Saturday, February 6, 2010

Happy Farming!

नमस्कार मंडळी! मी जिवा..अहो, तो शिवाजी महाराजांचा जिवा महाला नाही काही! जिवा-शिवा बैलजोडीतला जिवा. आमच्या धन्याने आम्हाला जरा विश्रांती दिलीय. शिवा गेलाय पाणी प्यायला. येईलच इतक्यात. तेवढ्यात म्हटलं जरा तुमच्याशी बोलून घेऊ..

हा आमचा नवा धनी. त्याचं नाव शिवाजी. त्यामुळे मीसुद्धा शिवबाचा जिवाच आहे म्हणा ना! त्याची बायको आलीय कांदा आणि भाकरी घेऊन. त्यामुळे आम्हालाही चरायला सोडलंय त्याने. इतकं हायसं वाटतं सांगतो, पाठीवरून जरा नांगर उतरला की..हल्ली अहो, मान आणि पाठ जरा दुखायला लागलीय माझी..आणि दिवसभर नांगरलं की शिवाचा पुढचा उजवा पाय दुखतो. पण चालायचंच. आमचा धनी आमच्यावर खूप माया करतो. त्यामुळे काही वाटत नाही थोडे जास्त कष्ट करायला. नांगरणी चालू आहे सध्या. मग पेरणी होईल. पाऊस होऊ देत चांगला म्हणजे झालं. अशी तरारून येतात पिकं तुम्हाला सांगतो! आम्ही सगळ्यांनी मिळून गाळलेल्या घामाचं जणू सोनंच होतं!

आमच्या धन्याच्या मुलीचं, म्हणजे तायडीचं, लग्न करायचं म्हणतायत. त्यामुळे आम्ही जोमाने नांगरणी करतोय. पावसाच्या आधी पेरणी व्यवस्थित झाली पाहिजे ना..आमची तायडीपण अगदी गुणाची पोर बरंका! तिचंही खूप प्रेम आहे आम्हा दोघांवर. रोज झोपायच्या आधी गोठ्यात येऊन आमच्या दोघांच्या पाठीवरून हात फिरवते ती..आणि आमच्या वाढदिवसाला तर आमचे सगळ्यात जास्त लाड तीच करते! आमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. अहो, आमच्या दोघांचाच काय, सगळ्याच बैलांचा! तिथिनी येतो आमचा वाढदिवस. श्रावणातल्या पिठोरी अमावस्येला. 'बैल पोळा' म्हणता तुम्ही त्याला. त्यादिवशी आम्हाला सुट्टी असते. पहाटे उठून धनी आम्हाला नदीवर घेऊन जातो आणि आंघोळ घालतो. मग तायडी आमची शिंग रंगवते. अंगावर गेरूचे ठिपके काढून झूल चढवते. गळ्यात सुताच्या माळा आणि घुंघरं घालते. आम्हाला धनी नवी वेसण घालतो. आमच्या वाढदिवसाला पुरण-पोळीचा बेत असतो! खूप खूप मजा येते..

काही वर्षांपूर्वी आम्ही 'जिवा-शिवाची ही बैलजोडं...' हे गाणं ऐकलं. वाटलं, अरे वाह! आपल्यावर कोणीतरी गाणं लिहिलंय! पण नंतर कळलं की त्या गाण्यावरनंच आमची नावं ठेवलीयत! तरीपण आम्ही म्हणतो की ते आमचं ‘title song’ आहे!

हल्ली म्हणे अख्खं जगंच शेती करायला लागलंय! Facebook वरचं Farmville खेळून! लोकं वेगवेगळ्या भाज्या काय लावतायत! फळं काय लावतायत! प्राणी काय पाळतायत! चांगली गोष्ट आहे! मी शिवाला परवा सांगितलं की अरे माऊसच्या एका क्लिकमध्ये एक फूटभर नांगरून होतं त्यात..! तर तो उडालाच! मग त्याला म्हणालो अरे ती काही खरी शेती नसते काय.. 'Virtual शेती' असते. असंच खोटं खोटं खेळायचं. पण त्याला ही concept काही शेवटपर्यंत कळलीच नाही! असो..

