Sunday, September 26, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग ६

~~~~~~~~~~~~~~~~
पतंग माझ्या स्वप्नांचा
मुक्त आकाशी बागडतोय
वर्तमानाचा काचेरी मांजा
मात्र रोज हात सोलवतोय
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
शून्यातून आलेले आपण
शून्याकडेच जाणार असतो
मधले कोटी श्वास संपताना
तो 'आर्यभट्ट' वरून हसतो
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
जळावं तर मेणासारखं
वातीबरोबर वातीसाठी
आधार द्यावा वातीसारखा
मेणामध्ये मेणासाठी
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
गहिरे होते आकाश
सांजवेळी संधीप्रकाशी
विरक्तीचा ध्यास उरी
मन मात्र होतं उपाशी
~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, September 9, 2010

आणि आम्ही Engineer होत आलो...

(हा लेख मी Engineering च्या शेवटच्या वर्षात, अगदी वर्ष सरत आलं असताना, 'Engineer' होऊ घातलो असताना लिहिला होता!)


Engineer काय किंवा Doctor काय, या आपल्या भारतातल्या एक प्रकारच्या जमातीच आहेत..! अशा जमाती, ज्यांच्या वाटयाला फक्त कौतुकच यायचं.. पण आता या जमातींची लोकसंख्या एवढी वाढलीय, की जमातीतल्या लोकांचा अभिमान सोडाच, पण जमातीबाहेरच्या लोकांनाही याचे अप्रूप वाटेनासं झालंय! म्हणजे पूर्वी, ‘माझा मुलगा Engineering करतोय..’ ही एकच बाब कॉलर ताठ करायला पुरेशी होती. पण आता, पुढे तो M.Tech करणार आहे, MBA करणार आहे का MS?... यावर ते सगळं अवलंबून आहे!

‘Engineer’ हा शब्दच मोठा विचित्र वाटतो मला! याची संधी सोडवायला जावं, तर Engineचं ज्ञान असणारा किंवा Engine तयार करणारा तो Engineer अशी होते. पण असं जर असेल तर Civil , Metallurgy किंवा IT मधल्या लोकांना Engineers का म्हणावं असा प्रश्न पडतो! कारण, आम्ही Mech, Prod ची लोकंच Engine बद्दल शिकत असतो (असा समज तरी आहे!). हे जरा विविध धर्मांना समान स्थान असून भारताला ‘हिंदू’स्तान म्हटल्यासारखं झालं! एकात्मता वाढावी, ‘मी एक भारतीय आहे..’ सारखं ‘मी एक Engineer आहे..’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी, या कारणाने ते ‘Engineer’ असं नाव ठेवलं गेलं असावं (इथे ‘नामकरण करणं’ असा अर्थ अपेक्षित आहे, ‘नाव ठेवणं’ नाही!). पूर्वजांचा हेतू चांगलाच असावा.. पण Mechanical पासून Production, Computer पासून IT किंवा Electronics पासून Instrumentation सारख्या branches उदयाला आल्याचे पाहता झारखंड, उत्तरांचलची आठवण आल्याखेरीज राहत नाही!

