Saturday, March 13, 2010

मिसेस कुलकर्णी

आज महिला दिवस असून मिसेस कुलकर्णींचा काही मूड नव्हता. त्या एकट्याच पलंगाच्या कोपऱ्यात बसून खिडकीच्या बाहेर बघत बसल्या होत्या. त्यांचा मूड जायला कारणंही तसं 'खास' होतं. ऑफिसमधून घरी येताना त्यांची मैत्रीण त्यांना तिचं नवं घर दाखवायला म्हणून घेऊन गेली होती. आणि तिनं त्यांना त्यांचं नवं कोरं पाच खोल्यांचं घर, त्याच्या मार्बल टाईल्स, त्याला शोभेल असं interior, नवा सोफा सेट, नवी कांजीवरम आणि अष्टेकर ज्वेलर्स मधून घेतलेल्या नव्या कोऱ्या सोन्याच्या घसघशीत पाटल्या दाखवल्या होत्या..! हे एवढं सगळं एकावेळी पचवणं मिसेस कुलकर्णींच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं!

त्यामुळे आज त्या, नुसता राग येणं, डोकं दुखणं किंवा पोटात काहीतरी 'जळजळतय' असं वाटणं...याच्या पलीकडे गेल्या होत्या! आज त्या चक्क आयुष्यावर विचार करत बसल्या होत्या!

'उगाच कुलकर्ण्यांच्या घरची सून झाले! एवढी स्थळं चालून आली होती..एखाद्या श्रीमंताशी लग्न केलं असतं, तर आज श्रीमंतीत लोळत असते! पण कुठे गेली होती अक्कल? मिस्टर कुलकर्ण्यांच्या रंग-रूपाने, भारदस्त आवाजाने, प्रामाणिक डोळ्यांनी भाळले. पण या सगळ्याची काय भाजी करायची का आता? शी बाई! 'सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही' हेच खरं! खरंच मूर्खपणा केला. एवढं सुंदर रूप दिलं होतं देवाने...स्वतःच्या हाताने पायावर दगड मारून घेतला मी! तेव्हा आई म्हणाली होती, "कुलकर्ण्यांचं कुटुंब अगदी छान आहे. बरंका सुमे, नवऱ्याइतकेच त्याचे कुटुंबीयही महत्वाचे!" पण मिस्टर कुलकर्णी हे एकुलते एक सुपुत्र. आणि लग्नानंतर ५-१० वर्षांत सासू-सासरे एवढे थकलेले असतात, की ते चांगले आहेत का वाईट आहेत, काही फरकच पडत नाही! सेवा करत बसावं लागतं त्यांची...छे! छे! छे! चूक झाली आयुष्यात...मोठ्ठी चूक झाली!' खरं तर मिसेस कुलकर्णी मनाने खूप चांगल्या. सासू-सासऱ्यांचं अगदी मनापासून सगळं केलंय त्यांनी..पण तरीही आज त्यांच्या मनात असे विचार येत होते. त्यांच्या मैत्रिणीच्या अष्टेकर ज्वेलर्सच्या पाटलीवरची नाजूकशी नक्षी त्यांच्या डोळ्यांना जरा जास्तच टोचत होती..

त्यांचा धाकटा मुलगा रोहन आणि मोठी मुलगी राधिका नुकतेच शाळेतून आले होते. रोहन आत येऊन म्हणाला, "आई भूSS क लागलीय. खायला दे न काहीतरी."मिसेस कुलकर्ण्यांनी त्याच्याकडे एक त्रासिक कटाक्ष टाकला आणि जरा वैतागूनच म्हणाल्या, " आल्या आल्या काय रे भूक भूक? ताईला maggi करायला सांग. मी काही करणार नाहीये!" आईचं हे असं रूप पहिल्यांदाच बघून रोहन बिचकलाच! आणि पटकन खोलीच्या बाहेर निघून गेला.

त्या पुन्हा विचार करू लागल्या. 'मलाच सगळी कामं करायला लागतात. ह्यांच्यासारखी मीसुद्धा नोकरी करते. तरीसुद्द्धा एक 'स्त्री' म्हणून मीच सगळी कामं करायची. पुरुष हा 'कर्ता पुरुष' असतो म्हणून काय आम्ही लगेच 'कर्म स्त्री' होऊन सगळी कामं करत बसायचं का? ह्यासाठी मिळालाय का जन्म?...' तेवढ्यात त्यांचं लक्ष शेजारच्या पेपरवर पडलं. पहिल्याच पानावर बातमी होती, 'स्त्रियांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर!' त्याचाही त्यांना राग आला. '३३ कशाला, ५० द्या की! तुम्ही तुमच्या ५० टक्क्यात मग हवा तो गोंधळ घाला! आम्ही आमचे ५० सांभाळतो..'

