Sunday, February 28, 2010

दिल तो बच्चा है जी!

व.पु.काळे म्हणतात, 'गरुडाचे पंख कबुतराला लावता येतीलही. पण गरुडभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढ उसनी आणता येत नाही...' पण समजा, एका गरुड दांपत्याने एका कबुतर पिल्लाला दत्तक घेतलं आणि त्याला हे कधी कळूच दिलं नाही की 'तू एक कबुतर आहेस'. जर त्याच्या नातेवाईकांनी, भावंडांनी, मित्र-मैत्रिणींनी, कोणीच त्याला हे सांगितलं नाही किंवा जर आयुष्यात त्याला कधीच फुटक्या आरशाचा तुकडादेखील सापडला नाही, की ज्यात तो स्वतःला बघू शकेल..तर ते कबुतराचं पिल्लू स्वतःला गरुडच समजायला लागेल! त्याच्या आई-वडिलांप्रमाणे, भावा-बहिणीप्रमाणे तेही गरुडभरारी घ्यायचा प्रयत्न करेल. 'आपण गरुड आहोत. आपल्याला हे जमेलच.' ही भावनाच त्याच्या पंखात बळ देईल. त्याच्या रक्तात गरुडभरारीचं वेड जन्मतःच नसलं, तरी या विश्वासाने ते त्याच्या रक्तात भिनेल. त्यालाही मग आकाशाची ओढ निर्माण होईल. आणि जरी तो कधी पक्ष्यांचा राजा होऊ शकणार नसला, तरी कबुतरांचा राजा होण्याची क्षमता त्याच्या अंगी नक्की येईल!

एखाद्या चांदण्यारात्री पारिजातकाने अंगणभर कधी तिच्या फुलांचा सडा घातला असेल आणि त्या फुलांनी अंगणात खेळता खेळता वर बघून जर आपल्या जन्मदात्रीला विचारलं, "आई, या आकाशातल्या चांदण्या किती सुंदर आहेत! आम्ही का नाही ग इतक्या सुंदर झालो..?" तर त्यावर त्या झाडाने उत्तर द्यावं, "अगं वेडयांनो! तुम्हीच तर आहात त्या! आकाशात एक मोठ्ठा आरसा असतो. त्या सुंदर चांदण्या, म्हणजे तुमचंच त्या आरशातलं प्रतिबिंब! केवढ्या सुंदर आहात तुम्ही...!" खरंतर केवढी त्या फुलांची फसवणूक! कुठे त्या तेजस्वी चांदण्यांचे कोट्यावधी वर्षे आयुष्य आणि कुठे या सौम्य फुलांचे काही तासभर..पण असं फसवून जर ती फुलं त्यांचं मोजकं आयुष्य स्वतःवर खूष होऊन आनंदात आणि हसत -खेळत जगणार असतील..तर धन्य आहे ती फसवणारी आई..!

मला नेहेमी वाटतं,डॉक्टरांनी कधीच पेशंटला याची कल्पना देऊ नये की तो किती आजारी आहे..त्याला साधी सर्दी झाली असली काय किंवा अगदी असाध्य आजार झाला असला काय..'अरे काही नाहीये. लवकरच बरा होणार आहेस तू' हेच वाक्य असावं डॉक्टरांचं! कारण 'आपण नक्की बरे होणार आहोत' हा विश्वासच त्याला पूर्ण ताकद देतो, त्या आजाराशी लढण्याची. पण एकदा का त्याला त्याच्या आजाराचे details कळाले, मग या stageला वाचण्याचे ‘chances’ कळाले, statistics कळाले, तर तो मनानेच इतका खचून जाईल की पूर्ण ताकदीनिशी लढायला त्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. या उलट जर खोटं सांगून 'नक्की बरा होशील' असा विश्वास त्याला दिला, तर हेच लढणं आपोआप होईल त्याच्याकडून. त्याचे मानसिक कष्ट वाचतील.

असं हे मनाला फसवण्याने केवढी शक्ती निर्माण होऊ शकते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्मघातकी अतिरेकी! कोण अनोळखी लोकांचा विनाश करायला स्वतःचा जीव गमावेल? पण त्यांचा धर्म, त्यांची शिकवण स्वर्गसुखाचा एवढा विश्वास त्यांच्यात बिंबवते, की ते मरायलाही तयार होतात! हा एवढा जास्त खोटा विश्वास जर या ऐवजी एखादं सद्कृत्य करण्यासाठी दिला, तर जगाचं सोनं होण्याखेरीज राहील का?

