Sunday, December 16, 2012

श्रीखंडाची गोळी

परवा असाच सुख:दु:खांना गुणत मी बसलो होतो.
हिशोब करत आयुष्याचा स्वेटर विणत बसलो होतो.

तेवढयात तिथे सत्तरीचा एक म्हातारा माणूस आला,
अगदी आजोबांसारखाच त्याने मला प्रेमळ लूक दिला!

त्याच्या हातात काठी,
माझ्या कपाळावर आठी!
माझं मन एकाकी,
त्याच्या डोळ्यांत लकाकी!

"काळजीत आहेस का पोरा?" विचारंत मोठठ्या स्माईलने हसला,
मला त्याच्या कवळीचा शेवटचा दातसुद्धा दिसला!

काय सांगू आजोबा.. म्हणत माझी सुख-दु:खं मी गुणून दाखवली,
खिशातून काढून त्यांनी चक्क, मला श्रीखंडाची गोळी चाखवली!

समजलंच नाही मग कधी आम्ही गप्पा सुरु केल्या,
त्यांचं बालपण, तारुण्यानंतर माझ्या बालपणावरसुद्धा झाल्या!

म्हणाले, आजी रागावेल.. अंधार पडला. आता मी जातो,
उदास नको राहत जाऊस, तुला एक कानमंत्र देतो

"गुणत नसतं राहायचं दोस्ता, गुणगुणत राहायचं बघ!
जेवढं मिळालंय आयुष्य, त्यात मजेत जग पहायचं बघ..!"

कोण जाणे त्यांची शिकवण किती परिणाम करून गेली होती,
जाता जाता माझ्या कपाळावरची आठी तेवढी त्यांनी नेली होती..

Thursday, December 6, 2012

झाडांची निंदा


नावं ठेवण्याच्या इच्छेचं धुकं
समस्त जीवांच्या मनात दाटत असतं
झाडा-फुलांना देखील गॉसिप करून
पिसागत हलकं वाटत असतं

लाजाळूला "introvert" असं लेबल लावलं जातं
बाभळी मग जरा जास्तच रुक्ष ठरते
गप्पा मारताना कुणाहीबद्दल बोललं 
तरी माणसांसारखेच झाडांचेही पोट भरते 

"वडाला काही हेअर स्टाइल सेन्स नाही.."
बिचाऱ्याच्या पारंब्यांवर बोललं जातं
"पिंपळाचं वजन जरा जास्तच आहे, नाई?"
प्रत्येकालाच असं तराजूत तोललं जातं

"इतकंही कुणी बारीक असू नये"
भेंडी चारचौघीत गवारीबद्दल बोलत असते
"फिगर मेंटेन करण्यापलीकडे काय जमतं तिला?"
चवळीची शेंग पाहून फरसबीला सलत असते

कांदा मग "over sentimental" ठरतो
आंबा म्हणे उगाचच गोड गोड बोलतो
फणस आतल्या गाठीचा असतो, तर
नारळ आजकाल कुणाच्यातच नसतो

"गुलाबाची फुलं किती "show off" करतात.."
"मोगरा, जाई-जुई केवढं perfume मारतात.."
"जास्वंदाची फुलं म्हणे देवाला आवडतात!"
"दुर्वांनाच का फक्त गणपतीसाठी निवडतात..?"

एका जागी एवढं आयुष्य काढण्यासाठी
त्यांना जगण्याची मोठी उमेद लागते 
ती गरज कधी परोपकारी भावनेतून
तर कधी अशा विरंगुळ्यातून भागते..

Friday, November 30, 2012

थेंबांचं जगणं

थेंबच ठरवत असतात पावसाची दिशा
मेघातून झेपावतात भरून ओली नशा

कुणी जाऊन फुलाला बिलगतं
कुणी त्याच्या मधात जाऊन मिसळतं
तिथे न्याहारी करणारं फुलपाखरू
मग क्षणार्धात वर उसळतं

कुणी पानांना ओलंचिंब भिजवतं
कुणाला फक्त चिखल करायचा असतो
सृष्टीचा असा पोरकटपणा
मग अगदी थेंबा-थेंबातून दिसतो

कुणी पानावरचा दवबिंदू होतं
कुणी रस्त्यावर सडा घालतं
आयुष्यात काहीही केलं
तरी त्या वेड्यांना चालतं

कुणी शांत तळ्याला घाबरवतं
कुणाला नदीत पडून वाहायचं असतं
"आभाळातून दिसते तशीच आहे का पृथ्वी?"
हे स्वत: सैर करून पहायचं असतं

कुणी पिलांच्या चोचीत जातं
कुणाला पिकांच्या मुळात राहायचं असतं
पृथ्वीचे पांग फेडाया
त्यांना परोपकारी व्हायचं असतं

पुन्हा मेघ भरू लागतात,
नवी सर येणार असते
उत्साहाच्या नव्या लक्षकणांना
ती पुन्हा जन्म देणार असते..

Wednesday, November 21, 2012

व्यक्त न करता येण्यासारखं..


व्यक्त न करता येण्यासारखं
प्रेम एकदा करून बघ
त्रास होईल मनाला, इतका
कुणासाठी झुरून बघ

त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचं

कौतुक मग मनाला करू देत
मनाची समजूत घालणं
तुझ्यासाठी अग्निदिव्य ठरू देत

नको मिळू देत प्रतिसाद तुला
मनाला तुझ्या दुखू देत
विचारात पडशील स्वत:बद्दल,
तुझ्या आत्मविश्वासाला झुकू देत

खूप वाटेल तुला व्यक्त करावसं,
पण शब्दांना जन्म देऊ नकोस
रोज सलत असेल काळीज तुझं
पण त्या दुखण्याला तू भिऊ नकोस

शक्य आहे त्या व्यक्तीला तुझ्या
प्रेमाबद्दल कधीच कळणार नाही
बहरलेल्या बगीच्यातलं तिला
एकही फुल मिळणार नाही

पण सरते शेवटी तुलाच वेड्या
एक आगळीक समाधान मिळेल
कारण तेव्हाच तुला
"निर्व्याज" प्रेमाचा खरा अर्थ कळेल..

Monday, August 27, 2012

जनरेशन गॅप आणि शीलाची scientific जवानी..


मला लहान मुलांशी कधीच छान गप्पा मारता येत नाहीत. कारण, मला किती वयाच्या मुलाशी काय गप्पा मारलेल्या त्याला आवडतील, हे अजून समजत नाही. "सुशांत दादा/काका/मामा लई बोर गप्पा मारतो" असं मग तो सगळ्यांना सांगत फिरेल, अशी भीती माझ्या मनात बसली आहे!

मध्ये मी माझा पुतण्या, तन्मयशी बोलत होतो. "काय मग तन्मय, कितवीत गेलास तू आता?" मी त्याला विचारलं. सगळी मोठी माणसं, लहान मुलांना पहिला हाच प्रश्न विचारतात, म्हणून तो अगदीच सेफ प्रश्न होता. "सातवीत." तन्मय म्हणाला. "अरे वाह!.." मी म्हणालो. पण पुढे काय..?! काय बरं विचारता येईल सातवीतल्या मुलाला..? 'मग, सातवीच्या स्कॉलरशिपला बसणार का?' नको! उगंच कशाला अपेक्षांचं ओझं! आणि आई-वडील सोडले तर अजून कोणालाही तुमच्याकडून कसल्याही अपेक्षा नसतात! अर्थात हे कळायला मोठं व्हावं लागतं म्हणा! पण असो. हा प्रश्न नको. मग मी आठवू लागलो, मला लहानपणी लोकांनी काय प्रश्न विचारले होते.. 'मग, सहावीत, वार्षिक परीक्षेत गणितात किती मार्क पडले तुला..?' मोठी माणसं हा प्रश्न का विचारतात मला अजून कळत नाही. मला इतर विषयांप्रमाणेच गणितात मार्क मिळायचे ('चांगले का वाईट?' हा मुद्दा या लेखाच्या स्कोपच्या बाहेरचा आहे!). त्यांच्या लहानपणी त्यांची गणितात विकेट उडाली, म्हणजे सगळ्यांचीच उडायला पाहिजे काय? आणि जर माझीही गणितात विकेट उडली असेल, तर ते ऐकून त्यांना कसला आनंद मिळणार आहे...?! असो. हा पण प्रश्न नको. सातवी...सातवी..सातवी.. मी आठवू लागलो आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! "तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?"

आम्ही सातवीत असताना हा आमचा लाडका चर्चेचा मुद्दा होता! "तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?" आमच्या ग्रुप मध्ये आम्ही एकमेकांना विचारायचो. आमच्या एका मित्राला आर्मी जॉईन करायची होती. सौरभ  नावाचा मित्र म्हणायचा, मला कॉम्पुटर इंजिनियर व्हायचं आहे. त्याकाळी कॉम्पुटर मधला पत्त्याचा गेम सोडून बाकी ते काय असतं, कोणालाही माहिती नव्हतं. त्याला "का रे?" विचारल्यावर म्हणायचा, "माझे बाबा म्हणाले, कॉम्पुटर इंजिनियर झाल्यावर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता येतं!" तर एकाला ओपन हार्ट सर्जन व्हायचं होतं.. "ए, ओपन हार्ट सर्जन म्हणजे काय?"..आम्ही विचारायचो... "ऑपरेशन करताना हृदय कापून उघडून ठेवतात!" हे त्याचं उत्तर! ..."बाप रे! का रे?"... "अरे म्हणजे कुठे बिघाड झालाय सरळ सरळ दिसतं..! पण खूप नाजूक काम असतं बरंका..!"... हे असे आम्ही होतो सातवीत असताना! ('आता ते माझे मित्र काय करतात?'..'त्यांची स्वप्नं पूर्ण झाली का?'.. 'सौरभच्या बाबांचं सध्याचं काय मत आहे?'.. हे प्रश्न प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यांच्या उत्तरासाठी दुसरं काहीही रिफर करू नये. कारण त्याबद्दल काहीही लिहिले जाणार नाहीये..!)

