Monday, March 8, 2010

समृद्ध चैतन्य

समृद्ध आणि चैतन्य. दोघांचाही जन्म ७ मार्च, १९८१ साली झाला. तोही एकाच वेळी. त्यांची जन्मवेळ सकाळी ११ वाजून,८ मिनिटं आणि ३३ सेकंदाची! खरंतर दोघांचा तसा काहीच संबंध नाही. समृद्धचा जन्म पुण्याचा, तर चैतन्याचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लाटघरचा. दोघात फक्त एकचं काय ते साम्य होतं. एकाच क्षणी जन्म झाल्याने, त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते.
आज रविवार, दि. ७ मार्च, २०१०. दोघांचाही आज २९ वा वाढदिवस.

समृद्ध देशमुख. गोरा,उंचापुरा, देखणा. पोट थोडंसं सुटलेलं. लकाकणारे तपकिरी डोळे आणि त्यावर Professional look देणारा चौकोनी काचांचा चष्मा. समृद्ध एका Investment firm मधे Financial Analyst. अतिशय तल्लख बुद्धीची देणगी लाभलेला समृद्ध सध्या कॅलिफोर्निया, USA . मधे स्थायिक झालेला. गेल्याच वर्षी त्याने स्वतःचं असं घर विकत घेतलं होतं. बुद्धीच्या जोरावर शेअर मार्केटमधून त्याने बराच पैसा कमावला होता.

सकाळी जाग आली. त्याने घड्याळात पाहिलं.१०:४१ झाले होते. काल रात्री ‘Birthday Celebration'साठी मित्रांबरोबर पबमधे गेला होता. तिथे घेतलेल्या scotch चा hangover अजून होता. डोकं थोडं दुखत होतं. त्याने त्याच्या Apple Macवर शेअर मार्केट check केलं. त्याला $४२४५ चा फायदा झाला होता. त्याच्या चेहेऱ्यावर हास्याची बारीकशी लकेर उमटली आणि लगेच मिटूनही गेली. त्याने त्याचा i-phone check केला. आईचे २ missed calls होते. 'Happy Birthday' wish करायला असतील, असा विचार करून, आवरून झाल्यावर घरी फोन करायचा असं त्याने ठरवलं.

समृद्ध एवढ्या मोठ्ठ्या घरी एकटाच राहत होता. २ वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याची बायको, मीना, जर्मनीत PhD करत होती. हे तिचं शेवटचं वर्ष होतं. कालच संध्याकाळी त्यांचं एका छोट्याश्या कारणावरून मोठ्ठं भांडण झालं होतं. त्याला काही मीनाला फोन करावासा वाटत नव्हता आणि तिचाही आला नव्हता. भुकेमुळे पोटात गरम वाटून ते दुखू लागल्याने तो आवरायला म्हणून उठला. खोलीत बराच पसारा झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि आता लवकरच तो आवरला पाहिजे असं त्याने ठरवलं. त्याने कधी नव्हे ती आज त्याच्या पांघरुणाची घडी घातली. तोंड धुतलं आणि नाश्ता तयार करायला सुरुवात केली.

त्याने केलेला चहा कपात ओतताना थोडा बाहेर सांडला. त्याला आईची आठवण आली. सॅंडविचेस तयार करताना त्याला मीना आठवत होती. सगळ्या बाजूंनी सारखा आणि काहीसा खरपूस असा मीना भाजते तसा ब्रेड त्याला नाही भाजता आला. ती सॅंडविचेस आणि चहा घेऊन तो सोफ्यावर येऊन बसला. त्याने त्याचा 47 inches, Flat screen, LCD TV सुरु केला आणि Basketball match बघत खाऊ लागला.

खाऊन झाल्यावर घरी फोन करू म्हणून त्याने फोन घेतला, पण डोकं अजूनही थोडं बधीर होतं. छान गरम पाण्याने आंघोळ करून, fresh होऊन मग घरी फोन करूयात असं त्याने ठरवलं.

आज रविवार असल्याने कसलीच घाई नव्हती. त्याने टब बाथ घ्यायचं ठरवलं. पाणी तयार केलं. सगळे कपडे उतरवले आणि त्या टबात स्वतःला झोकून दिलं. त्या गरम साबणाच्या पाण्यात त्याला खूप बरं वाटलं. अंगावर काही नसल्याने छान हलकं वाटत असावं असा विचार त्याच्या मनात आला. मग अंगावर उरलेली शेवटची वस्तू, त्याच्या बोटातली अंगठी त्याला जास्तच जड वाटू लागली. त्याने तीही मग बाजूला काढून ठेवली.