आम्ही अगदी ‘खरे’ Engineers असलो तरी आम्हा Mechanical, Production वाल्यांना तरी ४ वर्षात Engine ची ओळख कुठे होते सगळी! एका Viva ला आम्हाला विचारलं होतं, ‘4-Stroke, Single Cylinder Engine ला Rocker Arm किती असतात?’ आता ‘Rocker Arm’ हा शब्द मी कधी जन्माच्या कर्मात ऐकला नव्हता! मग विचार केला की उत्तर तयार करूयात! ‘उत्तरं येत नसतील तरी ती तयार करता आली पाहिजेत!’ हे प्रत्येक Engineer न शिकवताच शिकलेला असतो! असा विचार करून मी Engine डोळ्यासमोर आणलं. तरी मला कुठे ते Rocker Arms बघितल्यासारखे वाटत नव्हते. त्या ऐवजी तो WWF चा ‘Rock’ आणि त्याचा तो पिळदार दंडच ‘Rocker Arm’ म्हटल्यावर डोळ्यासमोर यायला लागला! आणि मी तसाच मक्खासारखा चेहेरा करून बसलो..! खरंतर Engineering Viva म्हणजे प्रत्येक Engineer च्या आयुष्यातला एक रोमहर्षक अनुभव! त्या २०-२५ मिनटात एका वेगळ्याच विश्वाची सैर घडू येते! जणू एक नाटकंच चालू असतं! त्या नाटकात External Examiner इनिस्पेक्टर ची भूमिका (इन्स्पेक्टर नाही!), Internal Examiner पांडू हवालदाराची आणि विद्यार्थी आरोपीची भूमिका करत असतो! त्या पांडू हवालदाराला आनंद झालेलं असतो की आपण आरोपीला पकडून साहेबांसमोर उभं केलंय.. इनिसपेक्टर त्याला खोदून खोदून प्रश्न विचारात असतो आणि आरोपी मान खाली घालून त्याचे सगळे आरोप कबुल करत असतो. शेवटी ‘मला काहीही येत नाही, मी बिनडोक आहे!’ असं कबुल केल्यावर इनिसपेक्टर आणि पांडू हसतात आणि मगच त्या आरोपीची सुटका होते! पण मुलगी जेव्हा आरोपी असते, तेव्हा चित्र अगदी वेगळं असतं! ती गोड बोलून अशी काही जादू करते की इनिसपेक्टर आणि पांडू त्यांचे dialogues विसरतात आणि तिला पोतंभर मार्क देऊन टाकतात! आपल्याला शेंडी लावली गेलीय हे त्या बिचार्यांच्या ध्यानीही नसतं...! मुलींना असे आरामात मार्क मिळतात आणि आपल्याला इतका त्रास सहन करावा लागतो, याची माझ्या एका मित्राला एवढी चीड होती की एक दिवस मुलीच्या वेशात viva ला जायचं, असं त्याने ठरवलं होतं! आमच्याकडे viva घ्यायची एक विशिष्ठ पद्धत आहे. एका वेळी तिघांना बसवतात. एकच प्रश्न एका पाठोपाठ एक असा तिघांना विचारला जातो. अशात जर कोणी तिसरा असेल, तर त्याच्यासारखा बिचारा तोच! आधीच्या दोघांनी एकाच प्रश्नाची दोन संपूर्ण वेगळी उत्तरे दिलेली असतात आणि या बिचाऱ्या तिसऱ्याला दोन्ही उत्तरं बरोबर वाटत असतात..! अशावेळी External Examiner पटकन कृष्णाच्या भूमिकेत शिरतो आणि, “तुला माझं लक्षावधी सैन्य हवंय का मी स्वतः!” असं विचारून त्या बिचाऱ्या तिसऱ्याची अवस्था दुर्योधानासारखी करून टाकतो! त्यामुळे ‘जग’ ही रंगभूमी आहे की नाही ठाऊक नाही, पण Engineering आणि मुख्यत्वे ‘Engineering Viva’ ही नक्की एक रंगभूमी आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलोय आता!

‘Submissions’ हा असाच एक अजब प्रकार! नुसतं हात तुटेपर्यंत लिहायचं. इकडचं तिकडे उतरवायचं आणि Journals पूर्ण करायची ही त्याची थोडक्यात व्याख्या! पण मग हे असं का करायचं असतं याचं उत्तर कधीच कोणाकडे नसतं. Syllabus मधे सांगितलंय, त्यामुळे पास व्हायचं असेल तर ते करायचं, एवढयाच विचाराने प्रत्येक वर्षी पोथ्या भरवल्या जातात. ह्यातून आणि काहीच मिळत नसतं. कृष्णाने गीतेत म्हटलेच आहे, “कर्म करत रहा, फळाची अपेक्षा धरू नका.” आणि आम्ही सगळे Engineers तेव्हा गीता जगत असतो. गेली ४ वर्षे मीसुद्धा नुसता इकडचं तिकडे उतरवतोय.. त्या दिनानाथाची गीता जगतोय..!