"मग तन्मय, मला सांग, तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?" मी तन्मयला विचारलं. तो म्हणाला, "फॅशन डिज़ाइनर"! मला शास्त्रज्ञ, सैनिक, डॉक्टर, सचिन तेंडूलकर, स्टीव जॉब्स, नरेंद्र मोदी, आमीर खान, सलमान खान, युसेन बोल्ट, मायकल फेल्प्स, अण्णा हजारे, पु.ल.देशपांडे, सोनू निगम, झाकीर हुसैन, गिरीश कुलकर्णी, संदीप खरे, गुरु ठाकूर, अजय-अतुल... यापैकी कुठलंही उत्तर चाललं असतं. म्हणजे मी त्याची मानसिक तयारी ठेवली होती! पण सगळं सोडून फॅशन डिज़ाइनर? तेसुद्धा सातवीत?!  काहीतरी मलाच समजत नव्हतं. तरी मी त्याला शांत राहून म्हणालो, "फॅशन डिज़ाइनर? अरे वाह! आत्तापर्यंत मला कोणीच असं उत्तर दिलेलं नाहीये.. (जसं काय मी सातवीतल्या मुलांचे इंटरव्यू घेत फिरत होतो!). पण का रे? असं या प्रोफेशन मधे काय आहे, जे तुला सगळ्यात आवडतं..?" तन्मय म्हणाला, "काहीतरी अलौकिक शोधून काढण्याची शक्यता..!" आता मात्र कंप्लीट बाउन्सर बॉल होता! त्याला शान्स्त्रज्ञ म्हणायचं होतं का? पण त्यात गैरसमज करण्याएवढाही तो लहान नाहीये, असं मी स्वत:ला समजावलं. मग 'काका', 'कोणीतरी मोठा' आणि तत्सम इगो बाजूला ठेवून मी त्याला म्हणालो, "मला नाही रे कळत आहे.. जरा समजावून सांगतोस..?"

तन्मय हसला. मला म्हणाला, "काका मला सांग, तू 'शीला की जवानी' गाणं बघीतलं आहेस?" मला धक्काच. हो म्हणू का नाही म्हणू...मी विचार करू लागलो.. मी कधी बघत असताना तन्मयने मला बघीतलं होतं की काय..! शेवटी, जाऊदेत असा विचार करून म्हणालो, "हो..बघितलंय बहुतेक.. ते टीव्हीवर अधून मधून लागतं.. छान आहे म्युसिक त्याचं.. विशाल-शेखरचं! आणि सुनिधी चौहान तर मस्तच गाते..!". मी जरा जास्तच सज्जनपणाचा आव आणला. पण आणायलाच पाहिजे होता. काहीही झालं तरी पुतण्या आहे माझा तो! "त्यात बघ कतरिनाचा तो ड्रेस आहे. तिने पांढरा शर्ट घातलाय. त्यावर काळा टाय. छोटी काळी शॉर्ट्स आणि वर हॅट... त्यात कशी दिसलीय सांग कतरिना..?" आता मात्र कहर झाला होता! मी काय उत्तर देणं अपेक्षित होतं त्याला?! माझ्या बुद्धीची चक्र पुन्हा जोरात फिरू लागली.. इयत्ता सातवी.. इयत्ता सातवी.. काय काय शब्द माहिती असतात सातवीत असताना..? त्यात जनरेशन गॅप चा थोडा अलाऊवन्स... मी विचारलं, "छान?"...... "बरोब्बर!" तन्मय म्हणाला. मी मनातल्या मनात "हुश्श" केलं.. पुढे तो म्हणाला तर, "त्या कपड्यात अशी काय स्पेशल बाब आहे, ज्याने कतरिना जरा जास्तच छान दिसते, हे फॅशन डिज़ाइनर शोधून काढतो!"... "म्हणजे?"... "म्हणजे बघ काका, हॉटेल मधला वेटर पण काळा टाय घालतो, पण तो कधी इतका छान दिसतो का? आमचे समोरचे काळे काका, रोज काळी चड्डी घालून ग्राउंडला चकरा मारत असतात. पण त्यांच्याकडे कोणी बघत बसतं का?! चार्ली चॅप्लिन काळी हॅट घालायचा. तो ग्रेट होता. पण त्याला कधी कोणी सुंदर म्हणायचा का? आणि तू!..." "मी काय?!"... "परवा काकी तुला म्हणत होती ना, इतके पांढरे शर्ट घालतोस तू, की लोकांना वाटेल एकंच शर्ट आहे ह्याच्याकडे! जरा रंगीत घालत जा..! मग पांढरा शर्ट, काळा टाय, डोक्यावर हॅट, काळी शॉर्ट्स आणि एका स्त्रीचा कमनीय बांधा...".. मी आवंढा गिळला.. "ह्या गोष्टी एकत्र आल्यावर अशी काय जादू होते, की ती व्यक्ती "छान" दिसते.. "खूप खूप छान" दिसते..? हे फॅशन डिज़ाइनर शोधून काढतात.. आणि तसे कपडे डिज़ाइन करतात.."

मी तन्मयकडे अवाक होऊन पाहत होतो.. त्याच्या विचार शक्तीचं मला खूप कौतुक वाटलं. मी कधीच असा विचार केला नव्हता..! अगदी उत्स्फूर्तपणे मी त्याची पाठ थोपटली! पण मला समाधान होतं की "छान" आणि "कमनीय बांधा" पलीकडचे शब्द तन्मयला ठाऊक नाहीयेत.. कदाचित मराठी मीडियम मध्ये असल्याचा परिणाम असेल.. खरं सांगतो, मलाही ह्याच्या पुढचे शब्द सातवीत असताना ठाऊक नव्हते! ('ते कधी ठाऊक झाले?', हा प्रश्न प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेरचा आहे!) जाता जाता तन्मय म्हणाला, "तुला थोडक्यात सांगू का काका...? निर्जीव वस्तू हॉट कधी होते हे थर्मल साइंटिस्ट शोधतो.. आणि सजीव वस्तू हॉट कधी होते, हे फॅशन डिज़ाइनर शोधतो..!" मी कपाळाला हात लावणं तेवढं बाकी राहिलं होतं...

Monday, July 30, 2012

(न) झिजणाऱ्या चपला


कुठल्याही सरकारी कार्यालयात कामासाठी जाणं आपल्याला अगदी जीवावर येतं. याचं कारण आपल्याला खात्री असते, की तिकडे आजच्या दिवसात आपलं काम होणार नाहीये! म्हणजे 'एयरपोर्टवर गेल्यावर आपली फ्लाईट डिले झाली असणार', 'अंगणात खेळायला सोडलेलं बाळ सगळं सोडून माती खाणार' किंवा 'महेश कोठारेच्या सिनेमात त्याची जीप पंक्चर होऊन मग तो "डॅमिट" म्हणणार!', हे सगळं आपण जितक्या खात्रीने सांगू शकतो, अगदी तितक्याच खात्रीने आपल्याला माहिती असतं की सरकारी कार्यालयात आजच्या दिवसात काही आपलं काम व्हायचं नाही..! काही लोकं तर सरकारी कार्यालयाच्या एवढ्या खेपा मारतात, की त्यांच्या चपला झिजून, शेवटी खाली भोक पडून जेव्हा तापलेल्या रस्त्याचा तळपायाला चटका बसतो, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आधीच शंभराची नोट सरकवायला हवी होती! कित्येक लोकांच्या चपला झिजतात, पण सरकारी कार्यालायचा उंबरठा कधी झिजल्याचं ऐकिवात नाहीये. त्यामुळे रस्ते किंवा पूल बांधताना जरी कमी दर्जाचं मटेरिअल वापरलं जात असलं, तरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे बनवताना भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा कधीही होत नाही..! तेव्हा यापुढे जेव्हा लोकं मला तावातावाने विचारतील, "मला एक जागा सांग भारतात, की जिकडे भ्रष्टाचार होत नाही" तेव्हा "सरकारी कार्यालायचा उंबरठा" असं उत्तर द्यायचं मी मनाशी पक्कं केलं आहे..!

पण जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर सरकारी कार्यालायासारखी दुसरी जागा शोधूनही सापडणार नाही! 'अपेक्षा ठेवली तरच दु:ख वाट्याला येतं, नाहीतर जग हा सुखाचा महासागर आहे..'! ह्याच विचाराचा प्रत्यय आपल्याला सरकारी कार्यालयात येत असतो! आपण काम असलं तरच सरकारी कार्यालयात जातो, आणि इथेच चुकतो! कधी काही काम, काही देणं-घेणं, काही अपेक्षा नसताना सरकारी कार्यालयात जाऊन बघा. तुम्हाला वेगळ्याच विश्वाचं दर्शन जर नाही झालं, तर तुम्हाला पुन्हा झिजवायला नवीन चपला मी घेऊन देईन!

खास फर्निचर्स बघायला सरकारी कार्यालयात जायचं. तिथली फर्निचर्स अगदी खास करवून घेतलेली असतात. म्हणजे बघा, तिथली जी डेस्क असतात, ती खूप उंच असतात आणि त्या पलीकडे जो माणूस बसलेला असतो, तो अगदीच खाली असतो. म्हणजे आपल्याला टाचा उंच करून त्याच्याकडे बघावं लागतं. आता असं का असतं, याबद्दल बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणतं कामचुकारपणा बघून जर कोणाचं डोकं फिरलंच, तर हात सहजासहजी त्या पलीकडे बसलेल्या माणसाच्या गालापाशी पोहोचू नये, म्हणून असं खास बनवून घेतलेलं असतं! तर कोणी म्हणतं, की ते डेस्क जर कमी उंचीचं असेल तर त्यावर सामान्य माणसांना हात ठेवता येतील, आणि बऱ्याच वेळ समोरून उत्तरंच आलं नाही, तर काहीतरी विरंगुळा म्हणून माणसं त्यावर तबला वाजवत बसतील, म्हणून ते उंचावर असतं! पण मला सगळ्यात पटलेली थिअरी म्हणजे, प्रत्येक आलेल्या माणसाकडे चष्म्याच्या वरून बघून "काय कटकट आहे" असा खास "सरकारी" चेहेरा करण्यासाठी एवढा सगळा खटाटोप केलेला असतो! तिथल्या कपाटांना कधीही न लागणारी अशी वेगळी दारं केलेली असतात, जेणेकरून आतल्या रजिस्टरच्या गठ्ठ्यांकडे  लोकांची नजर जावी आणि आपला कामसूपणा त्यांच्या डोळ्यात भरावा, यासाठी केलेली ती खास युक्ती असते. कपाटांवरही रजिस्टर्स ठेवायला जागा असते. त्या रजिस्टर्सची पानं गळायच्या तयारीत असतात. त्यावरच्या पुसटश्या रेघा वाळक्या पर्ण वाहिन्यांसारख्या दिसत असतात. तिथे नव्याने पालवी यायची जरासुद्धा शक्यता नसते...!

