Wednesday, February 10, 2010

I Love You रस(ना)!

परवा दात घासताना आरशात बघितलं आणि वजन खूप वाढल्याचा अचानक साक्षात्कार झाला! थोडा मागे सरकलो आणि पोटाकडे बघितलं. आणि...बघतच बसलो! २ वर्षांपूर्वीचं एक दृश्य डोळ्यासमोर आलं..आई मला कणीक मळायला शिकवत होती..! हेच दृश्य नेमकं का आठवावं हे कळायला वेळ लागला नाही! मी पोटाला हात लावला आणि त्या दिवशी 'फक्त भातच जेवायचा' असं ठरवलं!!

खूप लाज वाटली स्वतःची..वाटलं किती unhealthy खातोय. कसलीच शिस्त नाही. मनाचा निग्रह नाही. वाईट सवयींच्या आहारी जातोय. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनींचा किती ताबा असायचा मनावर.. केवढी ती तपश्चर्या..केवढी ती साधी राहणी.. अगदी साधं जगणं पाहिजे माणसाचं. अलिप्त जगता आलं पाहिजे. कशाचा मोह नको. कशावर अवलंबून राहता कामा नये.. छे, छे! फारच चुकतंय..

चहा प्यायला बसलो आणि मित्र म्हणाला, "अरे, हे बिस्कीट घे ना. आजच पार्सल आलंय. आईने कणकेची बिस्कीटं पाठवलीयत..!" पुन्हा 'कणीक'...! परत तेच दृश्य. मी कणीक मळतोय आणि आई म्हणतीय, " अरे, थोडं पीठ घाल. पाणी जास्त झालंय.." बास! ठरवलं! आज खेळायला जायचं! असं ठरवून मी फोनाफोनी सुरु केली..बरेच जण तयार झाले. संध्याकाळी जिममध्ये जाऊन आधी बॅडमिंटन आणि मग बेसमेंटमध्ये क्रिकेट, असा प्लॅन ठरला..

लोकांना क्रिकेटचा मोह आवरला नाही. सगळे क्रिकेट खेळायला बेसमेंटमध्ये गेले. पण मी ठरवल्याप्रमाणे आधी बॅडमिंटन खेळायला गेलो. चांगल्या खेळणाऱ्या लोकांना तिथे बघून आनंद झाला..असंच warm up न करता बॅडमिंटनची पहिली मॅच खेळायला उतरलो. ‘या कणकेचा आता ८ बिस्किटांचा पॅकच बनवायचा!’ जणू याच जोशाने खेळलो! २० मिनिटं चालली असेल मॅच आणि जी काही धाप लागली.. ब्रम्हांडच आठवलं! शर्ट पूर्ण ओला..घामाच्या धारा लागल्या होत्या.. तोंड पूर्ण लाल झालं होतं..डोकं आणि डावा पाय ठणकत होता..हृदयाची वाढलेली धडधड..गरगरायला लागलं..जोरजोरात श्वासोश्वास..बाहेर येऊन आधी बूट काढले.. घाम पुसला आणि गटागटा पाणी प्यायलो..!

मग क्रिकेट खेळणं तर शक्यच नव्हतं! खाली बाकावर बसून मित्रांचा खेळ बघत बसलो..अजूनही माझी धाप गेली नव्हती..थोडं गरगरत होतं..एवढं पाणी प्यायल्याने तहान पूर्ण भागली होती आणि भूकही गेली होती. अक्षरशः मेल्यासारखा बसलो होतो मी! कसलीच इच्छा वाटत नव्हती..मित्र फारच रंगात येऊन खेळत होते. अगदी enjoy करत होते. कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं..क्षणभर वाटलं..आपलं काही अस्तित्वच नाहीये! मनात विचार आला..समजा आत्ता माझं काही अस्तित्वच नसतं किंवा आत्ता मी जिवंतच नसतो तर..! मी imagine करू लागलो..मी एक मेलेला माणूस आहे आणि आत्ताचा मी म्हणजे माझा आत्मा आहे, जो आपल्या मित्रांचा खेळ बघत बसलाय.. मग जर मी आत्मा असीन, तर मला कसलीच इच्छा नसेल. त्यांच्यात खेळताही येणार नाही..फक्त काय ते बघत बसायचं...मग विचार केला..हे सगळे आता खेळ झाल्यावर निघून जातील..एकमेकांशी गप्पा मारतील..जोक्स मारतील..एकमेकांची खेचतील..मला काहीच करता येणार नाही..मग घरी जाऊन जेवतील..मला भूकच नसेल..नुसतं बघत बसावं लागेल..मग हे मस्तपैकी झोपी जातील..मला कशी झोप येईल? सतत जागाच असीन मी! नुसताच भटकत असीन… एवढंच काय, तर कधी समोर पुरणपोळी, बासुंदी, आम्रखंड किंवा पाव-भाजी, भेळ, वडापाव यातलं काहीजरी आलं, तरी खावंसं वाटणार नाही..कधी आयुष्यात धडपड करून काही मिळवावसं वाटणार नाही..हसता येणार नाही.रडताही येणार नाही.. कधी आनंद होणार नाही. कधी दु:ख होणार नाही. राग नाही, लोभ नाही, आदर नाही, कौतुक नाही..सगळ्या इच्छाच मरतील! म्हणजे उद्या कैतरिना कैफ किंवा नटरंगची 'अप्सरा'.. (नवी) सोनाली कुलकर्णी समोर येऊन म्हणाली, "तुम्हीच हो स्वामी! तुम्हीच! मला वरमाला घाला!" तर मी म्हणेन, "असू देत , असू देत..मला काही वाटत नाही तुझ्याबद्दल..दुसरा कोणीतरी शोध!" बापरे..!! काहीही काय?!..... तेवढ्यात मला मित्रांनी हाक मारली.."अरे, कुठल्या जगात आहेस?" ते माझ्याशी बोलतायत हे कळल्यावर त्या क्षणी मला इतका आनंद झाला सांगतो..! मला खरंच जिवंत असल्याची किंमत कळली...!

