सटकला!

विनयची आता १२वी झाली होती आणि त्याचा धाकटा भाऊ, सुशील, ६वीत गेला होता. विनय एकदा आईला म्हणाला, "आई,तू घरी असतेस ना, तर सुशीलवर जरा लक्ष ठेवत जा. परवा रात्री तो M TV बघत बसला होता. त्याला सांग ते 'तसलं' काहीतरी बघण्यापेक्षा अभ्यास कर म्हणावं! लहान आहे अजून तो आई...!" मोठ्या विनयची जबाबदारीची भाषा ऐकून आईला खूप कौतुक वाटत होतं आणि विनयही आता '' ची भाषा बोलत असल्याचं पाहून आईला वाटलं, आता खरा मोठा झाला आपला मुलगा..!

मधे बरीच वर्षे गेली. विनयचं लग्न झालं. त्यालाही आता वर्ष होतील. विनय एव्हाना अस्ख्लितपणे त्याच्या बायकोशी ''ची भाषा बोलू लागला होता..! एकदा असच विचार करताना विनयच्या लक्ष्यात आलं...की Sex Educationहे फक्त science नसतं. म्हणजे जरी ते पूर्णपणे scientific असलं तरी त्याच्याबरोबर एक language compulsory असते... '' ची language! तुम्हाला यात elective नसतो.दोन्हीवर अगदी प्रभुत्व हवं तुमचं. नाहीतर काही खरं नाही! '' ची भाषा घरी शिकवली जाते. पण science साठी मात्र मित्रांचे coaching classes लावावेच लागतात! हल्ली coaching classes ना कुठे पर्याय आहे?!

विनयने त्याच्या मुलीचं नाव ठेवलं नम्रता..हे नाव आजी-आजोबांना खूप आवडलं. 'विनय' आणि 'सुशील' च्या decent league मधे 'नम्रता' हे नाव आलं होतं..! त्या दिवशी बारशाला एका सुसंस्कारित मराठी कुटुंबात, आपल्या घराण्याचा सज्जनतेचा वारसा जपल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर होता...

Monday, August 17, 2009

जोशीकाकू

आमच्या समोर जोशीकाकू राहायच्या. अगदी चिंटूच्या जोशीकाकूंसारख्याच होत्या त्या. 'दुपारी १-४ खेळायचं नाही, झोपायची वेळ असते ती..!', 'जरा आरडाओरडा कमी करा की रे!', 'थांब हं,आईलाचं नाव सांगते तुझ्या आता!' किंवा 'छ्ळीक कारटी आहेत एकजात!' ही त्यांची ठरलेली वाक्यं!! ही वाक्यं इतक्या नित्यनेमाने आमच्या कानी पडायची की ती अक्षरश: आमच्या मेंदूत रूतून बसली आहेत! अगदी त्याच आवाजात, त्याच diction मधे, तीच वाक्यं आम्ही सगळेजणं आजही आठवू शकतो!

मधला काळ फारसा आठवत नाही, पण मोठं झाल्यावर आम्हा सगळ्यांचंच त्यांना भारी कौतुक होतं. १२वी ला छान मार्क पडले आणि Engineering ला admission मिळाल्याचा आई-बाबांएवढाच त्यांनाही आनंद झाला होता. त्या नेहमी building च्या कट्ट्यावर मैत्रिणिंशी गप्पा मारत बसायच्या आणि भेटल्या की की नेहमी विचारपूस करायच्या.

एक दिवस अचानक Heart Attack ने त्या वारल्या. Shock बसला आम्हाला. वाईटही वाटलं, पण खूप दु:ख झाल्याचं काही आठवत नाही. आमच्या routine चा आणि जोशीकाकूंचा तसा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे routine हे नेहमीसारखंच चालू राहिलं आणि हळू हळू त्या जोशीकाकूंना आम्ही विसरलो...खूप वर्ष झाली आता जोशीकाकूंना जाऊन.

परवा दुपारी भर उन्हात खेळताना भांडणारी मुलं दिसली आणि अगदी जोशीकाकूंसारखंच रागावलो मी त्यांना! तीच वाक्यं, तेच diction (आवाज फक्त पुरुषी होता!). आणि खूप वर्षांनी त्यांची आठवण झाली.. मधे अशाच एका कारणाने शाळेतला मित्र आठवला ज्याच्याशी मी कडाडून भांडलो होतो आणि त्या दिवसापासून आजतागायत मी त्याच्याशी एकदाही बोललेलो नाहीये.. त्या शाळेतल्या बाई आठवल्या, ज्यांना मुळीच शिकवता यायचं नाही, आम्ही नेहमी झोपायचो त्यांच्या तासाला, पण त्या अगदी न कंटाळता शिकवायच्या (शिकवण्याचा प्रयत्न तरी करायच्या!). आणि मधेच एकदा आठवण झाली होती आमच्या ब्रम्हकमळाच्या झाडाची, ज्यानी फक्त एकदाच फुलं दिली होती..

खरं म्हणजे खूप लांब आहे मी या सगळ्यांपासून. यातली कुठलीच व्यक्ती किंवा गोष्ट आज माझ्या आयुष्यात नाहीये. आज मी प्रगतीच्या वाटेवर आहे. जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘Survival of the fittest’ या नियमाचं अगदी काटेकोरपणे पालन करून रोज लढतोय..आणि इतकं भान हरपून लढतोय की या जगण्याच्या संग्रामात कुठेतरी हरवून गेलोय मी..मलाही मी दिसेनासा झालोय खरं म्हणजे!