सरकारी कार्यालयात गेल्यावर पेशवे पार्कमध्ये गेल्यासारखं वाटू शकतं! आपण खूप उंचीवरून त्या खाली कॉम्पुटरमध्ये डोळे घातलेल्या माणसाकडे बघत असतो. आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो ऐकून न ऐकल्यासारखा करतोय, का त्याला आपली भाषा समजत नाहीये, कळायला मार्ग नसतो. तो खूप कामात असल्यासारखा वाटू शकतो, पण त्याच्या कॉम्पुटरकडे वरून  बघितल्यावर तो Pentium 1 असून, तो माणूस Windows 95 वर Solitair किंवा Minesweeper खेळत असल्यासारखा वाटतो. त्याचं लक्ष आपल्याकडे वळवून घ्यायला आपल्याला त्याला पॉपकॉर्न किंवा खारेदाणे टाकायची इच्छा होऊ शकते, पण तसं न केलेलंच बरं! काही वेळाने देवाच्या कृपेने आणि आपल्या नशिबाने तो आपल्याकडे बघतो. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. पण तो लगेच बसवावा लागतो, कारण तो आपल्याकडे क्षणभरच बघणार असतो! आपण त्याला आपला प्रश्न विचारतो आणि तो काही न बोलतो एक मळकट फॉर्म आपल्या हातात देतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे एक मळकट फोर्म असतो..!

आपल्याकडे शाई पेन असेल तर ते पेन कागदावर टेकवताच शाई पसरायला सुरुवात होते. आपल्याकडे बॉलपेन असेल, तर लिहायला लागताच त्या कागदाला भोक पडतं! आपण केविलवाण्या नजरेने मग आजूबाजूला बघतो. प्रत्येकाची तशीच धडपड चालू असते. ते बघून जीवनातलं आपण "To err is human" हे दुसरं मोठं तत्वज्ञान तेव्हा शिकतो! तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल, तरी त्या फॉर्मवर असा एकतरी प्रश्न निघतोच, की ज्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही.  माणसांना जमिनीवर आणण्याचे मोठं काम ते फॉर्मस करत असतात. आपल्या मनात त्याच्याकडे जाऊन शंका विचारण्याचा विचार येतो, पण त्याचा त्रासिक चेहरा डोळ्यासमोर येऊन आपण अंदाज पंचेच त्याचं उत्तर लिहितो आणि फॉर्म पूर्ण करतो..!

"उद्याच्याला या. साहेबांची सही घेऊन ठेवतो." पुन्हा रांगेत उभं राहून त्याला फॉर्म दिल्यावर त्याचं असं उत्तर येतं. "पण साहेब तर केबिनमधेच आहेत ना? आज नाही का होणार..?" असं काहीतरी आपण विचारायचा प्रयत्न केला, की आपल्याला अपमानाची तयारी ठेवावी लागते! आपण अपेक्षा ठेवतो आणि म्हणूनच दु:ख आपल्या पदरात पडतं. "एकदा सांगितलं ना तुम्हाला, उद्या या! साहेब बिझी आहेत. तुमच्या सारखे शंभर फॉर्म आहेत या टेबलवर! साहेबांनी काय बाहेर येऊन सह्या करत बसायचं का?"! आपलं त्याने दाखवलेल्या त्या शंबर फॉर्मस च्या गठ्ठ्याकडे लक्ष जातं. त्याला पांढऱ्या नाडीने बांधलेलं असतं. त्या माणसाच्या लेंग्याचं काय झालं असेल, असा विचार मनात येऊन आपण टाचा अजूनच उंच करून बघतो! पण त्याने लेंगा घातलेला नसतो. आपण उदास चेहेर्याने त्या सरकारी कार्यालयाबाहेर पडतो.

दुसऱ्या दिवशी गर्दी टाळायला आपण भर सकाळी जातो. बहुतेक सगळ्यांनी आपल्यासारखाच विचार केलेला असतो. त्यामुळे ऑफिसला जायच्या आधी ते सरकारी कार्यालय भाजी-मंडई सारखं भरलेलं असतं. पुन्हा मोठ्या रांगेत थांबून, ऑफिसला थोडा उशीर करून आपला एकदाचा नंबर लागतो. आपल्या फॉर्मवर साहेबांनी वेळात वेळ काढून सही केलेली असते. "संध्याकाळच्याला या. शिक्का मारून मिळेल!" हे ऐकून आता आपलं डोकं बधीर व्हायची वेळ आलेली असते. 'अहो, तुमच्या शेजारी शिक्का आहे. त्याच्या शेजारी शाई आहे. तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे? तुम्हाला जमत नसेल तर मी स्वत: मारून घेतो!" असं चिडून म्हणायची मनात खूप इच्छा निर्माण होते. पण कालच झालेला अपमान ताजा असतो. त्यामुळे आपण शेळीसारखा चेहरा करून तिथून निघून जातो. बाहेर जाताना दारावर हसऱ्या गांधीजींचा फोटो लावलेला असतो. त्याच्या शेजारच्या भिंतीवर धीर-गंभीर लोकमान्य टिळकांचा फोटो असतो. सगळे आदर्श, सगळ्या आकांक्षा त्यावेळी गळून पडतात आणि रागारागाने आपण ऑफिसला निघून जातो.

ऑफिसमध्ये मग आपला चर्चेचा विषय असतो सरकारी कार्यालये, त्यातला ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, आपल्या इन्कम टॅक्स चा गैरवापर आणि देशाची अधोगती. मग आपल्या लक्षात येतं, आपल्या मित्राला एका दिवसात सही, शिक्का आणि रिसीट सगळंच मिळालं! तो आपल्याला मग आपण किती साधे आहोत यावर चिडवतो. दुसऱ्या दिवशी सख्ख्या मित्राच्या नात्याने आपल्या बरोबर त्या सरकारी कार्यालयात येतो. आपला नंबर आल्यावर समोरच्या माणसाला हळूच म्हणतो, "साहेब, संध्याकाळी चहाला थांबा ना.." पुढच्याच क्षणी आपल्या फॉर्मवर शिक्का बसलेला असतो आणि आपल्या हातात रिसीट असते!

संध्याकाळी आपण "चहाला" भेटतो. तो माणूस पहिल्यांदाच आपल्याला पूर्णपणे दिसतो. त्याने लेंगा घातलेला नसतो. तुमच्या आमच्या सारखा साधाच असतो तो दिसायला. आपण आपल्या खिशातली एक नोट काढून त्याला देतो. नोटेवरचे गांधीजी आपल्याकडे बघून हसत असतात. त्या क्षणी आपल्या चपलांचं झिजणं थांबतं आणि तो माणूस क्षणार्धात समोरच्या गर्दीत नाहीसा होतो..

Tuesday, July 24, 2012

ठाऊक आहे मला

ठाऊक आहे मला, त्याने कळ्यांचं रुसणं पाहिलं होतं..
कोरांटीचं फुल मग, प्रेमाने मारुतीला वाहिलं होतं

ठाऊक आहे मला, तो गाईच्या डोळ्यांत बघत बसायचा
माणसांचं कारुण्य दिसलं, की हलकेच मग हसायचा

ठाऊक आहे मला, त्याने देवळात नमाज वाचला होता
मशिदीत आरत्या गाताना, बेभान होऊन नाचला होता

ठाऊक आहे मला, तो सारखा कचरा आवरायचा
कोसळत्या जगाला जणू, एका हाताने सावरायचा

ठाऊक आहे मला, त्याने त्याचं बालपण जपलं होतं
त्या खळाळत्या हास्यामागे, ते अवखळपणे लपलं होतं

ठाऊक होतं मला, तो एक दिवस निघून जाणार
त्याला दुरूनच बघणारं मन, मग कायमचं आधारहीन होणार..




मी ही कविता लिहून पूर्ण केली आणि मला वाटलं एक अभिजात कलाकृती नुकतीच माझ्या हातून घडली आहे! नेहेमीप्रमाणे मी ती हक्काच्या लोकांना वाचून दाखवली आणि "छान लिहिलयस रे..! पण.. नक्की काय म्हणायचंय...तुला? जरा समजावून सांग ना.." असं अगदी सगळ्यांकडून ऐकायला मिळालं! आनंदाच्या भरात दोघांना सांगितला मी अर्थ. पण सगळ्यांना कसं समजावून सांगू..?
मग मनात एकदम श्रेठ कवीसारखा विचार आला, "माझी कविता ही मुळी सगळ्यांसाठी नाहीच आहे! ज्यांना कळेल ते खरे जाणकार, ज्यांना कळणार नाही ती सामान्य माणसं..!" मग मला वाटलं, ज्ञानाच्या गव्हाची पेरणीही अजून नीट झाली नाहीये, आणि मी ज्ञान'पीठ' पुरस्कर्ता असल्याचा आव आणतोय..! आठवलं, की शाळेत असताना मला बऱ्याचश्या कविता समजायच्याच नाहीत. वाटायचं, 'कवी का असं काहीतरी क्लिष्ट लिहितो..? उगाच भाव खायला असणार..!' हा विचार डोक्यात असताना मी जेव्हा ह्या कवितेचा अर्थ लिहायला घेतला, तेव्हा सुरुवात केली, "या रूपकात्मक कवितेतून कवीला असं स्पष्ट करायचं आहे..."!..जणू मी दहावीतला कवितेवरचा ७ मार्कांचा 'सविस्तर उत्तरे लिहा' च सोडवत होतो..!
छ्या! ह्याच्यासाठी कुणी कविता करतं का? कविता म्हणजे भावनांचा पुष्पगुच्छ! "ए अरे, तिच्याकडे बघितलं ना, की मला हृदयात कसंतरी होतं.. एकदमच सगळं थांबून जातं.. हेच प्रेम असतं का रे? मी तिच्या प्रेमात पडलोय का..?" असं जिवलग मित्राला विचारणं, म्हणजे त्याला आपल्या भावनांचा पुष्पगुच्छ देणं..!

आपल्या सगळ्यांनाच भावना असतात. त्यामुळे कविता आपल्या सगळ्यांसाठीच असतात..

अर्थ:

अशी कोणीतरी व्यक्ती असते, खरी किंवा काल्पनिक, की जिच्याकडे आपण फक्त अवाक होऊन बघतो. आपल्या मनात तिच्याबद्दल खूप आदर निर्माण होतो आणि ती व्यक्ती कशी असेल ह्याचे आपण अंदाज बांधायला लागतो.. म्हणून "ठाऊक आहे मला..(त्या व्यक्तीबद्दल)"

'ठाऊक आहे मला, त्याने कळ्यांचं रुसणं पाहिलं होतं
कोरांटीचं फुल मग, प्रेमाने मारुतीला वाहिलं होतं'

ती व्यक्ती इतकी संवेदनशील आहे, इतकी दयाळू आहे की तिला मुक्या झाडांच्याही भावना समजतात. तिने कळ्यांना रुसलेलं पाहिलं होतं. कदाचित त्या कळ्या कोरांटीच्या असतील. आणि फुलल्यावर आपण कदाचित गुलाब-मोगऱ्या सारखे सुंदर होणार नाही, ह्या विचाराने त्या रुसल्या असतील. त्याने बघितलं. तो थांबला. आणि तेच कोरांटीचं फुल, मग त्याने प्रेमाने मारुतीला जाऊन वाहिले.