आता त्याला खरंच fresh वाटत होतं. मेंदूची बधिरता हळूहळू उतरत होती. ते गरम पाणी त्याच्या body cells charge करत होतं. त्याची विचारचक्र सुरु झाली. 'आज आपला वाढदिवस आहे. आज खूप special दिवस आहे.' असा त्याने विचार केला आणि तो त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार करू लागला. त्याला आधी त्याच्या सगळ्या achievements आठवल्या. १० वी, १२ वीतलं घवघवीत यश, एका प्रतिष्ठित Engineering College मधे मिळालेली admission, राष्ट्रस्तरीय Project competition मधला प्रथम क्रमांक, MBA entrance मधे पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं अचंबित करणारा यश..MBA Finance आणि आता गलेलठ्ठ पगाराची नोकरी..त्याने विचार केला, 'याला म्हणतात 'कमावणं'!.. असंच लढत राहिलं पाहिजे..' मग त्याने आयुष्यातल्या अपयशांचा विचार करणं सुरु केलं. त्याला काही सुचलंच नाही. फक्त खूप वेळा ठरवून आपण नियमितपणे व्यायाम करू शकलो नाहीये आणि gym ची फी वाया घालवलीय याची थोडीशी खंत वाटली, एवढंच. पण 'ही काही मोठी गोष्ट नाहीये. लवकरच पुन्हा सुरु करू' असा विचार त्याने केला. आणि gym ची वाया गेलेली फी तर त्याच्यासाठी मुळीच मोठी गोष्ट नव्हती. हे सोडून बाकी काही अपयश त्याला आठवलं नाही. मग असेच मनात random विचार आणि आठवणी येऊन गेल्या... १०वीत बोर्डात आल्यामुळे बक्षीस म्हणून मिळालेला त्याचा पहिला computer आठवला. आणि त्यावर मग सुट्टीभर दिवस-रात्र कसे गेम्स खेळत बसायचो..हे आठवलं.. Engineeringमधे मित्रांबरोबर प्यायलेली पहिली beer आठवली. ऑफिसमधून घरी येताना तो नेहेमी त्याच्या ipod वर गाणी ऐकत येतो. त्यातल्या एका गाण्याची tune त्याच्या डोक्यात वाजू लागली. Facebook मधल्या त्याच्या 'Childhood' नावाच्या अल्बम मधला एक फोटो त्याला आठवला..ह्या सगळ्या विचारांचे अर्थ त्याला कळत नव्हते. मग त्याला emails check इच्छा झाली म्हणून तो टब मधून उठला.

त्याला एक ‘New Mail’ दिसला. त्याचा Payment direct deposit झाल्याची ती receipt होती. सवयीप्रमाणे त्याने तो ‘Payments’ folder मधे transfer केला. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. दुपारचे २ वाजले होते. आई आता झोपली असेल हे त्याला जाणवलं. तिला फोन करायचा राहून गेला होता. त्याच्या उजव्या पापणीच्या कठड्यावरून एक पाण्याचा थेंब हलकेच खाली घरंगळला. त्याने खिशातून रुमाल काढला. त्या चुरगळलेल्या रुमालाने त्याने तो गालावर आलेला थेंब पटकन पुसला…


चैतन्य खोत. कुरळ्या केसांचा, गव्हाळ रंगाचा, मध्यम उंचीचा आणि पिळदार शरीरयष्टीचा हा एका कोळ्याचा मुलगा. त्याने रत्नागिरीत B.com केलं आणि आता मासेमारीच्या व्यवसायात आहे. ह्याचे वडील जरी कोळी असले तरी ह्याने स्वतःच्या हिम्मतीवर बँकेतून कर्ज काढून एक छोटीशी बोट विकत घेतली आणि मासेमारीचा व्यवसाय सुरु केला. कोळ्यांना त्या बोटीतून मासेमारी करायला पाठवायचं आणि आलेले मासे मार्केटमध्ये विकायचे हा त्याचा धंदा. आज त्याच्याकडे स्वतःच्या ३ बोटी आहेत. हा लाटघर मधेच स्थायिक आहे. छान कौलारू घर, मागे नारळ-पोफळीची बाग, ३ काजूची आणि २ आंब्याची झाडं आणि घरासमोर अंगणात एक मोठ्ठं जांभळाचं झाड. चैतन्यचं लग्न काहीसं लवकर, म्हणजे तो २४ वर्षांचा असतानाच झालं..

