Friday, September 3, 2010

पाऊस!

‘पाऊस’...प्रत्येक कवीचा आणि बहुदा प्रत्येक लेखकाचा हा अगदी जीवाभावाचा विषय! प्रत्येक कवी, मग तो होतकरू कवी असो, वा अगदी कोणी जेष्ठ कवी, तो त्याच्या आयुष्यात एखादी तरी पावसावर कविता करतोच! म्हणजे, जणू कवीने पावसावर कविता केल्यावरच त्याला ‘कवित्व’ प्राप्त होते, हे साहित्य क्षेत्रातलं एक ‘समीकरण’च आहे! पण पावसावर लिहिणं हे काही कवीचं कर्तव्य नसतं. तो त्याचा लोभ असतो!

अश्मयुगातला माणूस जेव्हा दगडी हत्यार घेऊन उघडा फिरत असेल,त्याच्या डोक्यावर कडक ऊन असेल, पायात काही नसल्यामुळे चटके बसत असतील. भूक लागली की कंदमुळे-फळे खायची. त्यात कुठूनही हिंस्त्र पशू हल्ला करू शकतो. म्हणून सतत ते दगडी हत्यार हातात घेऊन तत्पर रहायचं. त्यात सोबत बायकोची भूणभूण असेलच! ‘अहो, मी या झाडाची वल्कलं घालू का त्या झाडाची? मी काय नेसू? मी कशी दिसते? माझे केस आवडतात का तुम्हाला? कापू का लांबच ठेवू? ती शेजारची आहे ना, तिने दगडी हत्याराने कालच कापले केस. मी काय करू? तिच्यापेक्षा मीच सुंदर आहे ना? अहो सांगा ना...!’
अशा सगळ्या त्रासात ‘Life जाम tough आहे राव’ असा तो विचार करत असतानाच अखंड मानवजातीचा पहिला पाऊस कडाडून बरसला असेल..! हे आकाशातून असं पाणी कसं पडतंय..!! काही झेपायच्या आतंच चिंब भिजले असतील दोघेही.. तापलेल्या जमिनीबरोबर मग त्याचंही डोकं थंड झालं असेल..सगळा उकाडा क्षणार्धात मारला असेल त्या पावसाने...मग त्या चिंब भिजलेल्या बायकोकडे बघून तो म्हणाला असेल , “खूप सुंदर दिसतीयस..केस लांबच ठेव!” अन् मग तीही लाजली असेल.. असा हा पाऊस!

माणूस जगतो तो त्याच्या भविष्यकाळातल्या स्वप्नांवर आणि भूतकाळातल्या आठवणींवर. स्वप्नं त्याला दिशा देतात, तर आठवणी सोबत. माझा आठवणींचा कप्पा मी जेव्हा उघडून बघतो, तेव्हा तो निम्मा-अधिक पावसाच्या पाण्यानेच भरलेला असतो..!
कोरा करकरीत निळा रेनकोट घातलेला तो शाळेतला दिवस..येताना ओलेकच्च भिजलेले ते पांढरेशुभ्र सॉक्स..आज्जीबरोबर शेजारच्या बोळात वेचलेल्या गारा..पहिल्यांदा पाहिलेलं आणि अगदी काहीच क्षणात अदृष्य झालेलं इंद्रधनुष्य..ओल्या मातीचा तो वास आणि ‘मातीला इतका छान वास असतो?’ हे वाटलेलं नवल.. अळूच्या पानावर बसून डळमळणारा तो दवबिंदू..अंगणात बसलेली, ओलीचिंब भिजून थरथर कापणारी ती मांजराची दोन पिल्लं.. त्यांच्या केविलवाणेपणाने त्यांना त्याच क्षणी आमच्या घरात मिळालेली जागा..डबक्यात सोडलेल्या होडया..एकमेकांच्या अंगावर उडवलेलं ते डबक्यातलं पाणी..आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, लहानपणीची सगळ्यात आवडीची कविता...!
सतत laptop समोर असताना ‘निसर्गापासून आपण किती लांब गेलोय..फक्त स्वतःमधे जगतोय, स्वतःसाठी जगतोय’ हा विचार जेव्हा त्रास द्यायला लागतो, तेव्हा अशाच पावसाच्या आठवणींची सोबत मिळते. पाऊस हा निसर्गाचाच एक भाग असला तरी मला तो निसर्गाकडे जाताना वाटेत मदत करणाऱ्या वाटाडयासारखा वाटतो. पावसावाटेच मी निसर्गाजवळ जात असतो. तो वेडयासारखा बरसतो. धरणीमातेला न्हाऊ घालतो. तिला हिरवी वस्त्रं घालतो. पिसाटलेल्या वाऱ्यांनी तिचे केस वाळवतो. गव्हाच्या पिकांनी, कणसाच्या टपोऱ्या दाण्यांनी तिची कांती उजळतो. अवघ्या प्राणीमात्रांना सुखावतो आणि मला म्हणतो, “आता ये बघायला. बघ ही पृथ्वी किती सुंदर आहे. जरा भिज. खेळ इकडे. हाच तुझा देव आहे. बस त्याच्या मांडीत थोडयावेळ. नंतर जाणारच आहेस त्या कोंदट, कृत्रिम आणि मिथ्या जगात पळायला... ये, थोडं खेळून जा!” तोच मला घेऊन जात असतो.. असा हा पाऊस!