'ठाऊक आहे मला, तो गाईच्या डोळ्यांत बघत बसायचा
माणसांचं कारुण्य दिसलं, की हलकेच मग हसायचा'

गाईच्या डोळ्यात ओतप्रोत कारुण्य भरलेलं असतं. तिच्या डोळ्यात बघितलं, की ती किती बिचारी वाटते. दु:खात वाटते. त्या व्यक्तीने आयुष्यात इतकं कारुण्य बघितलं आहे की जणू तो गाईच्या डोळ्यांतच बघत बसलाय..! आणि तुझ्या - माझ्यासारखा माणूस जेव्हा 'आमचं दु:ख किती मोठं' असा आव आणतो, तेव्हा ते बघून त्याच्या चेहेऱ्यावर हलकेच हास्याची लकेर उमटते..

'ठाऊक आहे मला, त्याने देवळात नमाज वाचला होता
मशिदीत आरत्या गाऊन, बेभान होऊन नाचला होता'

समाजाची बंधनं त्याने कधीच मानली नाहीत. धर्मामुळे होणारं नुकसान बघून त्याने धर्माचा केवळ निषेधच केला. त्याने देवळात जाऊन नमाज वाचला, मशिदीत जाऊन आरत्या गायल्या.. पण हे सगळं धर्म पाळणाऱ्यांचा राग म्हणून नव्हे. देवावर चिडला होता तो.. वेगवेगळ्या रुपात पृथ्वीवर अवतरल्यामुळे.. त्याच्यावरचाच राग व्यक्त केला होता त्याने..

'ठाऊक आहे मला, तो सारखा कचरा आवरायचा
कोसळत्या जगाला जणू, एका हाताने सावरायचा'

तो सारखा कचरा आवरताना दिसायचा. तो कचरा माणसांच्या चुकांचा असो, काही मोडल्या-बिघडल्याचा असो, किंवा अगदी 'कचरा' असो.. त्याला जे काही चुकीचं वाटायचं, ते तो त्याच्या परीने आवरायचा. तुझ्या माझ्या सारखाच, हाडा-मासांचाच होता तो. त्यामुळे त्याच्या कार्याने बुडणारं जग सावरलं नसतं. पण तरीही तो करायचा. पर्वताएवढा विश्वास मनात ठेवून..

'ठाऊक आहे मला, त्याने त्याचं बालपण जपलं होतं
त्या खळाळत्या हास्यामागे, ते अवखळपणे लपलं होतं'

काय हसायचा तो..! दिल खुश करून टाकायचा! खळाळत्या पाण्याप्रमाणे हास्य होतं त्याचं.. उत्साही आणि अवखळ.. हे फक्त निरागस लहान मुलांनाच जमू शकतं.. त्याचं बालपण कुठेतरी नक्की लपलं होतं.. तो हसला की ते हळूच डोकावायचं!

'ठाऊक होतं मला, तो एक दिवस निघून जाणार
त्याला दुरूनच बघणारं मन, मग कायमचं आधारहीन होणार'

काय माहिती का.. पण मला कुठेतरी ठाऊक होतं की हा एक दिवस निघून जाईल...आणि मग आपल्याला परत कधीच दिसणार नाही. आणि तसंच झालं.. मी खूप दुरून बघायचो त्याला. कधी बोललोही नाही त्याच्याशी. पण कळत-नकळत केवढा आधार वाटायचा त्याचा.. एका अंधाऱ्या खोलीतला लख्ख उन्हाचा कवडसा होता तो.. माझं मन आता अगदीच आधारहीन झाल्यासारखं झालंय.. मनाला पुन्हा तसा आधार कधीच मिळणार नाही. ठाऊक आहे मला...

Monday, July 23, 2012

वेदनेचे गाणे

किती करशील तू असे सुखाचे बहाणे
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

रात्र शेवटी सरून जाते
सावलीसुद्धा विरून जाते
संपतेच की पिलाच्या चोचीतले खाणे..
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

कोण इथे असते सांग सदा सुखी
भावनांची बासरी कृष्णाच्या मुखी 
त्याच्या-तिच्या सारखेच तुझे माझे-जीणे
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

पुन्हा भरेल आकाश लख्ख तारकांनी
पुन्हा भरेल अंगण शुभ्र प्राजक्तांनी
दुपारच्या उन्हात जमव शांत राहणे  
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

किती करशील तू असे सुखाचे बहाणे
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे..

Friday, July 20, 2012

चांभार चौकश्या

मी सुद्धा अमेरिकेतल्या प्रत्येक तरुण भारतीय मुलासारखाच सुट्टीत घरी जायला घाबरायचो! कारण तिथे गेल्यावर तमाम ओळखीच्या लोकांचा एकंच प्रश्न असायचा; 'काय मग? तुझ्या लग्नाचं काय?!' त्यामुळे गेल्या सुट्टीत जेव्हा लग्न करायला म्हणून भारतात गेलो, तेव्हा मला हा प्रश्न विचारला जाणार नाही, या विचाराने मी निश्चिंत होतो! सगळ्यांना पत्रिका आधीच वाटून झाल्या होत्या. त्यामुळे 'माझ्या लग्नाचं काय' ह्याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं होतं. पण हे ऐकून आमच्या बडवे काकू थोड्या हिरमुसल्या होत्या. त्यांना लग्न जुळवायची भारी हौस! आणि माझं लग्न, त्यांनी न जुळवता मीच जुळवलं होतं म्हणून त्या खट्टू झाल्या होत्या!

बडवे काकू प्रत्येक लग्नात भेटतात! आमच्या सोसायटीतल्या कोणाचं लग्नं असो, वा आमच्या कुठल्या मित्राच्या लांबच्या बहिणीचं असो,  तिथेही आम्हाला बडवे काकू भेटल्या आहेत! बडवे काकूंच्या एवढ्या ओळखी कशा, हा प्रश्न आम्हाला नेहेमी पडायचा. बडवे काकूंना लग्नात वधू, वर, लग्नाचं जेवण, सजावट, साड्या, दागिने ह्यात कशातही रस नसतो. त्या तरुण मुला-मुलींच्या शोधात असतात! माझ्या आणि माझ्या कित्येक मित्रांशी त्यांनी, 'आमचा लग्नाचा काय विचार आहे... त्यांच्या बघण्यात कशा गोऱ्या आणि सुंदर मुली आहेत.. चांगल्या मुली मिळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं कमी होत चाललंय आणि त्यामुळे आम्ही कसं लवकर लग्न केलं पाहिजे...आणि मग शेवटी आईला सांग मी थोड्या दिवसात भेटायला येते..' अशा प्रकारच्या गप्पा खूप वेळा मारल्या आहेत. त्यामुळे लग्न समारंभात, आम्ही जितकी लपाछपी लहानपणीही खेळली नाहीये, तितकी बडवे काकूंबरोबर खेळतो, असं मधे आमच्या लक्षात आलं!

बडवे काकूंनी एकदा तर सातवीतल्या मुलीला विचारलं होतं, 'तुझ्या लग्नाचं काय' म्हणून! माझ्या मित्राची अशी थिअरी आहे की बडवे काकूंनी आयुष्यात खूप पापं केली असणार. म्हणजे मुलांना (आणि नवऱ्याला) खूप 'बडवलं' असणार, पुढे त्यांच्या सुनेला छळलं असणार, वगैरे. त्यामुळे आता थोडं पुण्य कमावण्यासाठी ब्रम्हदेवाच्या sub contractor चं, गाठी मारायचं त्या काम करतायत! पण काहीही म्हणा, बडवे काकूंमुळे  कोणाचं लग्न जुळलं तर त्यांना त्याचा अनामिक आनंद होतो! पुढे कित्येक दिवस ते त्याचं कौतुक सांगत फिरतात. बडवे काकू स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही जेवढ्या खुश नव्हत्या, तेवढ्या त्या कोणा दुसऱ्याचं लग्न जुळवल्यावर होतात म्हणे!

पण हल्लीच बडवे काकूंना आमच्या ग्रुप मध्ये खूप महत्व प्राप्त झालंय! याचं कारण म्हणजे माझे मित्र आता लग्नाच्या रणांगणात उतरायला लागले आहेत आणि त्यांना आता हे पटू लागलंय की चांगल्या मुली मिळणं खरंच दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. एवढंच नाही तर ते आता बडवे काकूंना सारखं भेटून त्यांच्या बघण्यात चांगल्या मुली आहेत का, हे विचारात असतात! आणि हे म्हणे इतकं अति झालंय की आता बडवे काकू त्यांच्यांशी लपाछपी खेळायला लागल्यात!

बडवे काकूंची सख्खी मैत्रीण म्हणजे परांजपे काकू! सख्खी मैत्रीण याचा अर्थ त्या दोघी जीवा-भावाने आणि काळजाच्या ओलाव्याने आमच्या बिल्डींगमधल्या सगळ्यांबद्दल gossip करत असतात! परांजपे काकूंचा 'सध्याची लग्न' याबद्दल फारसा व्यासंग नसला तरी 'अमेरिकेत झेप घेतलेली पाखरे' हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय! त्या एकदा कधीतरी अमेरिकेला जाऊन आल्या आहेत आणि त्यानंतर अमेरिका म्हणजे त्यांच्या घराशेजारची गल्ली असल्यासारखं ते इतरांशी बोलत असतात!

लग्न केल्यामुळे मी बडवे काकूंच्या हातून कायमचा सुटलो, पण त्यामुळे परांजपे काकूंच्या १००% हक्काचा झालो! बडवे काकू जणू परांजपे काकूंना म्हणाल्या असतील, "सांभाळ ग ह्याला तू आता!". कारण माझ्या लग्नाच्याच दिवशी, जेव्हा लोकं वधु-वरांना भेटायला स्टेजवर येतात, तेव्हा परांजपे काकूंनी तिथे मला विचारलं, "काय मग, आता अमेरिकेचेच होणार का येणार आपल्या देशात परत? लवकर ठरव बाबा, नंतर अवघड होऊन बसतं..!"लग्नाची डीव्हीडी बघताना, त्यात जेव्हा मी परांजपे काकूंशी बोलतोय, तेव्हा माझा चेहेरा बघून हा "marriage nervousness" असणार असा समज नंतर माझ्या बऱ्याच नातेवाईकांनी करून घेतला!