पण तुम्हाला सांगतो, इतकं सोपं नसतं हो शेती करणं. खूप कष्टाचं काम आहे आणि वर पाऊसही पडला पाहिजे. म्हणजे नशिबाचा भाग हा आलाच..आमचा जुना धनी होता ना काशीनाथ, त्याच्याकडे नशिबाने साफ पाठ फिरवली. नाही करू शकला शेती. गळफास लावला त्याने..काल त्याची पुण्यतिथी होती. शिवाला त्याची फार आठवण येत होती. काल त्याचा मूडच नव्हता. नांगरवतच नव्हतं त्याला. मला म्हणाला, "काशीनाथ आठवतोय रे..केवढा हसतमुख होता..गेला सोडून..मरायचं वय तरी होतं का रे त्याचं..? मलापण जगावंसं वाटत नाही बघ..पण मरताही येत नाही स्वत:हून.." आता यावर काय बोलायचं? त्याला मी समजावलं. त्याला म्हणालो, "अरे असं होतं आयुष्यात.. जवळची माणसं निघून जातात. पण आता शिवाजी, त्याची बायको, तायडी हेच आपलं कुटुंब. काही कमी माया मिळतीय का सांग बरं? उलट शिवाजीने आपल्याला विकत घेऊन काशीनाथच्या घरच्यांना आधारच दिलाय. आणि शिवाजीचा दुसरा काशीनाथ होऊ न देणं ही आपल्या दोघांचीच जबाबदारी नाहीये का?" त्याला बहुतेक ते पटलं असावं. आम्ही दोघं मग एकमेकांना 'All izz well' म्हणालो आणि पुन्हा नांगरायला लागलो..

संध्याकाळी शेजारच्या गोठ्याच्या दोन गायी आल्या होत्या चरायला. शेवंती आणि जास्वंदी. शिवाला म्हणालो, " चल, गोरीपान शेवंती तुझी, जास्वंदी माझी! काय म्हणतोस, बोल?" त्यावर खुदकन हसला! म्हणाला, "तू शेवंतीसाठी प्रयत्न जरी केलास ना, तरी तुला ती काही मिळायची नाही! तुझ्या league च्या बाहेर आहे रे ती!" म्हणालो, "जा रे! बघूच आपण..तू काय स्वत:ला हृतिक रोशन समजतोस की काय!" तर म्हणाला," हृतिक नाही रे, शाहरुख! मी ‘boy next door’ आहे!"

पण रात्री काही केल्या झोपच लागत नव्हती. काशिनाथची आठवण येत होती..आणि काम करायची इच्छा नसूनही काम केल्याने खूप दमछाक झाली होती. आवंढाच घेता येत नव्हता.. घश्याखाली उतरतच नव्हता.. तेवढ्यात तायडी आली. तिनी मिठी मारली आणि पाठीवरून हात फिरवून निघून गेली. बैल पोळ्याला आम्हाला ओवाळून झाल्यावर तायडी हात जोडून, डोळे मिटून नमस्कार करते. आणि जेव्हा ती डोळे उघडते ना..तेव्हा दोन्ही डोळ्यात पाण्याचा एक एक थेंब असतो तिच्या. ते आठवलं..आणि त्या दोन थेंबांसाठी घामाचे कितीतरी पाट वाहायचं बळ अंगात आणलं पाहिजे हे जाणवलं. शिवालाही तसंच काहीसं वाटलं असेल..कारण तो गुणगुणत होता..'बळ दे झुंझायला, किरपेची ढाल दे..इनवती पंचप्राण जिव्हारात ताल दे...'

अरे! आला बघा तो! शंभर वर्षं आयुष्य आहे त्याला! चला मी निघतो..तो लंगडतोय बघा कसा! पुढचा उजवा पाय दुखतोय त्याचा. "म्हातारा झालास रेSSS ..शिवा!' चला मंडळी, निरोप घेतो तुमचा. पुन्हा भेटूच...आणि हो...'Happy Farming!'

9 comments:

Unknown said...

thanks for sharing such an awesome... lucid and beautiful writing...:) keep writing...

kunal said...

bhari...zakas...kay nimmit zala he suchayalla...:D

Unknown said...

Masta!!!! Ekdum chaan aahe.... Asach lihit ja ani kalvat ja....

Makarand MK said...

"शेतातील बैलाचे आत्मवृत्त" शाळेत असताना निबंध असायचे ना तसं वाटलं !!!
पण छानच लिहिलं आहेस. नाही शाळेतल्या निबंधाची उपमा दिली म्हणून गैरसमज व्हायचा :P
इतक्या विविध विषयांना स्पर्श करून एक धागा, सुसूत्रता ठेवलीस ते आवडलं.

varada said...

Khoop chhan sushant... I love reading your blog....

Archie said...

Sahi chan lihtos ree!!

Sushant said...

@ All- thank you so much!:)
तुम्ही सगळे नियमितपणे वाचून प्रतिक्रिया कळवता..त्याने लिहिण्याची स्फूर्ती येते.

@ Kunal- no idea! काय कारण होतं.. :)

Prachi said...

masta!!

Shivali Parchure said...

ekdam zyakk.... barech subjects ektra mast handle keles.... keep writng....