दाराची बेल वाजली. रोहनची मित्र-मंडळी त्याला खेळायला बोलवायला आली होती. पण 'आता वार्षिक परीक्षा तोंडावर आलीय. म्हणून आता खेळ बंद.' असं कालच आईने रोहनला बजावलं होतं. रोहन नाही म्हणतोय म्हणून त्याचे मित्र त्याच्या आईला विचारायला थेट आत गेले! "काकू please रोहनला आजच्या दिवस पाठवा ना खेळायला. उद्यापासून आम्ही कोणीच खेळणार नाहीयोत. सगळे अभ्यास करणार आहोत.." त्यांना चांगलंच ओरडावं आता, असं मिसेस कुलकर्ण्यांना वाटलं. पण मग त्यांनी विचार केला, 'जरा खेळायला गेला हा, तर तेवढाच आपल्या डोक्याशी कटकट करणार नाही.' त्यांनी जरा चिडूनच, "जा, जाऊन ये' असं रोहनला सांगितलं आणि तो खेळायला निघून गेला.

'काकू'... मी कधी सुमित्राची 'काकू' झाले..कळलंच नाही. सगळं किती पटपट होतंय..एकदा लग्न झालं, पोरांची आई झालं की रंग, रूप, बांधा सगळंच सरायला लागतं..आणि मग आपण काकू होतो..काकू?!! काकूंच्या कपाळावर एकदम आठ आठया पडल्या! त्यांनी खिडकीतली केस काळे राहण्यासाठी असलेली जास्वंदाच्या तेलाची बाटली खसकन घेतली. तळहातावर बदाबदा तेल ओतलं आणि ते डोक्यावर थापून केसातून हात फिरवू लागल्या..त्यांचं डोकं एव्हाना एवढं तापलं होतं की त्या तेलाचाही boiling point येऊ घातला होता! त्यांना स्त्री जन्मावर एक जबरदस्त शिवी हासडायची इच्छा झाली. पण 'हलकट', 'नालायक' च्या पुढे त्यांना पटकन काही सुचेना! त्यांना मग पुन्हा पुरुषांचा हेवा वाटू लागला. पुरुष आई-माईवरून शिव्या देऊ शकतात. दारू पितात. सगळ्यांसमोर सिगरेटी ओढतात. मिसेस कुलकर्ण्यांना ह्यातलं काहीच करायचं नव्हतं. पण जर पुरुष हे सगळं करतात, तर काही स्त्रियांनी असं करण्यात काही चूक नाहीये, असं त्यांना वाटत होतं..

असा सगळा सगळा विचार झाल्याने त्यांना जरा बरं वाटू लागलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती. मिस्टर कुलकर्णी घरी आले होते. रोहनही खेळून आला होता. रोहन आणि राधिकाने बाबांना कानात 'आज आईला काहीतरी झालंय..' असं हळूच सांगितलं.

मिसेस कुलकर्णींनी मावळत्या सूर्याकडे पाहिलं. ते पाहून स्वयंपाकाची वेळ झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं! त्यांनी स्वतःला सावरलं. डोळे आणि गाल पुसले. अश्रू गालावर येऊन वाळून गेले होते. त्या पलंगावरून उठणार तेवढयात रोहन आत आला. "आई बाबा विचारतायत 'जयश्री'ची पावभाजी आणि कॉफी का 'मयुरी' ची थाळी? आणि आम्हाला 'मयुरी'ची थाळीसुद्धा चालेल. आम्ही दोघं तिकडे J.M रोडवर 'पिझ्झा हट' मधे जाण्याचा हट्ट करणार नाही..!" आपल्याला बघून ही दोघं आणि आता बाबाही घाबरलेत हे मिसेस कुलकर्णींच्या लक्षात आलं. त्या रोहनकडे बघून हसल्या आणि त्याला घेऊन खोलीबाहेर आल्या. हॉलमधे बाबा पेपर वाचत बसले होते. आई आल्याचे पाहून त्यांनी हळूच पेपेरच्यावरून मिसेस कुलकर्णींकडे पाहिले आणि म्हणाले, " चल ग, आज बाहेरच जाऊयात जेवायला! रोज रोज स्वयंपाक करून कंटाळा येणं साहजिकच आहे..!" हॉलमधे घाबरून काय प्रकार घडला असणार, हे मिसेस कुलकर्णींच्या लक्षात आलं. त्यांना पुन्हा हसू आलं. आणि 'महाराष्ट्रीयन थाळीपेक्षा मुलांना पावभाजी आवडते' असा विचार करून "जयश्रीत जाऊयात!" असं त्या म्हणाल्या.