परांजपे काकूंचं अमेरिकेबद्दल नक्की मत काय आहे हा तसा चर्चेचा मुद्दा आहे. कारण भारतात स्थायिक व्हावं असं जरी त्यांचं म्हणणं असलं तरी त्या अमेरिकेचे खूप गोडवेही गात असतात. पण काही असलं तरी परांजपे काकूंना अमेरिकेबद्दल गप्पा मारायला फार आवडतात. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे अमेरिकेत बरीच वर्ष राहणाऱ्या लोकांनाही त्या 'अमेरिका कशी आहे?' हे सांगू शकतात! 

एकदा आमच्या घरी येऊन सांगत होत्या, "अहो एवढं सगळं ऑटोमॅटिक आहे अमेरिकेमध्ये, की बटन दाबून मगच रस्ता क्रॉस करावा लागतो!" आता आपणच बटन दाबायचं, तर त्यात ऑटोमॅटिक काय आहे! पण नाही, अमेरिकेत सगळं ऑटोमॅटिक आहे! त्या कधीतरी न्यूयॉर्क सिटीला जाऊन आल्या. त्याची आठवण सांगताना म्हणतात, "बागेत कसे वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे ताटवे असतात. तशी लोकं आहेत अगं अमेरिकेत. केवढा खुला देश आहे तो. पण काही गडद रंग सुंदर नाही दिसत ना फुलांवर..!" वाह! काय कल्पना आहे! म्हणजे त्यांना साहित्यिक म्हणावं का रेसिस्ट असा प्रश्न समोरच्याला पडतो! त्यांचं स्वत:चं शिक्षण तसं कमी झाल्यामुळे असेल म्हणा, पण त्यांना अमेरिकेची तंत्रज्ञानातली प्रगती, शिक्षणाचा दर्जा ह्याबद्दल फारसा रस असावा असं वाटत नाही. त्यावर एकदा विचारलं असताना म्हणाल्या, "त्यावर काय बोलायचं, त्याच्यासाठीच तर जातो आपण अमेरिकेत! त्यामुळे तुम्हाला जे काही शिकायचंय ते शिका. जे काही करायचं ते करा आणि मग परत या." पण त्यांची विशेष लाडकी वाक्य म्हणजे, "तुला सांगते सुमे, तिकडे ना, प्रवास करावा तर बसमध्ये आणि जुगार खेळावा तर वेगसमध्ये!" म्हणजे समोरचा खुर्चीवरून उडलाच पाहिजे! त्यावर पुढे त्या सांगतात की त्यांना गाडीतून जायला भीती वाटते कारण ती लेफ्ट हॅण्ड ड्राइव असते! आम्ही हे त्यांचं वाक्य चोवीस वेळा तरी ऐकलं असेल, पण त्या बसबद्दलच सांगतात, वेगसची गंमत गुपितच राहते..!

नवीन श्रोत्यांची परांजपे काकू नक्कीच करमणूक करतात. म्हणजे "नायागाराची ती बोट राईड अगं संपूर्ण भिजवते आपल्याला. त्यामुळे जाताना अंघोळ करून जायचंच नाही!" म्हणजे काय? अमेरिकेला गेलात तर तुमची एक अंघोळ वाचेल?! किंवा "तिकडे कोणी कॅश ठेवतच नाही. खरेदी झाली की क्रेडीट कार्ड त्या मशीन मधून सपासप खेचतात, की दिले पैसे!" इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे जाऊन स्वत:ची थिअरी सांगतात की, "त्यामुळे अमेरिकेत अगं भिकारीच नाहीयेत. कारण भिकाऱ्यांनाही माहितीय ना, की लोकांच्या खिशात कॅश नसणार म्हणून!" बडवे काकू परांजपे काकूंची इतकी सख्खी मैत्रीण आहे की परवा बडवे काकू तिसऱ्याच व्यक्तीला, नायागाराची बोट राईड कशी असते आणि मग अंघोळ कशी वाचते हे उत्साहाने सांगताना माझ्या मित्राने ऐकलं!

पण ही सगळी करमणूक फक्त पहिल्यांदा ऐकणाऱ्यांचीच होऊ शकते. विचार करा, आम्ही हे सगळं २०-२५ वेळा ऐकलं आहे! म्हणजे अमेरिकेत, "कोलंब्या सोललेल्या असतात. दूध हवं तितक्याच सायीचं मिळतं. एक कपाट भरून फक्त ब्रेड..वेगवेगळ्या प्रकारचे.. एक कपाट भरून नुसतं चीज... मोसंब्या एवढं लिंबू आणि मोसंबं तर अननसाएवढं (म्हणजे "Sehwag is Sachin and Sachin is God! " याच ओळींवर..!) रस्त्यावर खड्डेच नसतात. रस्ते काय, अहो छोट्या गल्लीमध्ये पण खड्डे नसतात. सगळीकडे घासून पुसून स्वच्छता. कचरा दिसतंच नाही बाहेर..! बागेत गेलं, तर बाक चक्क रिकामे असतात! फास्ट फूड तिकडे इतकं फास्ट की मॅगी करायला जास्त वेळ लागेल..!" असं आणि यासारखं बरंच काही. आमच्या तर एका मित्राने हे ४९ वेळा ऐकल्याचं सांगितलं, तेव्हा आम्ही त्याला कॉंट्रिब्यूशन काढून ट्रीट दिली!

हेसुद्धा एक वेळ समजून घेता येईल. पण सुट्टी काढून भारतात गेल्यावर "मग तिकडचेच होणार का? भारतात परत येणार का? ठरवलंयस का काही? नंतर अवघड होऊन जातं बरका.." असे प्रश्न ते इतक्या वेळा विचारतात, की वैतागायला होतं आम्हाला. बडवे काकूंचंही अगदी तसंच असतं. "आता लग्न आणि करियर या जर इतक्या महत्वाच्या गोष्टी असतात तर त्याचा निर्णय आम्हाला आमचा घेऊ द्यात की. कशाला हव्यात चांभार चौकश्या? मला कळतंच नाही या दोन काकूंचं" असं मी परवा आईशी बोलत असताना आईने आत्तापर्यंत लपवलेल्या दोन गोष्टी मला सांगितल्या..
१) बडवे काकूंचं खूप उशिरा लग्न झालं. त्यांचा नवरा काही वर्षातच त्यांना सोडून निघून गेला.
२) परांजपे काकूंचा मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. त्याने भारतात येणं कधीच सोडलंय. आजीला नातीला बघायचा उत्साह म्हणून त्याने एकदाच आईला अमेरिकेला बोलावलं होतं. काकूंनी जेव्हा त्यांच्या नातीला पहिल्यांदा बघितलं, तेव्हा ती ८ वर्षांची होती.

मला पुढे काही बोलवलंच नाही. मनाची दारं-खिडक्या गच्च बंद करून जगणारे आपण, जर कोणी आपल्या आयुष्यात डोकवायचा प्रयत्न केला तर वैतागतो. पण नकळतही असेल कदाचित, पण तरीही आपलं दु:ख समोरच्याच्या वाट्याला न येवो यासाठी त्या दोघी झगडत आहेत. थोडं विचित्र असेलही त्यांचं वागणं. एवढं दु:ख पदरी पडल्यावर असं होणं अगदी साहजिक आहे... आपल्याला हवा तसा समोरचा माणूस नाही वागला की आपल्याला त्याचा त्रास होतो. तो असलाच आहे असं लेबलही आपण त्याला लगेच चिकटवतो. पण त्याच्या चपला घालून आपण दहा पावलं सुद्धा चालायचा प्रयत्न करत नाही. कसा करणार.. मनाची दारं-खिडक्या गच्च बंद असतील तर त्याच्या चपला तरी कशा दिसतील आपल्याला..?

मी ठरवलं. पुन्हा भारतात गेल्यावर बडवे काकू आणि परांजपे काकूंशी मनसोक्त गप्पा मारायच्या! थोडं त्यांच्या आयुष्यात डोकावायचं.. चांभार चौकश्या करायच्या! इथे अमेरिकेत शेजारच्या काकू तश्या असत्या ना, तर मी आत्ता लगेच उठून गेलो असतो! पण तेवढंच फक्त नाहीये अमेरिकेत...

Sunday, February 19, 2012

माझ्या लग्नाची गोष्ट..

'लग्न म्हणजे काय हो?' असा प्रश्न कोणा मोठ्यांना विचारला, तर त्याचं उत्तर, 'अरे लग्न म्हणजे देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने झालेला दोन जीवांचा सुरेख मेळ असतो!' असं साखरेत घोळवून दिलेलं आणि अगदी पुस्तकी मिळायची शक्यताच जास्त असते! हे उत्तर चुकीचं नक्कीच नाहीये. पण हे अर्धवट उत्तर आहे! मला विचारलंत, तर त्याचं खरं उत्तर - 'लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ आणि शे-दोनशे जीवांचा एक उत्सव असतो.!' असं मी देईन. या उत्तराचा साक्षात्कार होण्यासाठी साक्षात लग्न करून पहावं लागतं! आणि तो योग नुकताच माझ्या आयुष्यात आला होता...!

माझं लग्न जेव्हा काहीच दिवसांवर येऊन ठेपलं, तेव्हा मी पु.लं च्या नारायणाचा विचार करत होतो. माझ्या लग्नात कोण बरं असेल नारायण..? माझा मित्र असेल, की भाऊ असेल..? का तो दादा असेल..? कोणीतरी आनंदाने नारायण व्हावं आणि हा धाकधुकीचा लग्न-समारंभ व्यवस्थित पार पाडून द्यावा अशी मनाशी मी इच्छा धरली होती. पण जसे लग्नाचे विधी सुरु झाले, तसे हा 'नारायण' मला सहस्ररूप दर्शन द्यायला लागला! भेटणाऱ्या प्रत्येकात, म्हणजे अगदी, आई, वडील, बहिण, भाऊ, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, मावश्या, आत्या, शेजारी-पाजारी, मित्र-मंडळी, त्यांचे आई-वडील, कामवाल्या बाई, पूजा सांगणारे गुरुजी, हॉलवाला, फोटोवाला, व्हिडियो शूटिंगवाला, न्हावी, ज्वेलर्सवाला, दुकानदार आणि अशी इतर बरीच मंडळी.. या सगळ्यांच्यात मला एक नारायण दिसायला लागला होता!