त्या वरून पडणाऱ्या पाण्यात नाती जोडायची शक्ती कशी असू शकते, हा प्रश्न मला नेहेमी पडतो. पावसात कधी कुणाला गाडीतून lift दिली जाते, तर कुणाला छत्रीत घेतलं जातं. फुगलेलं धुकं आणि मुक्तपणे कोसळणारे धबधबे तर सहलीचं आमंत्रण देत असतात! अन् मग अनोळखी लोकं ओळखीची होतात. ओळख मैत्रीत बदलते. मैत्री घट्ट होते आणि कदाचित पुढे आयुष्यभर पुरते. पावसात भिजत मित्रांबरोबर घेतलेला वाफाळत्या चहाचा प्रत्येक घोट मैत्रीची वीण घट्ट करत असतो. त्या चहात पडणारे पावसाचे थेंब त्याची चव द्विगुणीत करत असतात. तेव्हा तो चहा खराच ‘अमृततुल्य’ होतो..! कित्येकांचं प्रेम जमण्यात आणि फुलण्यात ह्या पावसाचा मोठ्ठा वाटा असतो! Chemistry मधे सांगायचं तर प्रेमाच्या reaction चा तो Catalyst असतो. संगीतात सांगायचं तर तबला लावताना तो पेटीचा स्वर असतो. पु.लं.च्या भाषेत सांगायचं तर तो लग्नातला ‘नारायण’ असतो. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तो ‘mood creator’ असतो..! वरून पडणारं हे पाणी नकळत मनात झिरपत असतं. अन् त्यातूनच मग नात्यांमधे ‘ओलावा’ तयार होत असतो...असा हा पाऊस!

इयत्ता तिसरी. निबंध लिहा- ‘माझा आवडता ऋतू’ आणि मग सगळ्या उत्तरपत्रिकांत पाऊसच पाऊस होतो! उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट बघतो, तर हिवाळ्यात दिवाळी किंवा ख्रिसमसची. पावसाळ्यात फक्त पावसाचीच वाट बघितली जाते! त्यामुळे मला पावसाळा हा खूप 'सजीव' ऋतू वाटतो! शेतकऱ्यांचा देव आणि भजी-वडापाववाल्यांची लक्ष्मी तर असतेच पावसाळा, पण तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं हातात कॉफीचा मग घेऊन गहन कादंबऱ्या वाचायचा निरागस प्रयत्न करतात, तो ह्या पावसाळ्यातच! ही त्याची किमया!

मला जर हवी ती एक गोष्ट मिळणार असेल आयुष्यात, तर मी माझं बालपण मागीन. बालपण मिळालं तर सगळं काही मिळेल मला. मी खूप लहान असताना पप्पा मला shower खाली आंघोळ घालायचे. आंघोळ कमी आणि पाण्यात खेळणंच जास्त असायचं ते! आपण मोठे होतो आणि बरेच आनंद नकळत निघून जातात. पण कधी मी रस्त्याने जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरु झाला, तर वाटतं देव थोडयावेळासाठी समस्त प्राणीमात्रांना त्यांचं लहानपण परत करतोय..सगळ्यांना एकत्र आंघोळ घालतोय!
त्या वरून पडणाऱ्या पाण्याबद्दल लिहिणं कर्तव्य नसतं..त्याचा लोभ असतो..तर असा हा पाऊस!

13 comments:

Gaurav Patil said...

सही हे मास्तुरे,
nice one........

Karan said...

wonderfulll... :)

Sushant said...

@ Ajoba, Karan, Danny -
Thanks a lot!! :)

varada said...

Khooop chhan.....

Mukta said...

tu pavsachi lahanpani babni ghatlelya angholishi ji tulna keli ahes... ti lajawab ahe :)

Sushant said...

@ Varada - Thanks :)

@ Mukta - :) मलाही जेव्हा ते सुचलं, तेव्हा ते खरंच किती बरोबर आहे आणि आधी कधी असा विचार कसा नव्हता आला, असं क्षणभर वाटून गेलं...!

Harshal Patel said...
This comment has been removed by the author.
Harshal Patel said...

Chan aahe re... Parvachya pausat thoughts refresh zalyat...:)

Sushant said...

@ Harshal - :) hmm!

Unknown said...

mast lihila ahes re..khup sahi...

Unknown said...

mast lihila ahes re..khup sahi...

teja said...

व्वा...........सुंदर लिहिले आहेस.......
त्यावर दोन ओळी लिहू?
"भुरभूर मनाला क्षण क्षण ओढ लावणारा
मनाच्या ग्रीष्म ऋतू पुसून टाकणारा
हळव्या मनाचे काळीज जिंकून घेणारा
साजिरा गोजिरा पाउस ..................!"

sneha said...

Koopach sundar......hey vachun maan agdi chimb chimb zale....khoopach bhari:)