ह्या सगळ्या प्रकारामुळे मला एक दिवस खूप गंभीर प्रश्न पडला होता, की ‘आपण Engineer आहोत का Technical कारकून?!’ मला खात्री आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या प्रत्येक होतकरू Engineerला एकदातरी पडला असणार! पण image आणि ego जपायचा म्हणून प्रत्येकच जण हा टोचणारा काटा हृदयाच्या मखमली पेटीत बंद करून अस्वस्थता अनुभवत असतो.. हे एकमेकांना कधीच सांगितलं जात नाही. दोन Engineers मधलं हे mutual understanding असतं..!

असंच एक न उलगडलेलं कोडं म्हणजे Engineering चे Professors! ‘तुम्ही एकवेळ काहीही शिकवलं नाहीत तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना त्रास देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे!’ असंच त्यांच्या मनावर जणू बिंबवलं असतं! कदाचित ‘Engineering हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. पदोपदी नरकयातना भोगाव्याच लागतात, तरच सिद्धी प्राप्त होते!’ हे सांगण्यासाठीच हा सगळा प्रयत्न असतो! बाहेर हा माणूस अगदी तुमच्या आमच्यासारखाच असतो. पण कॉलेजमधे आल्यावर तो अचानक बदलून जातो! बाहेर रस्त्यात कधी कुठल्या शिक्षकाने आपल्याकडे बघून मंद स्मित केले (Smile दिली!), तर, अनेकवेळा आपल्या sheets वर ‘Redo’ शेरा मारणारा, खंडीभर assignments देणारा, submissions साठी शेवटपर्यंत छळ छळ छळणारा, खुन्नस म्हणून पेपर अवघड काढणारा आणि viva च्या वेळेस External ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत की हळूच खुनशी हसणारा मनुष्य हाच का असा प्रश्न पडतो..! अशाच एका ‘हिटलर’ professorने रस्त्यात आपणहून दिलेली ओळख बघून मला ही नक्की ‘राम और श्याम’ किंवा ‘कुंभ के मेले मे बिछडे हुए भाई’ ची case आहे असं वाटलं होतं!

यानंतर ज्याची प्रत्येक जण ४ वर्षे आतुरतेने वाट पाहत असतो असा तो Engineers च्या आयुष्यातला सोन्याचा दिवस उजाडतो.. दिवस असतो ‘placements’ चा..! सगळीकडे एकच लगीनघाई सुरु असते! असंख्य काका, मामा आणि ‘family friends’ कडे चौकश्या करून झालेल्या असतात. ‘थोडयाच वर्षात Software ची boom परत येईल..’, ‘पण Core ला काही मरण नाही यार..!’, ‘TCS मधे २ वर्षांच्या bond पेक्षा १ वर्षाच्या bond ची Infy बरी, असं माझ्या ताईचे मिस्टर सांगत होते, जे Wipro मधे आहेत!!’ अशी वाक्ये या काळात सगळीकडे सर्रास ऐकू येतात.. त्या दिवशी सगळेजण कडक इस्त्रीच्या स्वच्छ कपडयात असतात आणि मागच्या खिशातल्या कंगव्याने सारखा भंग पाडत असतात..! मधेच polish केलेल्या बुटांवर बसलेली धूळ पाय वर करून pant च्या मागे पुसत असतात.. ‘मी किती cool आहे’ हे दाखवण्याचा प्रत्येकच जण अयशस्वी प्रयत्न करत असतो! कारण प्रत्येकालाच चिंता असते आपल्या placement ची, आपल्या भवितव्याची!

दिवस जेव्हा सरतो तेव्हा आम्हा Engineers च्या चेहेऱ्यावरून निकाल ओळखणे सोपे असते. आमच्यातले काही लोक उडया मारत असतात, काही भावूक होऊन आईशी फोनवर बोलताना दिसतात. तिची स्वप्ने पूर्ण केलेली असतात ना त्यांनी! अगदी हळवा क्षण असतो तो.. तर काही हिरमुसून होस्टेलकडे निघालेले असतात. चेहऱ्यावर निराशा असली तरी मन कणखर असतं त्याचं. ‘अजून युद्ध संपलेलं नाहीये. अजून लढायचं..’ या भावनेने ते दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागतात.. पण आठवडा-दोन आठवडयातच चित्र स्पष्ट होतं.. हळूहळू विश्वास बसायला लागतो की आपण एक नव्हे तर दोन कंपनीत place झालोय! आणि मग आनंदाला काही पारावार उरत नाही..