'जयश्री'त चौघही निमूटपणे पावभाजी खात होते. कोणीच फारसं बोललं नाही. मग कॉफी आणि मिल्कशेक आले. आई कॉफी पीत असताना राधिकाने बाबांना खूण केली. आईने ते पाहून बाबांकडे पाहिलं. बाबांनी खिशातून 'आयुष्यावर बोलू काही' ची तिकीटं काढली. रात्री ९ ते १२ चा show होता. ते पाहून आईची कळी खुलली!

मिसेस कुलकर्णींना आपला नवरा आणि मुलं अगदी बिच्चारी वाटू लागली. त्यांनी विचार केला, 'एक दिवस काय माझा मूड नेहेमीसारखा नव्हता, तर ह्यांची कशी अवस्था झाली!' आपला नवरा, मुलं आपल्यावर केवढं प्रेम करतात हे त्यांना जाणवलं आणि घरात आपलं स्थान किती महत्वाचं आहे, हेही लक्षात आलं. त्यांचा मूड पुन्हा पहिल्यासारखा झाला. त्या तिकिटांकडे पाहून म्हणाल्या, "अहो, याची काय गरज होती...?"

९ वाजता 'आयुष्यावर बोलू काही' सुरु झाला. मध्यंतरापर्यंत पावसाची गाणी, प्रेम कविता झाल्या. 'कसे सरतील सये..' गाण्याला मिसेस कुलकर्णींना आपल्या लग्नानंतरचे 'ते' दिवस आठवले..त्यांच्या मनानेही 'हनिमून' हा शब्द उच्चारला नाही. त्यांना ते दिवस आठवले..मिस्टर जयंत कुलकर्णी. देखणे रूप, पिळदार शरीरयष्टी, कुरळे केस आणि काळेभोर डोळे..त्यांनी विचार केला, 'आपली निवड नाही चुकलेली. आपण काय विचार करत होतो..जयंता खरोखरच लाखात एक आहेत..! आपण भाग्यवान आहोत..त्या मैत्रिणीपेक्षाही!!' त्यांनी मिस्टर कुलकर्ण्यांकडे पाहिलं. मिस्टर कुलकर्णी मिशीतून मिश्कील हसत होते.. काही वेळाने 'मन तळ्यात, मळ्यात..' गाणं सुरु झालं. मिस्टर कुलकर्णींनी कोपराने हळूच मिसेस कुलकर्णींना 'Ping' केलं! पण 'आपलं वय काय...आणि इथे लोकं बसलीयत!' असा विचार करून मिसेस कुलकर्णींनी त्याकडे लक्षही दिलं नाही!

मध्यांतरानंतर थोडी गंभीर गाणी आणि विरह कविता सुरु झाल्या. 'मिस्टर कुलकर्णी आपल्याला केवढं समजून घेतात..आमचा विरह कधीच होणार नाही...' असा त्यांनी मनोमनी विचार केला. कार्यक्रमाचं शेवटचं गाणं गायला सलीलने सुरुवात केली. गाणं होतं, 'नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो..' मिसेस कुलकर्णी अगदी गढून जाऊन ते गाणं ऐकत होत्या. त्यांना पुन्हा एकदा स्वतःचे, 'एक स्त्री' असल्याचे महत्व पटले. आपल्यावाचून जयंताची कशी अवस्था होईल, हे ते गाणं सांगत होतं. त्यांनी मोठया कौतुकाने मिस्टर कुलकर्ण्यांकडे पाहिलं आणि त्यांना धक्का बसला! त्यांचा जयंता चक्क घोरत होता!! आता मिसेस कुलकर्णींना अगदी मनापासून हसू आलं..

कार्यक्रम संपला. घड्याळात १२ वाजले होते. महिला दिनाच्या शेवटी मिसेस कुलकर्णींच्या चेहेऱ्यावर अगदी छान हसू उमटलं होतं...

8 comments:

sahdeV said...

good one... तू "मैत्रीण","सखी","मधुरा" अशी मासिकं फार वाचतोस का? की त्यांच्या writers team मध्येच आहेस? :p

चांगलं लिहिलंयस...

Sushant said...

@ Vedhas- Thanks!
तू कौतुक करतोस का उपहासात्मक टीका, कळतच नाही!

Karan said...

khaas re mitraaaa...
faar sundaar...
back in form mhanava laagel..

chya aila..evadhe saadhe vishay..tu interesting karun kasa kaay lihu shaktos..

sahi e bosss....

Shashwati said...

:P :P lai bhari!!!

Gaurav Patil said...

I agree with your frd Sahdev , tu kharach मैत्रीण","सखी","मधुरा" अशी मासिकं फार वाचतोस का?.........

Archie said...

hey khupach sahi.. :)

Unknown said...

Beshtt!!

Abhijeet Kulkarni said...

shabbas re !!