Managementमधेही या विश्वासाचं खूप मोल आहे. सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होणार नसली तरी सगळ्यांना स्वप्ने दाखवावीत. बुद्धिबळाच्या पटावरच्या राजाने त्याच्या प्याद्यांना म्हणावं, " तुम्ही माझे होऊ घातलेले वजीर आहात! तुम्ही निकराने लढून त्या शेवटच्या चौकोनात पोहचलात, तर तुमचं वजिरात रुपांतर होईल. आणि मग तुम्हीही पट गाजवू शकाल. माझ्या शेजारी असलेला हा वजीर कधी काळी तुमच्या सारखंच एक प्यादं होता..." का जीव तोडून लढणार नाहीत गडी?

मला वाटतं आपणही आयुष्यात असंच स्वतःला फसवत राहिलं पाहिजे! हा ‘3 Idiots’ मधला माझा favourite dialogue.."..उस दिन एक बात समझ में आयी| ये जो अपना दिल है ना, बड़ा डरपोक है यार| इसको बेवकूफ बनाके रखो|Life में कितनी भी बड़ी problem हो ना, उसको बोलो,"कोई बात नहीं चाचू, सब ठीकठाक है| All izz well!" "और उससे problem solve हो जाएगी?" "नहीं, लेकिन उसको झेलने की हिम्मत आ जाती है|"

आपलं मन हे खरंच एखाद्या लहान मुलासारखं असतं. आणि आपल्याला जन्मतःच त्याचं पितृत्व लाभलं असतं! आपल्या या 'मुलाला' चांगलं वळण लावण्यासाठी, त्याला तरबेज बनवण्यासाठी आणि आयुष्यभर आनंदी ठेवण्यासाठी त्याला असं अधून मधून फसवत राहावं लागतं.. आणि ते ही लहान असल्यामुळे फसू शकतं! काही लागलं, खरचटलं तर त्याला 'आल्ला मंतर कोल्ला मंतर..' करायचं..इच्छेविरुद्ध काही काम करायचं असेल तर त्याला, 'हा शेवटचा वरण-भाताचा घास खल्लास ना, तर संध्याकाळी एक चॉकलेट!' असं करायचं..पण आयुष्यात त्याला कधीच कसलं tension द्यायचं नाही. कधी घाबरला कशाला तर पाठीवर थोपटून 'All izz well' म्हणायचं! आणि तो आपलं नक्की ऐकेल..
आखीर, दिल तो बच्चा है जी...

12 comments:

Mayur said...

Nice to read..
I think 'Aal Iz Well' ni kharach, in reality,asa hot asla asta tar....

Shashwati said...

chan.. masta klihilay.. :)

Sushant said...

हक्काचे(जबरदस्तीने झालेले) वाचकहो! अभिप्रायाबद्दल(कौतुकाबद्दल) धन्यवाद! :)

Prachi said...

khup avadla...

Unknown said...

sushant...tu lihilays he??? khup chhan ahe....

Anjum's Arena said...

khup chan lihilayas....agdi khara khura..!! chan watala wachun

Archie said...

masta ahe..

kunal said...

मनाला असा फसवून ठेवण्याची सवय घातक ठरू शकते. त्याला आधून मधून परिस्थितीची वा वास्तवाचीजाणीव करून द्यायला पाहिजे. म्हणजे ते कठीण प्रसंगात स्वताचा तोल सावरू शकते. नाहीतर वास्तवाची जाणीव होईपर्यंत "आल इज़ वेल" म्हणत परिस्थिती पूर्ण हाताबाहेर जाउ शकते.

Sushant said...

@ Kunal
अरे असं झालं तर आपणंच सावरायचं त्याला..!

Gaurav Patil said...

sahi ahe bhava...........
asach lihat ja.........
I like the way you summarize the topic.........apratim!!!!!!!

Sarang said...

very nice !!

Meera said...

khup chhan lihila aahe aani vishaysuddhaa khup chhan aahe.
@मनाला असा फसवून ठेवण्याची सवय घातक ठरू शकते:मला तरी असं वाटत की असं फ़सवणच मनाला उभारि देतं.काहि काहि ठीकाणि सत्यता कळालि तर जगण्याच सगळं अवसानच गळून जातं.