Placement सारख्या खूप आनंद देणाऱ्या अशाच अजूनही काही गोष्टी या माझ्या Engineering च्या आयुष्यात घडून गेल्यात.. आज सगळं आठवतंय.. College चा पहिला दिवस.. Boat Club वर तासनतास मारलेल्या गप्पा.. पावसाच्या काळात दुथडी भरून वाहणारी ती नदी.. तिच्यातलं उसळून वाहणारं पाणी नकळत मनाला उभारी देऊन जायचं.. Freshers’ Party… Technical Events.. Zest मधली केलेली मजा.. Regatta मधले श्वास रोखून ठेवणारे ते events आणि तो दिव्यांचा अद्भूत खेळ.. इच्छेनुसार साजरी होणारी दिवाळी फक्त COEPतच! होस्टेलवर पडीक असणं..खूप खूप cricket खेळणं.. 1st year मधली ट्रीप.. आणि पुढील प्रत्येक वर्षातल्या अशाच सहली.. Traditional dayला ते भान हरपून नाचणं... Valentine’s Day ला लाल नाही निदान पिवळं तरी फुल मिळावं अशी भाबडी आशा.. आणि मिळालं नाही की ‘एक दिवस खूप मोठा होईन आणि मग मनासारखी मुलगी मिळेल मला.. सगळ्यात सुंदर..’ असं पाहिलेलं स्वप्न..! Gathering मधली मजा.. Cultural Group मधे मिळालेला तो अवर्णनीय आनंद..पुरुषोत्तम..फिरोदिया..सगळाच उत्सव, सगळाच सोहळा, सगळाच जश्न...! बेंबीच्या देठापासून अगदी कानठळ्या बसेपर्यंत ओरडून ओरडून आसमंत दणाणून सोडणारा C.O.E.P चा तो गजर... गजर कसला, गर्जनाच असतात त्या! C.O.E.P रूपी सिंहिणीच्या आम्ही केलेल्या छाव्यांनी..! मिळालेल्या करंडकाकडे बघून वाटणारी ती जग्गजेते झाल्याची भावना...

आता जाताना या सगळ्या आठवणी घेऊन जाऊ. जाता जाता प्रत्येक ‘मामू’ professor ला एक ‘जादू की झप्पी’ द्यावीशी वाटतीय! (ज्या शिक्षकांना मानलं त्यांना तर दंडवतच घालीन!) आणि म्हणावसं वाटतं.. “सर, तुमच्यामुळेसुद्धा मी इतक्या छान आठवणी घेऊन जाऊ शकतोय.. तुम्ही दिलेला त्रास आज खरंच प्रेमळ वाटतोय.. धन्यवाद सर!” सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावं लागतंय ह्याचं मात्र दु:ख आहे. त्यांच्याही खूप आठवणी आहेतच.. पण ‘एवढया सगळ्या आठवणी कायमच्या राहतील माझाबरोबर?’ असा प्रश्न पडतो, अन् वाटतं 200 GB memory हवी होती आपली! त्या computer नामक निर्जीव यंत्राचा हेवा वाटायला लागतो.. आणि अचानक मनात विचार येतो, ‘200 GB ची Hard Disk माणसात implant करता येऊ शकेल? सगळ्याच आठवणी कायमच्या राहू शकतील मग आपल्याकडे.. Natural आणि Artificial Intelligence चं असं हे hybridization शक्य आहे का..?’ आणि मग माझ्यातला ‘खरा Engineer’ विचार करायला लागतो...

Friday, September 3, 2010

पाऊस!

‘पाऊस’...प्रत्येक कवीचा आणि बहुदा प्रत्येक लेखकाचा हा अगदी जीवाभावाचा विषय! प्रत्येक कवी, मग तो होतकरू कवी असो, वा अगदी कोणी जेष्ठ कवी, तो त्याच्या आयुष्यात एखादी तरी पावसावर कविता करतोच! म्हणजे, जणू कवीने पावसावर कविता केल्यावरच त्याला ‘कवित्व’ प्राप्त होते, हे साहित्य क्षेत्रातलं एक ‘समीकरण’च आहे! पण पावसावर लिहिणं हे काही कवीचं कर्तव्य नसतं. तो त्याचा लोभ असतो!