आज दि. ७ मार्च, २०१० रोजी ह्याचाही वाढदिवस. सकाळी ५ वाजता उठून चैतन्य आणि त्याची बायको सुलेखा, टेकडीवरच्या देवळात जायला निघाले. सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात सूर्य नुकताच त्याला 'Happy Birthday' wish करायला आला होता! सर्वत्र केशरी-पिवळ्या कोवळ्या किरणांची उधळण चालू होती. त्यातली काही किरणं चैतन्यच्या डोळ्यांचे चटाचट मुके घेत होती. टेकडीच्या माथ्याशी असलेल्या देवळात कीर्तन चालू असल्याने टाळ, मृदुंग, चिपळ्यांचे हळुवार, काहीसे अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. दूरवरून येणाऱ्या मधुर बासरीचे स्वर त्यात मिसळले होते. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. कळसावर फडकणारा तो भगवा, चैतन्यला खुणावत होता. त्या दोघांच्या चालीला गती देत होता. जसजसे ते माथ्याजवळ जायला लागले तसे ते टाळ मृदुंगाचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले. आजूबाजूला निलगीरींचा वास दरवळत होता. देवळात चैतन्यने एकदा खणखणीत घंटा वाजवली आणि गणपतीसमोर साष्टांग घातला. चैतन्यचं कपाळ त्या गार फरशीला टेकलं आणि त्याच्या आजूबाजूची प्रसन्नता दुप्पटीने वाढली..

खरंतर समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना समुद्राचं अप्रूप नसतं.पण आज चैतन्यला समुद्रात भिजावंसं वाटलं. सुलेखाला पुढे पाठवून तो समुद्रात गेला. काही वेळ मनसोक्त पोहून झाल्यावर त्याने मग डुंबायला सुरुवात केली. येणारी प्रत्येक लाट तो पाठीवर घेऊ लागला. जणू ती प्रत्येक लाट त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थापच देत होती! सूर्य आता थोडा वर आला होता. काहीशा प्रखर पण तरीही खूपशा कोमल अशा सूर्याकडे त्याने पहिले आणि नंतर डोळे मिटून पाण्यावर तरंगायला लागला. हे सगळं चालू असताना त्याच्या मनात ना कुठला विचार होता, ना कुठली आठवण होती, ना कुठली चिंता होती..
तो फक्त आनंदित होता. स्वतःवर आणि सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर. २ तास मनसोक्त डुंबून झाल्यावर तो घराकडे जायला निघाला.

घरी त्याच्या आवडीचं कोलंबीचं कालवण, पापलेट फ्राय, दशमी आणि सोलकढी असा बेत होता. घरी जाताना त्याने मार्केटमधून Payment collect केलं. ते होतं समृद्धच्या biweekly paycheck च्या फक्त एक दशांश..

घरी आल्यावर आजीने त्याला ओवाळलं. मग काकीने, मग सुलेखाने आणि मग आईने. आईने जेव्हा त्याच्या कपाळाच्या मधोमध मोठ्ठं उभं गंध लावलं तेव्हा त्याचे डोळे मिटले गेले. त्याला जणू गणपतीला पुन्हा साष्टांग घातल्यासारखा वाटलं. त्याने डोळे उघडले. आईच्या डोळ्यातला अभिमान आणि ओसंडून वाहणारं कौतुक बघून त्याच्या उजव्या डोळ्यातून एका पाण्याच्या थेंबाने पटकन गालावर उडी मारली! कोणाच्या हे लक्षात येऊ नये म्हणून त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्या पांढऱ्याशुभ्र, कडक इस्त्रीच्या रुमालाने भरकन ते पाणी पुसलं..

त्या दोघांच्यात फक्त एकच काय ते साम्य होतं. त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते..

15 comments:

Unknown said...

khup aavdala dada..

Unknown said...

good one..:)

Amod said...

taral vicharani samrudha ani anand dayi chaitanyani sampanna asa lekh ahe!! keep going

varada said...

mast jamala ahe.....

Sushant said...

@ Parvez, Mugdha, Varada-
Thank you :)
@ Amod- :D LOL

Archie said...

amazing!!...you got that right :)

Ajinkya Kale said...

Chan lihilays re!

Gaurav Patil said...

sahi ahe bho.......
1...samrudha ani chaitanya..............doghana navapramane nyai dela ahes mitra......
2...त्या दोघांच्यात फक्त एकच काय ते साम्य होतं. त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते.......gr8 level of thinking.....

Shivali Parchure said...
This comment has been removed by the author.
Shivali Parchure said...

zakasss...... ha lekh sampuch naye asa vatat hota........ asach samya aplyat ani ajun kunat suddha asel na......
keep gng....

Abhijeet Kulkarni said...

Ata ya lekhaabaddal kaay bolaava !! itke saral jyala rojchya marathit "DAY to DAY LIFE" chya ghatanaanmadhun itke aprateem shabdachitra ubhaarlela vaachtaana ekdum "Laaiiii Bhaariiii" watta

Namrata said...

chhan ahe lekh..... :)

Prachi said...

FARACH KHARA LIHILA AHES... AVADLA..

kunal said...

jamalay......

Amruta Gandhe said...

Farach mast..kiti detailing kela ahes are! simply awesome :-)