जिमवरून घरी येईपर्यंत इतकं हलकं-फुलकं आणि छान वाटत होतं..आपण म्हणतो, इच्छा-आकांक्षांने माणसाला गुलाम बनवला आहे..त्या त्याने त्यागल्या पाहिजेत..अहो, पण त्यागून करायचं काय? मंदिरात घंटा वाजवत बसायचं?! तीसुद्धा वाजवाविशी वाटणार नाही! अहो मोजून श्वास दिलेत तर अगदी हसत खेळत दमदार घेऊयात की! असं म्हणतात, माणूस अपेक्षा ठेवतो. म्हणून दु:खी होतो. त्यामुळे त्याने अपेक्षाच ठेवू नयेत. मी म्हणतो, होऊ देत ना दु:खी. अपेक्षा पूर्ण न झाल्याने जेवढं दु:ख होईल, तेवढाच आनंद अपेक्षा पूर्ण झाल्यावर होईल! पुरवू देत जिभेचे चोचले..खाऊ देत गोड-धोड, चमचमीत. जरी ते unhealthy असलं, तरी जेव्हा आरशात तो स्वत:चा कणकेचा गोळा बघेल, तेव्हा झक मारत व्यायाम करायला लागेल! माणसाचं आयुष्य कसं असं रसरशीत हवं! जीवनरसयुक्त! मग त्याला 'कॉमन मॅन' म्हटलं गेलं तरी चालेल..अहो, हीच तर असते माणूस असल्याची खूण! सगळ्याचा त्याग करून, सन्यास घ्यायला जन्म मिळतो का?

परवा मंगेश पाडगावकरांवर टीका झाली. का, तर म्हणे त्यांना पद्म पुरस्काराची इच्छा होती..अपेक्षा होती..हाव होती..का नसावी? आणि ती आहे, म्हणूनच त्यांच्यात अजूनही एक मिश्कील माणूस जिवंत आहे. आणि त्यामुळेच कदाचित मराठी साहित्यात एवढी मोलाची भर पडलीय..त्यांच्याच कवितेच्या या ओळी..

'अरे खूप मिळालं
तरी खूप हवं असतं
कारण प्रत्येकवेळी
सुख नवं असतं
आणि असं वाटणं हेही
माणूसपणाचंच लक्षण असतं!'

आम्ही घरी आलो. ग्लासमध्ये ऑरेंज ज्यूस ओतला. काही वर्षांपूर्वीची ती 'रसना' ची जाहिरात आठवली. ती एक गोड मुलगी त्यात म्हणते, ' I Love You रसना'.. तो ज्यूस त्यावेळी मला अगदी अमृतासारखा अवीट गोड वाटला.. मला माझ्या जीवनरसाला उद्देशून म्हणावसं वाटलं..'I Love You रस(ना)!'

11 comments:

Unknown said...

Hi Sushant..masta blog ahe..ekdum manatla lihila ahes saglyanchya.....mhanje ase vichar pratyekachya manat sahaj yeun jat astat...but u have really expressed it in an awesome way...:)

Ajit Kane said...

hmm.. gym talayla evadha justification?? :P

Sushant said...

:) thank you Mugdha!

@ ajit- नाही रे! 8 बिस्किटांची इच्छा अजूनही..!

Prachi said...

ASHAKYA BHARI AHE... MHANJE NAHICH.. MALA FARACH AVADLA.. ATA HA MAZA SAGLYAT AVADTA AHE ..HEHE..

Archie said...

I know weight lose karnya sathi khup determination lagte.. tysathi lagnare kashta mahit zale ki..instead of losing weight let's enjoy the life bolale ki bare vatate..lol.. :)..Good one!

Sushant said...

Ag Archana tai..asa nahiye artha hyacha! tula sandhyakali phone karto..bolu mag..

Sushant said...

@ Prachi- :) Dhanyawaad...

Ajit Kane said...

by the way, tuzya blog chi template Mughalai madhali watate.. :P

Shashank Kanade said...

ययाती मधले मंदार-मुकुलिका व्हायचं
का बुद्ध व्हायचं,
तुम्हीच ठरवा!

आणि लेका, वजन कमी कसलं करतोस, संपत्ती आहे ती. इथे १ पाउंड वजन वाढवताना नाकी नऊ येतायत.

Nachiket said...

g1 rasrashit karaachyacha ka dry-fruit he jyachya tyachya jeebhewar aahe ..
post waachun bara waatala... ki tu potakade baghtoyes swatahachya :D

Mihir Khadilkar said...

उत्तम लेख ! - मीही याच्यावर विचार केला आहे.. तू केलेल्या statements शी मी technically सहमत आहे.. पण यातला धोका असा आहे की अनेक लोक याचे अनेक अर्थ लावतात आणि त्या दृष्टीने तशी ती misleading आहेत.. पण आपला स्वतः चा हेतू आपण पारखून घेतला म्हणजे झाले ! - good one !