अश्मयुगातला माणूस जेव्हा दगडी हत्यार घेऊन उघडा फिरत असेल,त्याच्या डोक्यावर कडक ऊन असेल, पायात काही नसल्यामुळे चटके बसत असतील. भूक लागली की कंदमुळे-फळे खायची. त्यात कुठूनही हिंस्त्र पशू हल्ला करू शकतो. म्हणून सतत ते दगडी हत्यार हातात घेऊन तत्पर रहायचं. त्यात सोबत बायकोची भूणभूण असेलच! ‘अहो, मी या झाडाची वल्कलं घालू का त्या झाडाची? मी काय नेसू? मी कशी दिसते? माझे केस आवडतात का तुम्हाला? कापू का लांबच ठेवू? ती शेजारची आहे ना, तिने दगडी हत्याराने कालच कापले केस. मी काय करू? तिच्यापेक्षा मीच सुंदर आहे ना? अहो सांगा ना...!’
अशा सगळ्या त्रासात ‘Life जाम tough आहे राव’ असा तो विचार करत असतानाच अखंड मानवजातीचा पहिला पाऊस कडाडून बरसला असेल..! हे आकाशातून असं पाणी कसं पडतंय..!! काही झेपायच्या आतंच चिंब भिजले असतील दोघेही.. तापलेल्या जमिनीबरोबर मग त्याचंही डोकं थंड झालं असेल..सगळा उकाडा क्षणार्धात मारला असेल त्या पावसाने...मग त्या चिंब भिजलेल्या बायकोकडे बघून तो म्हणाला असेल , “खूप सुंदर दिसतीयस..केस लांबच ठेव!” अन् मग तीही लाजली असेल.. असा हा पाऊस!

माणूस जगतो तो त्याच्या भविष्यकाळातल्या स्वप्नांवर आणि भूतकाळातल्या आठवणींवर. स्वप्नं त्याला दिशा देतात, तर आठवणी सोबत. माझा आठवणींचा कप्पा मी जेव्हा उघडून बघतो, तेव्हा तो निम्मा-अधिक पावसाच्या पाण्यानेच भरलेला असतो..!
कोरा करकरीत निळा रेनकोट घातलेला तो शाळेतला दिवस..येताना ओलेकच्च भिजलेले ते पांढरेशुभ्र सॉक्स..आज्जीबरोबर शेजारच्या बोळात वेचलेल्या गारा..पहिल्यांदा पाहिलेलं आणि अगदी काहीच क्षणात अदृष्य झालेलं इंद्रधनुष्य..ओल्या मातीचा तो वास आणि ‘मातीला इतका छान वास असतो?’ हे वाटलेलं नवल.. अळूच्या पानावर बसून डळमळणारा तो दवबिंदू..अंगणात बसलेली, ओलीचिंब भिजून थरथर कापणारी ती मांजराची दोन पिल्लं.. त्यांच्या केविलवाणेपणाने त्यांना त्याच क्षणी आमच्या घरात मिळालेली जागा..डबक्यात सोडलेल्या होडया..एकमेकांच्या अंगावर उडवलेलं ते डबक्यातलं पाणी..आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, लहानपणीची सगळ्यात आवडीची कविता...!
