Friday, March 26, 2010

युग युग जियो!

आत्तापर्यंतची चार युगे मानली जातात. सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि आपलं कलियुग! एक सज्जन सत्य युग सोडलं, तर प्रत्येक युगात काही चांगल्या गोष्टी झाल्या तर काही वाईट. पण सगळ्यात जास्त शिव्या ह्या आपल्या आत्ताच्या कलियुगालाच दिल्या जातात! म्हणजे बघा, महाभारत इसवी सन पूर्व ३१३७ वर्षांपूर्वी झालं. त्यानंतर ३५ वर्षांनी कृष्णानी प्राण सोडले. आणि तिथेच सुरु झालं आपलं हे शिव्या-शापांनी भरलेलं, दुष्ट प्रवृत्तीचं, वाईट असं कलियुग!

आता ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे थोर संत, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप, यांसारखे थोर योद्धे, हे सुद्धा कलियुगातलेच! तरीसुद्धा त्यांचा काळ हा बऱ्यापैकी 'चांगला' काळ मानला जातो. सगळ्यात वाईट हा आत्ताचा, आपला काळ! आपण याला 'उत्तर कलियुग' म्हणूयात. या उत्तर कलियुगात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय, महागाई वाढलीय, आपणच प्रदूषणाने पृथ्वीचा नाश करू पाहतोय...तर असं हे आपलं 'उत्तर कलियुग' सगळ्यात वाईट युग आहे!

पण आपण याच युगाचा आता भाग आहोत. म्हणून या युगात निमुटपणे जगणे आपल्याला भाग आहे! म्हणून या 'उत्तर कलियुगावर' मी विचार करायला लागलो.. खरंच एवढं वाईट आहे का हे? एखादी तरी चांगली गोष्ट असेलच की! काय बरं असेल ती चांगली गोष्ट..? असा विचार करताना पहिली गोष्ट मनात चमकली ती म्हणजे 'Technology'..तंत्रज्ञान! तंत्रज्ञानालाही सरळसोट शिव्या घातल्या जातात! पण या तंत्रज्ञानाचे फायदेही अनेक आहेत. जर आत्ताएवढं प्रगत तंत्रज्ञान या आधीच्या युगांत असतं, तर त्या युगातल्या लोकांना काही मदत झाली असती का..?

अहो नक्कीच झाली असती! म्हणजे बघा, आपल्याला माहितीय कर्णाचा मृत्यू त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुतल्यामुळे झाला. कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं, तो खाली उतरून ते काढायचा प्रयत्न करू लागला आणि तेवढ्यात अर्जुनाने त्याचा वध केला. पण जर का त्यांची तांत्रिक प्रगती झाली असती, तर कर्णाचा रथ म्हणजे ‘All wheel drive’, SUV (Sports Utility Vehicle) असता! आणि त्याला खाली उतरून चाक काढायची गरजच पडली नसती..दुसरं उदाहरण म्हणजे अभिमन्यूचं. चक्रव्यूह ही सैन्याची रचना. अभिमन्यूला चक्रव्युहात शिरायचं कसं हे माहिती होतं. पण ते भेदून बाहेर कसं यायचं, याचं ज्ञान त्याला नव्हतं. आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. पण जर का त्यावेळी त्याच्या जवळ GPS (Global Positioning System) हे device असतं..तर त्याच device ने त्याला सांगितलं असतं.. ‘Take left from here. Go straight. Kill that Kaurav and take next exit..’ वगैरे! आणि त्याचाही मग जीव वाचू शकला असता..

त्या काळच्या दुष्ट लोकांचाही फायदा झालाच असता की! म्हणजे सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून श्रीकृष्णाने जयद्रथाला गंडवलं होतं! आणि अर्जुनाने त्याचा वध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली होती..पण जर त्यावेळी जयद्रथाने ‘Weather Forecast’ check केलं असतं..तर त्याला सूर्यास्ताची exact वेळ कळली असती! आणि मग कृष्ण त्याला गंडवू शकला नसता..! भीमाने युद्धाचे नियम तोडून दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार केला. पण जर दुर्योधनाने त्या वेळी थाय पॅड घातलं असतं, तर तो वाचू शकला असता! किंवा कोण जाणे, कदाचित त्या काळी ‘technology’ असती, तर १०० कौरव झालेच नसते!!

रामायणातही खूप फायदा झाला असता तंत्रज्ञानाचा..आता लक्ष्मणाला वाचवायला जी संजीवनी वनस्पती लागत होती, ती आणायला हनुमान इतक्या लांब द्रोणागिरी पर्वतावर गेला. आणि एवढंच नाही, तर तो अख्खा द्रोणागिरी पर्वतच घेऊन आला! एवढं करण्यापेक्षा ‘Google’ वर search करून जवळच्या केमिस्टकडे नसती मिळाली संजीवनी?!