मी जवळपास महिन्याभराची सुट्टी घेऊन लग्नासाठी भारतात जाणार होतो. तशी सगळी तयारी झाली होती. विचार केला केस कापून जाऊयात. म्हणजे लग्नाच्या वेळेपर्यंत तसे बऱ्यापैकी वाढतील. नाहीतर अजून एक वीस वर्षांनी माझी मुलं मला लग्नाचे फोटो बघत 'बाबा लग्नापासूनच तुम्हाला जरा केस कमीच होते का हो..?' असा प्रश्न विचारतायत असं चित्र माझ्या डोळ्यासमोर येऊन गेलं! माझा इथला नेहेमीचा 'अहमद' नावाचा जॉर्डन देशाचा न्हावी आहे. त्याचा गिऱ्हाईक, हा फक्त केस कापायचे नाही तर केस कापून होईपर्यंत सतत बडबड करून मनोरंजन(!) करायचे पण पैसे देतो असा समज आहे! म्हणून गिऱ्हाईक त्याच्या तावडीत असेपर्यंत तो मोडक्या-तोडक्या इंग्लिशमध्ये त्याच्याशी बोलत असतो. पण धीर-गंभीर माणसांपेक्षा गप्पिष्ठ माणसं परवडली, या हेतूने मीही आनंदाने त्याच्याशी माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्लिशमध्ये बोलत असतो. आमचे उच्चार कमालीचे वेगळे आणि भाषेची दोघांची बोंब असूनही आम्हाला एकमेकांचं सगळं बोलणं कसं समजतं ह्याचं मला नेहेमी आश्चर्य वाटत आलंय..! त्याला त्या दिवशी मी सांगितलं की माझं अजून एका महिन्याने लग्न आहे, त्यामुळे केस खूप बारीक करू नकोस. महिन्याभरात वाढतील असं बघ. तेव्हा मला माझ्या पहिल्या नारायणाचं दर्शन झालं! मुसलमान असला म्हणून काय झालं, नारायणंच होता तो! त्याने सगळ्यात आधी मला मिठी मारून माझं अभिनंदन केलं! मग खूप विचार करतोय असे काहीतरी भाव चेहेऱ्यावर आणले आणि मला म्हणाला, "मिलीमीटर मध्ये हिशोब केलाय मी! असे केस कापतो की लग्नात तू हिरोच दिसशील! भारतात गेलास की तुझ्या तिकडच्या नाव्ह्याला कात्रीला हात लावून देऊ नकोस! केस फक्त ट्रीम करायला सांग त्याला." एवढया आत्मविश्वासाने आमच्या क्षेत्रातले तज्ञ, माझे प्रोफेसर सुद्धा असं कधी बोलत नाहीत! मग केस कापताना त्याने मला मी लग्नात कसा गडद निळ्या रंगांचाच सूट घालावा, त्यावर निळ्या रंगाचा टाय आणि कसलातरी फिकट गुलाबी अथवा अलोबी रंगाचा शर्ट घालावा म्हणजे मी 'हिरो' दिसीन असं सांगितलं. त्यात त्याला गुलाबी म्हणजे नक्की कसा हे दाखवायचं होतं. ती शेड शोधायला त्याने त्याच्या दुकानातल्या सगळ्या क्रीमच्या आणि तेलाच्या बाटल्या चाचपडून बघितल्या. मग कुठल्या तरी बाटलीवर कोपऱ्यात त्याला तो रंग सापडला. आणि मग मीही लगेच, "हो, हो, मला कळला तो रंग!" असं त्याला म्हणालो आणि मग तो माझ्या बुटांकडे वळला! मग बूट किती टोकदार हवेत इथपासून मोजे कुठल्या रंगाचे आणि कसल्या कापडाचे घाल इथपर्यंत त्याने मला सगळं सांगितलं! पण त्याने केस मस्त कापून दिले म्हणून मी खुश होतो! त्यालाही त्याने मन लावून केलेलं काम आवडलं असावं. शेवटी त्याने त्याच्या कॅमेरात टायमर लाऊन आमच्या दोघांचा एक आठवण राहावी म्हणून फोटो काढला! नेहेमीची २० मिनिटांची कटिंग यावेळी पूर्ण तासभर चालली. माझ्यानंतर येऊन ताटकळत थांबलेला एक बिचारा माणूस वैतागून निघूनही गेला. पण त्याची अहमदला पर्वा नव्हती..!

मी घरी जायच्या कितीतरी आधीपासून आई, वडील आणि धाकटी बहिण माझ्या लग्नासाठी राबत होते. पत्रिकेचं डिजाईन ठरवणं, त्यावरचा मजकूर निवडणं, त्या छापून आणणं, बऱ्याचश्या लोकांना जाऊन नेऊन देणं, लग्नाची बरीचशी खरेदी, द्यायच्या भेटवस्तू, लग्नाचा हॉल बुक करणे, पूजा सांगणाऱ्या गुरुजींची appointment घेणं!, यासारखी बरीचशी कामं त्यांनी आधीच करून ठेवली होती! मी घरी आलो आणि माझ्या हातात एक मोठ्ठी यादी पडली! "ह्यांच्याकडे केळवणाला जायचं आहे. कोणाकडे कधी ते तू ठराव. सगळ्यांना शनिवार-रविवार जास्त सोयीचे आहेत." इति. - आई. एवढे कमी दिवस आणि एवढी केळवणं! लग्नात (त्यातल्या त्यात) छान दिसावं, म्हणून मी वजन कमी करायचे केविलवाणे प्रयत्न करून आलो होतो. आणि आता एवढया सगळ्यांकडे आग्रहाचं आणि प्रेमाचं जेवण जेवायचं म्हणजे माझं काही खरं नव्हतं!

हा हा म्हणता केळवणं सुरु झाली. गोडधोड पदार्थांचा माझ्यावर जणू माराच होत होता. अगदी खरं सांगायचं तर मी आता लग्नात आणि त्या फोटोंत कसा दिसीन ह्याची मला जरासुद्धा फिकीर नव्हती! जगात 'गोड' ही एकटीच चव अस्तित्वात असती, तरी मी अगदी मजेत जगलो असतो! 'अन्न हे पूर्णब्रम्ह' म्हणत मी सगळ्यावर ताव मारत होतो. हे माझ्या धाकटया बहिणीच्या बहुतेक लक्षात आलं! तिने मला 'लग्न कसं एकदाच होतं' आणि त्याचे फोटो चांगले येणं हा कसा जन्म-मरणाचा प्रश्न असतो हे समजावलं! हे फक्त तिचंच नाही तर माझ्या आत्ये-मामे बहिणींचं आणि माझ्या होणाऱ्या बायकोचंही म्हणणं होतं! म्हणजे यावरून आज-कालच्या मुलींना 'जोडीदार कसा का मिळो, लग्नाचे फोटो चांगले आले पाहिजेत!' असं वाटतं की काय अशी मला शंका आली! पण एकंदर मी जरा बेतानेच खावं यावर घरी सगळ्यांचं एकमत झालं. मग त्यावर आमच्या आत्याने असं सुचवलं की लोकं सहसा केळवणाला बोलावताना विचारतात की काय खायची इच्छा आहे मुलाची. तेव्हा म्हणायचं, "अहो एवढी केळवणं चालू आहेत .. सगळं काही खाऊन झालंय आता माझं! त्यामुळे साधंच काहीतरी करा!" सुरुवातीला ही युक्ती छान चालली. पण नंतर अचानक लोकांनी हा प्रश्नच विचारणं बंद केलं! त्यावरून माझ्या लग्नाची चर्चा आता गावभर होतीय आणि त्यामुळे सगळ्यांनाच आम्ही तेच उत्तर देतोय हे लोकांना कळलं असावं की काय असं मला वाटून गेलं!

पण हे सगळं चालू असताना मी एक वेगळीच गोष्ट अनुभवली. मी केळवणाचं जेवण जेवत असताना बाकी सगळ्यांच्या चेहेऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव असायचे. जो तो माझ्याकडे कौतुकाने पाहत असायचा. त्यांना जणू गंगेत जाऊन डुबकी मारून आल्यासारखं वाटत होतं! एवढं का सगळ्यांचं प्रेम एकाच वेळी उतू जातंय हे मला समजत नव्हतं! कदाचित आता हा निर्विकारपणे बायकोच्या मुठीत जाऊन बसेल आणि एकाएकी अदृश्य होईल अशा भीतीने, 'जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत crash-course स्वरूपाचं प्रेम करून घेऊन' असा विचार प्रत्येकाने केला असावा! त्यावेळी अगदी 'रात्र थोडी आणि सोंगं फार' अशी परिस्थिती होती. खूप जणांकडून आग्रहाचं निमंत्रण होतं आणि लग्नाचे विधी जवळ आल्याने सगळ्यांकडे जाणं शक्य नव्हतं. मग लोकं 'सकाळी नाश्त्याला ये, मस्त पोहे करतो', 'दुपारच्या चहाला ये, तेवढ्याच गप्पा होतील' यावर आली. एक काकू तर आईला 'अहो सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा पाठवा त्याला!' असं म्हणाल्या. त्यावर, "प्रातर्विधीसाठी आलो तर चालेल का, विचार त्यांना!" असं मी आईला म्हणालो! तेव्हा 'मुलाचं जरा लवकरच लग्न करतीय का काय?' अशी आईला आलेली शंका तिच्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट दिसून गेली!

लग्नाच्या आधीचे विधी सुरु झाले आणि मला लहानपणी पोरांना मांडी घालून का बसायला लावतात ह्याचं उत्तर मिळालं! प्रत्येक पूजा दीड ते दोन तास चालायची आणि प्रत्येक पूजेला माझ्या पायाला मुंग्या यायच्या! पूजा सुरु होऊन एक-पंधरा मिनिटं झाली की माझी चुळबूळ सुरु व्हायची आणि आमचे गुरुजी मिशीतल्या मिशीत हसायचे. मी त्यांना एकदा न राहून विचारलंच की अहो तुमचे पाय कसे नाही दुखत? त्यावर ते म्हणाले, "अरे आम्ही जेव्हा लहानपणी आश्रमात पूजा सांगण्याची शिक्षा घेत होतो, तेव्हा आम्हाला आठ-आठ तास मांडी घालून बसायला लागायचं!" तेव्हा, 'शिक्षणाला 'शिक्षा घेणं' का म्हणतात' हे कळण्यासाठी तुम्ही इंजिनियरिंगच केलं पाहिजे असं काही नसतं, हे मला पटलं! एका कुठल्यातरी पूजेला तर मधे होमपण पेटवला होता. घरात सगळीकडे नुसता धूर! त्यामुळे पायाला मुंग्या आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय अशी माझी अवस्था झाली होती! मी गुरुजींना विचारलं, "काय हो, पायाच्या मुंग्या जायला हा धूर केलाय का?"! त्यावर त्यांनी क्षणभर डोळे मोठे केले, मग लगेचच स्मित हास्य पण केलं. पण हे सगळं करताना तोंडाने मंत्र म्हणायचे काही ते थांबले नव्हते!