सतत laptop समोर असताना ‘निसर्गापासून आपण किती लांब गेलोय..फक्त स्वतःमधे जगतोय, स्वतःसाठी जगतोय’ हा विचार जेव्हा त्रास द्यायला लागतो, तेव्हा अशाच पावसाच्या आठवणींची सोबत मिळते. पाऊस हा निसर्गाचाच एक भाग असला तरी मला तो निसर्गाकडे जाताना वाटेत मदत करणाऱ्या वाटाडयासारखा वाटतो. पावसावाटेच मी निसर्गाजवळ जात असतो. तो वेडयासारखा बरसतो. धरणीमातेला न्हाऊ घालतो. तिला हिरवी वस्त्रं घालतो. पिसाटलेल्या वाऱ्यांनी तिचे केस वाळवतो. गव्हाच्या पिकांनी, कणसाच्या टपोऱ्या दाण्यांनी तिची कांती उजळतो. अवघ्या प्राणीमात्रांना सुखावतो आणि मला म्हणतो, “आता ये बघायला. बघ ही पृथ्वी किती सुंदर आहे. जरा भिज. खेळ इकडे. हाच तुझा देव आहे. बस त्याच्या मांडीत थोडयावेळ. नंतर जाणारच आहेस त्या कोंदट, कृत्रिम आणि मिथ्या जगात पळायला... ये, थोडं खेळून जा!” तोच मला घेऊन जात असतो.. असा हा पाऊस!

त्या वरून पडणाऱ्या पाण्यात नाती जोडायची शक्ती कशी असू शकते, हा प्रश्न मला नेहेमी पडतो. पावसात कधी कुणाला गाडीतून lift दिली जाते, तर कुणाला छत्रीत घेतलं जातं. फुगलेलं धुकं आणि मुक्तपणे कोसळणारे धबधबे तर सहलीचं आमंत्रण देत असतात! अन् मग अनोळखी लोकं ओळखीची होतात. ओळख मैत्रीत बदलते. मैत्री घट्ट होते आणि कदाचित पुढे आयुष्यभर पुरते. पावसात भिजत मित्रांबरोबर घेतलेला वाफाळत्या चहाचा प्रत्येक घोट मैत्रीची वीण घट्ट करत असतो. त्या चहात पडणारे पावसाचे थेंब त्याची चव द्विगुणीत करत असतात. तेव्हा तो चहा खराच ‘अमृततुल्य’ होतो..! कित्येकांचं प्रेम जमण्यात आणि फुलण्यात ह्या पावसाचा मोठ्ठा वाटा असतो! Chemistry मधे सांगायचं तर प्रेमाच्या reaction चा तो Catalyst असतो. संगीतात सांगायचं तर तबला लावताना तो पेटीचा स्वर असतो. पु.लं.च्या भाषेत सांगायचं तर तो लग्नातला ‘नारायण’ असतो. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तो ‘mood creator’ असतो..! वरून पडणारं हे पाणी नकळत मनात झिरपत असतं. अन् त्यातूनच मग नात्यांमधे ‘ओलावा’ तयार होत असतो...असा हा पाऊस!

इयत्ता तिसरी. निबंध लिहा- ‘माझा आवडता ऋतू’ आणि मग सगळ्या उत्तरपत्रिकांत पाऊसच पाऊस होतो! उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट बघतो, तर हिवाळ्यात दिवाळी किंवा ख्रिसमसची. पावसाळ्यात फक्त पावसाचीच वाट बघितली जाते! त्यामुळे मला पावसाळा हा खूप 'सजीव' ऋतू वाटतो! शेतकऱ्यांचा देव आणि भजी-वडापाववाल्यांची लक्ष्मी तर असतेच पावसाळा, पण तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं हातात कॉफीचा मग घेऊन गहन कादंबऱ्या वाचायचा निरागस प्रयत्न करतात, तो ह्या पावसाळ्यातच! ही त्याची किमया!

मला जर हवी ती एक गोष्ट मिळणार असेल आयुष्यात, तर मी माझं बालपण मागीन. बालपण मिळालं तर सगळं काही मिळेल मला. मी खूप लहान असताना पप्पा मला shower खाली आंघोळ घालायचे. आंघोळ कमी आणि पाण्यात खेळणंच जास्त असायचं ते! आपण मोठे होतो आणि बरेच आनंद नकळत निघून जातात. पण कधी मी रस्त्याने जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरु झाला, तर वाटतं देव थोडयावेळासाठी समस्त प्राणीमात्रांना त्यांचं लहानपण परत करतोय..सगळ्यांना एकत्र आंघोळ घालतोय!
त्या वरून पडणाऱ्या पाण्याबद्दल लिहिणं कर्तव्य नसतं..त्याचा लोभ असतो..तर असा हा पाऊस!