किंवा हनुमानाने शेपटीला आग लावून अवघी लंका जाळली! तेंव्हा एक साधा Fire Extinguisher असता, तर वाचली असती लंका! आज त्या श्रीलंकेची लोकं जरा तरी उजळ असती! किंवा कमीतकमी क्रिकेट ग्राउंडवर फिल्डिंग करणाऱ्या श्रीलंकेच्या प्लेयर्सपैकी नक्की कोण कुठे उभा आहे, हे तरी समजलं असतं! आणि रावणाचा वध झाल्यावर, रामायण संपताना, सीतेला अगदी अग्निपरीक्षा द्यावी लागली नसती. साधी ‘Lie Detector Test’ पुरली असती की तिला!

या तंत्रज्ञानाने सगळे काही फायदेच झाले असते, असंही नाही! काही तोटेही झाले असते. Mediaचा धुमाकूळ हा त्यातला एक मोठा तोटा! त्याकाळीही मग Mediaचा सगळीकडे मुक्त वावर असता..राम, लक्ष्मण, सीता वनवासात गेले असताना तिथेही मग Mediaची लोकं सापडली असती! काय दृश्य असतं ते...! एक जण रामाला विचारतोय, "प्रभु राम, आप कैसा मेहेसूस कर रहे है? आपकी सौतेली माँ, कैकेयी, आपसे इतनी नफ़रत क्यूँ करती है?" तर दुसरा सीतेला विचारात असेल, "इतने रईस खानदान की बहु होते हुए भी आज आपपे ये नौबत आयी है| क्या प्रभु राम से शादी करने का आपका निर्णय सही था? आपकी क्या राय है?!" किंवा 'आज तक' ने ‘Breaking News’ दाखवली असती..'खबर मिली है के अभी अभी प्रभु रामने एक फल का प्राशन किया है| और ये एक ऐसा फल है, जिसके बारे में ना किसीने कभी सुना था, ना किसीने इस फल को कभी देखा है! जहरीला भी हो सकता है ये फल..! क्या प्रभु राम जिंदा रहेंगे..? क्या ये फल 'रामफल' नाम से जाना जाएगा?..अभी अभी खबर मिली है के सीताने भी प्रभु राम का अनुयय करते हुए ऐसाही एक फल खाया है! अब उस फलको 'सीताफल' की संज्ञा प्राप्त हुई है! राम और सीता को देखकर लक्ष्मणनेभी एक फल खाया है! लेकिन ठहरिये, उस फल को 'लक्ष्मणफल' कहेनी की जरुरत नहीं है| क्यूँ के खबर के मुताबिक लक्ष्मण हापूस आम खा रहा था!!

मराठी News channel वाले सुद्धा काही मागे नसतील! 'आत्ताच एक हेलावून टाकणारी बातमी मिळाली आहे! लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं आहे! राम त्यावर बेहद्द खुश झाले आहेत!' मी किशोर, कॅमेरामन किरणसोबत, स्टार माझा! 'आत्ताच एक नवी बातमी मिळाली आहे..रामाने खुश होऊन लक्ष्मणाला वर दिला आहे की 'इथून पुढचा ६२ वा जन्म तू भारत देशातच घेशील. तू खूप प्रसिद्ध होशील! भारताकडून क्रिकेट खेळशील आणि IPLमधे हैद्राबाद डेक्कन चार्जर्सचा कॅप्टन होशील! तेंव्हा तुझं नाव व्ही.व्ही.एस.लक्ष्मण असेल...!!'
आता आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे की प्रभू राम त्यांच्या ६२ व्या जन्मात कोण असतील..? आम्ही हे खुद्द प्रभू रामालाच विचारलं, पण त्यांनी उत्तर न देण्याचं पसंत केलं..त्यांनी फक्त काही संकेत, काही hints दिल्या आहेत. त्यांचे शब्द होते..'मी तेव्हाही लक्ष्मणाला साथ देईन. या जन्मात मी दशरथाचा पुत्र आहे आणि दशमुखी रावणाचा वध करणार आहे. त्या जन्मात 'दश' हा शब्द माझ्या आडनावात असेल. माझी उंची थोडी कमी असेल आणि केस कुरळे असतील..' कोण असेल राम त्या जन्मात? काय असेल त्याचं आडनाव? दशपुत्रे? आपण फक्त अंदाजच बांधू शकतो..कॅमेरामन किरणसोबत, मी किशोर, स्टार माझा..!