ह्या सगळ्या पूजा चालू असताना मी आणि आई-वडिलांनी अगणित वेळा आचमन केलं असेल! गुरुजी "ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः..." म्हणायला लागले की छोट्याश्या पळीने तीन वेळा पाणी प्यायचं आणि एक वेळा ताम्हणात सोडायचं, असा तो उपक्रम असतो. दर दोन मिनिटांनी गुरुजींचं "ओम केशवाय नमः.." सुरु व्हायचं, आणि आम्ही निमुटपणे पाणी प्यायचो. त्यात घरात काही जीवांची लुडबुड सुरु असायची. कोणी पंचा आणून देतंय, कोणी तांब्यात पाणी, कोणी आंब्याची डहाळी, कोणी सुट्टे पैसे, तर कोणी सुपाऱ्या. स्वयंपाकघरात पूजेच्या जेवणाची तयारी चालू असायची. त्यातही काही जीवांची लुडबुड! 'या शुभ कार्यासाठी माझा हातभार लागतोय' ह्यातच सगळ्यांना आनंद वाटत होता.. गुरुजींना मी अमेरिकेला शिकतोय हे कळल्यावर माझी दया आली! आता ह्याच्या नशिबात अजून किती पूजा असतील कोण जाणे! असा विचार त्यांच्या मनात आला असावा. पूजा संपल्यावर त्यांनी "आपण आत्ता ही पूजा का केली माहितीय का?" असं मला विचारलं, आणि आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या पूजांचे अर्थ सांगायचा त्यांच्या परीने प्रयत्न केला..

सगळ्या गुरुजींच्या हातात HMT चं एकाच model चं एक जुनं घड्याळ असतं! मला या गोष्टीचं नेहेमी आश्चर्य वाटत आलंय. मी आमच्या गुरुजींना त्याबद्दल विचारलं, तेव्हा कळलं, की गुरुजी जेव्हा पूजा सांगण्याची शेवटची परीक्षा पास झाले तेव्हा त्यांना बक्षीस म्हणून कोणीतरी हे घड्याळ दिलं होतं आणि त्याचा त्यांना खूप अभिमान होता. यावरून माझ्या लक्षात आलं, की आत्तापर्यंत मी पाहिलेले सगळे गुरुजी साधारण एकाच वयाचे होते. त्यामुळे ते सगळे जेव्हा 'graduate' झाले असणार, तेव्हा कदाचित 'पूजा सांगणे' या communityत HMT च्या या घड्याळाची fashion असणार! पूजा संपल्यावर मी गुरुजींना वाकून मनापासून नमस्कार केला आणि लग्नासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले..

लग्नाचा हॉल तर बूक झाला होता. पण लग्नाच्या चार-पाच दिवस आधी जेवणाचा बेत पक्का करायला त्या हॉलवाल्याला भेटायचं होतं. त्याने प्रत्येक गोष्टीसाठी एवढे पर्याय देऊन ठेवले होते की, ते पर्याय तुम्हाला, हवं तसं जेवण निवडण्यासाठी नव्हे तर तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठीच दिले असावेत असं वाटावं! 'अळू भाजी की रस्सा भाजी?', 'पंजाबी भाजी घेणार का? असलात तर मटार पनीर का पनीर बटर मसाला?', 'मटकीची उसळ का बटाट्याची भाजी? त्यात बटाट्याच्या भाजीचे तीन प्रकार असतात! त्यातला कुठला?', 'भजी का बटाटेवडे? भजी कोणती घेणार?', 'साधा भात, मसाले भात का पुलाव?', 'स्वीट डीश मध्ये श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, गाजर हलवा, जिलबी, सीताफळ रबडी, बासुंदी, रसमलाई आहे..', 'मठ्ठा घेणार का?' 'मग शेवटी आईस्क्रीम ठेवायचं का? कुठलं...?'! एवढे प्रश्न कोणी विचारले की मला करियर गायडन्ससाठी आलेल्या होतकरू तरुणांची आठवण होते. 'सायन्स, कॉमर्स का आर्टस?' इथपासून सुरुवात करून पुढे 'इंजिनिअरिंग का मेडिकल? मग त्यात कुठल्या ब्रान्चेस? बी.एस.सी, बी,बी,ए, बी.सी.ए, बी.फार्म,....' इत्यादी जगातल्या तमाम करियर ऑप्शन्सपैकी काय निवडू, असं विचारलं तर वैतागून 'तुला काय हवं ते निवड बाबा!' असंच आपल्याला सांगावसं वाटतं! पण आपण जसं न कंटाळता, त्याच्या आवडी निवडी जाणून घेतो आणि मग त्याला एक -दोन पर्याय सुचवून पाहतो, तसंच आपण त्या हॉलवाल्याला आपल्या एक-दोन आवडी-निवडी सांगून म्हणतो की आता तुम्हीच सुचवा, आणि त्यालाही तेच हवं असतं! त्याची पहिली दोन-तीन वाक्य अशी असतात की, "एक सुचवू का? सीताफळ रबडी किंवा बासुंदी वगैरे कशाला ठेवताय? त्याने एक तर ताटाची किंमत वाढते आणि ती खूप खाल्लीपण जात नाही! लोकांनी कसं तृप्त होऊन जेवलं पाहिजे. आणि आम्ही ताटानुसार किंमत लावतो. त्यामुळे कितीही जेवलं तरी काही हरकत नाही.." हे असं बोलल्यावर मग "तो विकायला बसलाय का विकत घ्यायला?' असा आपल्याला प्रश्न पडतो! मग पुढे तो, "हल्ली गाजर हलवा आणि आईस्क्रीम खूप हिट कॉम्बिनेशन आहे. पंजाबी ठेवणार असाल तर मटार पनीर ठेवा. मटार चा सिझन असल्यामुळे अगदी कोवळे आणि मस्त मटार आहेत बाजारात..!" खरं म्हणजे तेव्हा गाजर आणि मटार दोन्हीचा सिझन असतो. त्यामुळे त्याला अश्या गोष्टींवरच जास्तीत जास्त नफा कमावता येतो. पण हे आपल्याला सांगताना तो सांगतो की 'लोकं तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील!' आपल्याला त्याच्यात एका नारायणाची झलक दिसून येते आणि आपण चक्क त्याचं सगळं ऐकतोही..!

लग्नाला गुरुजी वेगळेच होते. 'आमचेच गुरुजी घ्यावे लागतील' असा हॉलचा हट्ट होता. हे म्हणजे 'बाहेरून खाद्यपदार्थ आणून प्रेक्षागृहात खाऊ नयेत. इथे मिळणारे पदार्थच घ्यावे लागतील.' अश्यातला प्रकार होता! लग्न लागणं सुरु झालं, तेव्हा गुरुजी, फोटोग्राफर आणि व्हिडियो शूटिंगवाला, ह्यांच्यातली केमिस्ट्री बघून मला ते तिघं एकमेकांचे अगदी कट्ट्यावरचे मित्र वाटले! लग्न सभागृह लोकांनी खच्चून भरलं होतं. त्यातही मी विधीचे सगळे मंत्र एकाग्रतेने ऐकून मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होतो. मला ती प्रसन्नता अनुभवायची होती. कुठलातरी मंत्र म्हणून झाला आणि गुरुजी म्हणाले, "आता वधूला मंगळसूत्र घाला.." माझं मन क्षणभर गलबललं. मी मनाला खात्री पटवून दिली, की 'हो, आयुष्यातला 'तो' खास क्षण आता आलाय.." मी ते मंगळसूत्र अलगद उचलून हळुवार तिला घालायला गेलो. तेवढयात गुरुजी म्हणाले, "थांबा. तसेच थांबा! समोर बघा. हसा. एक फोटो घ्यायचाय!" शांत सुखाची झोप लागली असताना कर्कश्य गजराने मला जाग आल्यासारखं वाटलं! माझ्या 'त्या' खास क्षणाला त्यांनी क्षणार्धात साधं करून टाकलं होतं. कारण काय तर म्हणे 'लग्नाचे फोटो'! गुरुजी असं सांगतात का कधी, की 'आता फोटोला पोज द्या!'? राग आलेला असतानाही प्रसन्न हसायचा प्रयत्न मग मी त्या फोटोत केला!

लग्न लागून लोकांनी जेवायला सुरुवात केली की वधू-वराचा एक खास फोटोसेशन असतो. त्यात वधू-वर फोटोग्राफर आणि शूटिंगवाल्याबरोबर एका खोलीत जमतात आणि तिथे त्या दोघांचे अतिशय फिल्मी फोटो काढले जातात! माझं नशीब म्हणायचं की माझ्या बायकोने त्यांना स्पष्ट सांगितलं की, एकही 'फिल्मी' फोटो काढायचा नाही! त्यामुळे मी पहिल्यांदा आनंदाने फोटो काढून घ्यायला तयार झालो! आम्ही छान हसत उभे राहिलोय बघितल्यावर तो फोटोग्राफर फटाफट आमचे फोटो काढायला लागला. त्यावर त्या शूटिंगवाल्याने त्याला अडवत म्हटले, "अरे थांब की. आधी 'स्माईल चेक' कर!". तोही लगेच "हो, हो." म्हणत थांबला. आम्हाला दोघांना त्याने 'चीज' म्हणायला सांगितलं आणि मगच फोटोसेशन पुन्हा सुरु झालं. हा 'स्माईल चेक' काय प्रकार असतो असं विचारल्यावर आम्हाला कळलं की अशाच कुठल्याश्या लग्नात सगळे फोटो काढून झाल्यावर त्यांना समजलं होतं की त्या नवऱ्या मुलाचा एक कोपऱ्यातला दात किडला आहे! त्यामुळे त्यांना ते सगळे फोटो 'फोटोशॉप' मध्ये एडीट करायला लागले होते! आमचं 'स्माईल चेक' झालं आणि मगच आम्हाला लग्नाच्या फोटोंत दिलखुलास हसायची मुभा मिळाली!