पण एखाद्या बेसावध क्षणी आठवणींची कुपी उघडते आणि माझ्या आयुष्यात ज्यांचं अस्तित्वच उरलं नाहीये अशी लोकं मला भेटतात… जाताना प्रत्येक जण माझ्या मनगटावर एक वेगळंच अत्तर लावून जातो आणि अगदी काही क्षणांसाठीच स्पर्धेच्या रणभूमीत हरवलेला मी मला दिसतो.. पण काही क्षणातचं मी पुन्हा हरवलेला असतो… काहीतरी काम आठवतं म्हणून मी खोलीबाहेर पडतो..पण पुढचे काही तास त्या खोलीत सुगंध दरवळत असतो आणि जोशीकाकू आम्हाला कुठेतरी ओरडत असतात..त्याच आवाजात...त्याच diction मधे...

Wednesday, January 21, 2009

आपल्यालाही गरज आहे?

मी सद्ध्या बर्फात राहतोय..! त्यामुळे हे दृश्य आता रोजचं झालयं.. ह्याला  icicles म्हणतात. Gravity मुळे पाण्याचा ओघोळ खाली पडताना, थंड हवेमुळे त्याचं solidificationही होत असतं. 

एक प्रकारची चढाओढंच सुरू असते.. दुष्ट  gravity खाली खेचत असते आणि ते बर्फाचे स्फटिक पूर्ण शक्तीनिशी एकमेकांना बिलगुन असतात! शेवटी ice crystals जिंकतात आणि सुंदर icicles तयार होतात!

आता ह्याला एकीचं बळ म्हणावं का एकमेकांमधलं प्रेम म्हणावं…! काही म्हणा, जिंकले खरे गडी!

आज आपल्यालाही गरज आहे का? Economic recession, terrorist attacks किंवा corruptionमुळे जेव्हा आपण 'Life SUCKS' म्हणतो, तेव्हा कदाचित आपल्यालाही गरज आहे निसर्गाकडून काहीतरी शिकायची.. गरज आहे एकीच्या बळाची,  गरज आहे आपापसातील द्वेष विसरुन प्रेम करायचीगरज आहे जिंकायची... 

Tuesday, January 20, 2009

विशेष..


काल उगवलेला सूर्य, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या पहिल्या किरणासारखाच…!

 

काल पडलेला पाऊस, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या पहिल्या सरीसारखाच…!

 

काल त्या पावसात नाचलेला मोर, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या सर्वात सुंदर पिसासारखाच…!

 

काल पडलेलं चांदणं, काहीतरी विशेष होतं,

अगदी शुक्रताऱ्यासारखंच…!

 

पण काल भेटलेली तू, अगदी तश्शीच होतीस!

कारण तुला भेटणं हेच विशेष असतं.. अगदी तुझ्या अस्तित्वासारखंच...

Sunday, January 18, 2009

मी (न) माझा..



आई-आज्जीच्या संस्कारात न्हाताना पाण्यासारखा स्वच्छ होतो मी,

अगदी पारदर्शक आणि शुद्ध असल्याचं आठवतयं मला..

 

मग अल्लडतेच्या लाल आणि मैत्रिच्या पिवळ्या रंगाच्या डोहात उडी मारली मी!

आणि त्या केशरी तेजात मिरवत मिरवतच शाळेतू बाहेर आलो..

 

आता तरुणाईच्या रसरसत्या हिरव्याने तर थेट राजाचं करून टाकलं होतं मला..

'आई बाबांना काही कळत नव्हतं', 'जग खूप सुंदर होतं', आणि मी होतो राजा!

 

मधेच काहीतरी टोचल्यासारखं झालं, पाहिलं तर मला बाण लागला होता! प्रेमाचा गुलाबी रंग प्रवेश करत होता..

पाऊस अचानक आवडायला लागला होता आणि 'हृदय' नावाच्या अवयवाचं 'खरं' कार्य  कळायला लागलं होतं...

 

यशाचा निळा मग खुणावू लागला  पडलो, धडपडलो, अगदी नेटाने लढलो आणि जिंकलोही..

आकाशातला नीलमणी मिळवला होता मी आणि तहान भागवली होती सागराच्या निळाईने..

 

कसा कोण जाणे पण Pandora's Box उघडला गेला आणि वेड लागलं त्या पैशाच्या सोनेरी रंगाचं...

त्या आवडत्या सोनेरी रंगाच्या मागे धावता धावता अंगात शिरला अहंकाराचा, द्वेशाचा आणि  स्वार्थाचा तपकिरी रंग..

 

मग अशाच एका दु:खी क्षणी मनाच्या आरशात डोकावलो, तर काही दिसलंच नाही..तशी रात्र होती तेव्हा..

पण सकाळी परत बघितल्यावर कळलं, रात्रीचा दोश नव्हता..माझाचं रंग काळा झाला होता...

सगळे रंग एकमेकांत मिसळून भीषण झाला होता रंग माझा..

 

 ठेच लागली, डोळे उघडले आणि आज मी पांढरा  रंग भरायला सुरुवात केलीय.. समाधानाचा, शांतीचा,प्रेमाचा...

पण त्यामुळे आज माझा रंग करडा आहे.. Grey cells बरोबरच Grey Mentality घेऊन जगतोय मी आज..

 

कधी पूर्ण पांढरा होईन का ते ठाऊक नाही....कदाचित पांढरं कापड चढल्यावरच..

पण एक गोष्ट मात्र खरी आहे..

 

बदलत्या जगाबरोबर मीही बदलत गेलो,

भेटणाऱ्या लोकांबरोबर त्यांच्यासारखाच होत गेलो...

आज...

मी माझा राहिलो..मी माझा राहिलो...