याबरोबरच अशा कित्येक गमती-जमती होतील! तंत्रज्ञान असतं तर यम यामाहावरून आणि देवाचे राजदूत, राजदूत मोटरसायकलवरून फिरले असते! गणपतीने उंदराऐवजी टाटा नॅनो पसंत केली असती! भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपुने विचारलं असतं, " काय रे, या खांबात आहे का तुझा देव?" आणि हो म्हणाल्यावर त्याने गदेने त्या खांबावर जोरदार प्रहार केला असता. पण तो खांब काही तुटला नसता. दोन, चार, दहा, अगदी शंभर वेळा प्रहार करूनही तुटला नसता! आणि नंतर कळलं असतं की त्या खांबात 'अंबुजा सिमेंट' वापरलंय! कर्ण त्याच्या आईला म्हणाला असता, "आई ही permanent कुंडलं नकोत मला. त्यापेक्षा मी फिरकीची कानातली घालतो! रोज बदलत जाईन!" द्रोणाचार्यांकडे शिकायला CET द्यावी लागली असती! एकलव्याने मग त्यांचे ‘Online Courses’ घेतले असते! बिचाऱ्याचा अंगठा वाचला असता..! श्रावणबाळाने नदीवर पाणी आणायला जाऊन प्राण नसता गमावला. त्याने जवळच्या ‘Vending machine’ मधून ‘Mineral water’ ची बाटली काढून दिली असती आपल्या आई-वडिलांना! गांधीजी ‘Cotton King’ चे brand ambassador असते, रामदास स्वामींची ‘Fitness club’ ची chain असती, तर ज्ञानेश्वरांचे प्राकृत मराठीचे classes प्रसिद्ध झाले असते! आणि युद्ध्याची सुरुवात शंख फुंकून व्हायच्या ऐवजी अजय-अतुलच्या दमदार गाण्याने झाली असती! भीष्मांनी त्यांची 'भीष्म प्रतिज्ञा' सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘buzz’ वर नाहीतर ‘facebook’ वर टाकली असती! भीष्म एवढे सुस्वरूप आणि तरणेबांड! आता ते ब्रम्हचर्यत्व स्वीकारणार हे वाचून, आणि आता आपल्याला scope जास्त आहे, असा विचार करून त्या काळच्या तरुणांनी तो status message ‘Like’ केला असता! तर तरुणी हे ऐकून हिरमुसल्या असत्या! किंवा युधिष्टिर Facebook वर ‘Lover of the day’ खेळला असता आणि उत्तर आलं असतं गांधारी! आणि कदाचित हेच कारण ठरलं असतं महायुद्धाचं...

खरंच, कोणी काही म्हणा, पण आपलं हे 'उत्तर कलियुग' आणि त्याची तंत्रज्ञानाची देणगी अगदीच काही वाईट नाहीये! जसं बाकी युगात काही चांगलं होतं आणि काही वाईट होतं, तसं आपल्याही युगात आहे..या वीरांनी त्यांची युगं गाजवली, आपण आपलं गाजवूयात! खूपसं वाईट असलं तरी चांगलं ते वेचूयात. ‘3 idiots’ नुसार आपल्या युगात ‘Life is a broken अंडा' असते. आणि म्हणूनच आपलं युग हे 'युगांडा' आहे! तरी त्या युगांडात भरताचं राज्य आणुयात. त्याचा खराखुरा पूर्वीसारखा भारत करूयात...!


(आमोद आगाशे आणि सुशांत खोपकर यांच्या 'विनोदाची चादर' या लेखमालेतला हा पहिला लेख!)

20 comments:

Abhijeet Kulkarni said...

Are dada... maarmik maarmik mhanje kiti !! tya varchya krishnala pan heva vaatel itka surekh varnan jhalay !! gurudev tumche charan kuthayt?? ka Online course karu? truly entertaining lekh !!! Congrats to "VINODAACHI CHAADAR" for the grand opening !!!!

Namrata said...

Bhari re.......Tuzya "Vinodachi chadar"ya lekhmala sathi shubechha.......

varada said...

kudos to Vinodachi chadar.....Mast lihila ahes...

kunal said...

abb.... ata matra no comments aakkhi malika vachayala milanar mhanje zalach

Sushant said...

@ All- Thank you so much!! :)

Archie said...

hilarious!!!

Ajit Kane said...

युगांडाची concept आमोदची का? :D :D

Mayur said...

bhari aahe...hilarious!!!

Online course and CET..LOL!!
SUV and GPS! ek no re..
baap lihilaye...awadla...gonna publicize it...

Unknown said...
This comment has been removed by the author.
Saee said...

This was really awesome. :)
Lot of thought went into it it seems. :)
Well done!

Gaurav Patil said...

nice one..........gr8 improvisation...
good comeback.........
waiting for next one

Shivali Parchure said...

zakass opening... "Vinodachi chadar" sathi khup khup shubheccha!!!!
Doghanche abhinanadan.......... Bakichya lekhansathi aatur ahe........

Rajesh M. Kulkarni said...

अरे विनोदाचा आयटम बॉम्ब आहे हा.........दोघांनाही खूप शुभेछा.......

Karan said...

response kadakk e ....

deserving begining e rre navya series chi...

keep it up...
all d best...

Nachiket said...

wa wa bharotsav .... bhari concept ahet.... aawadlyaa ... :)
(btw Ashok 1aat Maruti CTe la bhetayla alela CC TV war hi disle aste etc .. ? :P )
ani ho ... Vinodachi Chadar (((from Virar to Dadar))) chalu rahudet .. (sambhavami yuge yuge nako... saptahik at least ... ?)

Shashwati said...

verry nice.. :).. I loved ur lekh!

Unknown said...

He tar beshht ahe!!!

Anonymous said...

simply awesome.....

shamal said...

I think u are Jr.Pu.L.Deshpande/chota pul.

Ashay..... said...

uttam