लग्नात अजून एक मजेशीर प्रकार असतो. लग्न लागल्यावर लोकांनी वधू-वराला भेटायला, त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद द्यायला स्टेजवर यायचं असतं. त्यासाठी नवरा-बायको कपडे बदलून येतात. आम्ही कपडे बदलून जेव्हा स्टेजवर पोहोचलो, तेव्हा आम्हाला भेटण्यासाठी एक मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग लागली होती! दुपारचा मुहूर्त असल्यामुळे बहुतेक सगळी लोकं हाफ-डे घेऊन, नाहीतर त्यांच्या जेवणाच्या सुट्टीत आली होती. त्यामुळे त्या घाईत शुभेच्छा देण्यासाठी लोकं अक्षरश: आमच्यावर तुटून पडली. खरं तर त्यातल्या निम्म्या-अधिक लोकांना आपण ओळखत नसतो! कोणीतरी लांबचे नातेवाईक, ज्यांना आपण लहानपणी भेटलोय, ते आता इतक्या वर्षांनी आपल्याला भेटत असतात! आमचे आई-वडील होते आमच्या मदतीला, पण लोकांची रांग इतक्या जोरात पुढे सरकत होती, की त्यांचीही त्रेधा तिरपीट उडाली होती! भेटणाऱ्या प्रत्येकाची ओळख करून देणं अपेक्षित असतं, आणि ती झाली की दोघांनी वाकून नमस्कार करायचा असतो. समोरच्या व्यक्तीला ओळखणं, त्याची ओळख सांगणं आणि त्याच्या पाया पडून पुन्हा पटकन पुढच्या व्यक्तीची ओळख करून द्यायला उभं राहणं हे वाटतं तितकं सोपं नसतं! तिथे माझ्या बायकोने तर एका बाईची चक्क चुकीची ओळख सांगितली! "अरे, ही माझी ती बंगलोरची काकू..". त्यावर त्या बाई पटकन म्हणाल्या, "ए मी काही तुझी काकू नाही ग. मी तुझ्या आईबरोबर त्या पौड फाटा ब्रांचमध्ये होते!". त्यामुळे आम्हाला फारच ओशाळायला झालं! पण त्या रांगेच्या वेगाने ती काकू/मावशी आपोआप पुढे ढकलली गेली, आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला! भेटायला आलेल्या जवळपास प्रत्येकाला आम्ही वाकून नमस्कार करत असल्यामुळे जणू नमस्कार करायची सवयच लागून गेली होती. मी त्या ओघात समोर कोण आहे हे न बघता वाकलो आणि एका ११-१२ वर्षाच्या मुलीला चक्क वाकून नमस्कार केला! नमस्कारासाठी खाली वाकल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी गोंधळ केलाय! त्यामुळे सारवासारव करायला मी तसाच वाकून उभा राहिलो. त्या मुलीला पुढे जाऊन दिलं. पुढचे येणारे पाय जरा प्रौढ गृहस्थाचे वाटले. त्यांना नमस्कार केला आणि मगच वर येऊन बघितलं की आपण नुकताच नक्की कोणाला नमस्कार केलाय ते..! मी उठून उभा राहिलो तेव्हा शूटिंग वाला माझ्याकडे बघून हसत होता! त्याने माझी फजिती बघितली होती. पण नंतर 'तू अजिबात काळजी करू नकोस. मी छान एडीट करीन." असे भाव त्याने चेहेऱ्यावर आणले आणि त्यातूनही एक नारायण डोकावला!

जशी आमची मजा येत होती, तशी ती भेटायला येणाऱ्या लोकांचीही येत होती! लोकं आम्हाला भेटायला समोर आले की शूटिंगवाला त्याचा तो प्रकाशझोत आमच्या अंगावर टाकायचा. त्यामुळे लोकांना 'हे सगळं रेकॉर्ड होतंय..' आणि इतकंच नव्हे तर 'हॉलमधला प्रत्येक माणूस आत्ता माझ्याकडेच पाहतोय!' असं वाटायला लागायचं! त्यांच्या अंगातली सहजता क्षणार्धात गायब व्हायची आणि मग उरायची ती फक्त गम्मत! काही नुसत्याच ओळखीच्या लोकांनी मला अगदी जीवश्च-कंठश्च मित्र असल्यासारखी कडकडून मिठी मारली! काही लोकं 'काय बोलायचं' हे ठरवून आल्यासारखी वाटली! पण गंमत म्हणजे त्यांना तिथे आल्यावर लक्षात यायचं, की भेटायला वेळ खूप कमी आहे. त्यात मागचा माणूस त्यांना हळूच पुढे ढकलत असायचा! मग ठरवलेलं संक्षिप्त स्वरुपात करून ते बोलताना त्यांचा जो काही गोंधळ उडत होता, विचारू नका! काही लोकं मस्त हस्तांदोलन करायला हसत पुढे यायची आणि मग त्यांच्या लक्षात यायचं की आधीच्या ग्रुपचा फोटो राहिलाय. मग त्यांना ओशाळत मागे जावं लागायचं. माझ्यावर त्यावेळी होणाऱ्या आनंदाच्या वर्षावातही मला ते बिचारे वाटायचे. मग जेव्हा त्यांची भेटायची वेळ आली, तेव्हा मी त्यांना एकदम कडक हस्तांदोलन तरी केलं नाहीतर नमस्कार करताना एक-दोन क्षण जास्त वेळ वाकून नमस्कार चालू तरी ठेवला! मी पूजेच्या वेळी जितक्या वेळा आचमन केलं असेल, तितक्याच वेळा आम्ही लोकांना वाकून नमस्कार केला असेल! नंतर एक दिवस मला 'मी आचमन करत बसलोय आणि नंतर आम्ही दोघं लोकांना वाकून नमस्कार करतोय.' असं स्वप्नही पडलं होतं!

लग्नात 'ओटी भरणं' हा एक प्रकार असतो. त्या खणाचा, नारळाचा आणि मुठभर तांदळाचा खरंच काही उपयोग असेल, तर तो म्हणजे त्याने दुसऱ्या बाईची ओटी भरता येते! लग्नानंतर आम्ही एका देवीला गेलो होतो. देवीची ओटी भरायला! तिथे बाहेर पूजेचं साहित्य मिळायचं एक दुकान होतं. तिथून ओटीचं साहित्य असलेलं तबक आणि देवीसाठी साडी घ्यायची आणि आत देवळात जाऊन, देवीचं दर्शन घेऊन तिला द्यायची, असा तो प्रकार. तिथे मंदिराचे गुरुजी बसले होते. आत चार पाच मोठी पोती होती. आपलं दर्शन घेऊन होईपर्यंत ते गुरुजी नारळ नारळाच्या पोत्यात टाकायचे, तांदूळ तांदळाच्या, खण खणांच्या आणि साडी साड्यांच्या! आणि छोट्याश्या साखर फुटाण्यांची पुडी आपल्याला देवीचा प्रसाद म्हणून द्यायचे! म्हणजे दिवस संपला, की ते पोत्यातलं सगळं साहित्य पुन्हा दुकानात जायचं, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते भक्तांना विकलं जायचं. ह्याच्या इतका नफा मिळवून देणारा धंदा जगात दुसरा कुठला नसेल!

'लग्न' या उत्सवाचा सगळेजण आपापल्या परीने आनंद साजरे करत असतात. वर आणि वधू हे जरी या उत्सवाचं मुख्य आकर्षण असलं, तरी लग्नात यापेक्षा अजून बरंच काही असतं! लग्नाच्या दिवशी सभागृहात वयाने थोड्या लहान, म्हणजे लग्न न झालेल्या मुली एकमेकींच्या साड्यांकडे बघत होत्या. एकमेकींचं कौतुक करत होत्या. साड्या नेसायचे प्रसंग त्यांच्यासाठी विरळंच! लग्न न झालेली मुलं त्यांचे भावी जोडीदार शोधण्यात मग्न होते! नुकत्याच लग्न झालेल्या बायका इतर बायकांच्या अंगावरचे दागिने बघत होत्या. आणि जवळपास त्यांचे नवरे असले तर, "मला पुढच्या वेळी कसा हार हवाय माहितीय का..?" असं म्हणून कुठल्यातरी बाईचा हार दाखवत होत्या! आमच्या आत्या, काकू, मावश्या, माम्या सासरकडच्यांची उणी-दुणी डोळ्यात तेल घालून शोधात होत्या! तर आम्हा दोघांच्या आई-वडिलांना अगदी भरून पावल्यासारखं वाटत होतं! पण पुरुष मंडळींचे उत्सव इतर दिवसांपेक्षा काही वेगळे नसतात. बरीचशी पुरुष मंडळी त्याही दिवशी एकमेकांशी क्रिकेट नाहीतर राजकारण ह्या विषयांवर बोलत असावीत, हे मी खात्रीने सांगू शकतो!

लग्नानंतर मुलगी जेव्हा माप ओलांडून पहिल्यांदा घरी येते तेव्हा आमच्याकडे साखर वाटण्याचा कार्यक्रम असतो. मोठ्यांचे शुभाशीर्वाद मिळण्यासाठी नवीन जोडपं सगळ्यांना साखर वाटतं. 'तोंड गोड करा आणि आम्हाला भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या' असा त्याच्या मागचा विचार असतो. त्यावेळी मग प्रत्येक जण अडवतो. "आधी 'नाव घ्या' मगच साखर घेईन आणि आशीर्वाद देईन." असं त्याचं म्हणणं असतं. प्रत्येकासाठी वेगळं नाव घेतल्याने प्रत्येकालाच विशेष मान मिळाल्यासारखा होतो आणि मग तो खुश होतो. आम्ही साखर वाटत असताना नातेवाईकांच्या डोळ्यातलं खरंखुरं कौतुक मला दिसलं. सगळ्यांनी आम्हाला अगदी मनापासून आशीर्वाद दिले. खरं तर त्या दिवशी त्या खोलीत असलेल्या प्रत्येकानेच आधीचे काही दिवस जे कष्ट घेतले होते, त्यानेच आमचा लग्न सोहळा सुरळीत पार पडला होता. आम्हाला दोघांना कधीच दडपण आलं नाही, कार्याची जबाबदारी जाणवली नाही आणि त्यामुळेच आम्ही ह्या लग्नकार्याचा मनापासून आनंद घेऊ शकलो. त्या खोलीतल्या प्रत्येक माणसात एक नारायण आहे ह्याचा मला तेव्हा साक्षात्कार झाला. एवढ्या नारायणांचं प्रेम एकाचवेळी लाभल्याने आम्ही दोघं भरून पावलो. अचानक मला त्या सगळ्यांचा मोठा ऋणी झाल्यासारखं वाटलं.. आणि या संपूर्ण सोहळ्यात दडपणमुक्त वावरणाऱ्या मला त्यावेळी पहिल्यांदा कसलंतरी दडपण जाणवलं...