Saturday, April 24, 2010

Bio-Tech

माणसाला चाकाचा शोध लागला आणि तिथेच नियतीने प्रगतीचा गिअर टाकला! तिथे जो गाडीने वेग पकडलाय, तो आजतागायत वाढतोच आहे.. तेव्हा गाडीतून जाताना माणसाने झाडावरचं सफरचंद तोडलं आणि आज त्याच हातात ‘Apple’ चा ‘i-phone’ आहे! पण या जगात माणूसच फक्त सजीव नाहीये. माणसाची ही तुफान प्रगती कदाचित प्राणी, वनस्पती आणि कीटकांना समजण्याच्या पलीकडची होती...!

या प्रगतीने कित्येक प्राणी निराश झाले असतील. सुतारपक्षी, ज्याला आपल्या धारदार चोचीचा अभिमान असतो, त्याने एक दिवस माणसाला ‘Electric cutter’ ने झाड तोडताना बघितलं असेल आणि त्याच्या मनात inferiority complex तयार झाला असेल. जिराफाने कधी अवाढव्य क्रेनला बघितलं असेल आणि आपल्यापेक्षाही उंच ‘प्राण्याला’ बघून तो खट्टू झाला असेल. फुलांचंही तसच काहीसं झालं असेल. एखादी तरुणी perfumeची बाटली अंगावर फवारून बाहेर जायला निघाली असेल आणि त्या artificial chemicals चा एवढा घमघमाट पसरला असेल की रस्त्यातल्या जाई, मोगरा, रातराणी अगदी हिरमुसल्या असतील बिचाऱ्या..!

माणसाने जेव्हा बंदुकीने वाघाची शिकार करायला सुरुवात केली, तेव्हा वाघाला कळलंच नसेल की आपण कशाने मरतोय! एकदा दोन वाघ असे जंगलातून चालले असतील. त्यातला एक वाघ माणसाला बघून त्याच्या अंगावर धावून गेला असेल आणि माणसाने त्याला गोळी घालून ठार केलं असेल. हे सगळं तो दुसरा वाघ लांबून बघत असेल. त्याला बंदूक म्हणजे काय, ते कळलं नसेल. पण त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं असेल की तो ३ पंजांचा माणूस होता आणि त्याने त्याच्या मधल्या पंजाचं नख फेकून आपल्या मित्राला मारलं! आणि मग तेव्हापासून वाघांच्या समाजात बछड्यांना तयार करताना हे शिकवलं जात असेल की ‘दोन पंजांचा माणूस असेल तरच हल्ला करा. ३ पंजांच्या माणसासमोर आपला टिकाव लागणं शक्य नाही..!’ डासांनाही ‘Good Knight’ चा शोध लागल्यापासून त्यांच्या संस्कारात एका शिकवणीची भर घालावी लागली असणार. ते पिल्लू डासांना शिकवत असतील की ‘जरा विवेकबुद्धीचा वापर करत जा. छान वास आला म्हणून तिकडेच गुणगुणत बसू नका!’ आणि डासांमधला ‘Murphy’s Law’ असेल..’जेव्हा शिकार शांत झोपलेला असतो आणि सुगंध दरवळत असतो तेव्हाच काहीतरी विपरीत घडायची तयारी चालू असते.’!!

पण फक्त निराशा आणि सावधानतेच्या पलीकडेही खूप गंमत-जंमत झाली असेल. एका teenager कबुतर तरुणीला जेव्हा पहिल्यांदाच विमान दिसलं असेल तेव्हा ती उडत जाऊन तिच्या आईला म्हणाली असेल, “आई, तू म्हणाली होतीस बघ, गरुड हा पक्षांचा राजा असतो..तो खूप देखणा आणि ताकदवान असतो..आज मी त्याच्याहून राजबिंडा आणि शक्तिशाली पक्षी पाहिला..!” आणि मग ती त्याचं वर्णन करण्यात रमून गेली असेल..! त्यानंतर कदाचित कित्येक पक्ष्यांनी ‘राजबिंड्या तरुणावर’ line मारायला म्हणून त्याच्या जवळ जाऊन प्राण गमावले असतील..

एका घरातली मुंगी, दुसऱ्या घरातल्या मुंगीला म्हणाली असेल, “तुम्ही कशा गं एवढं maintain करता? कमाल आहे बाई तुमची!” त्यावर दुसरी मुंगी म्हणाली असेल, “अगं आमच्या मालकिणीने साखर बदललीय. आता ती ‘sugarfree’ साखर वापरते! मग आम्हीपण तीच खातो. त्याने वजन नाही वाढत. तुला हवी असेल तर एक दाणा देते मी. चांगला महिनाभर पुरतो..!”

झेब्र्याने कधी झेब्रा-क्रॉसिंग बघितलं असेल, तेव्हा त्याला वाटलं असेल की तिथे आपला मित्र झोपलाय! त्याने खूप वेळा त्याला उठवायचा प्रयत्न केला असेल..आणि मग सिग्नल सुटल्यावर जेव्हा भरदाव वेगाने गाड्या त्यावरून गेल्या असतील तेव्हा ‘त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असेल’ असं समजून त्या बिचाऱ्याने शोक व्यक्त केला असेल..!

मेंढ्यांचा कळप जाताना तिथे एक लहान मुलगी लोकरीचा स्वेटर घालून आपल्या आईबरोबर चालली असेल. त्यातल्या एखाद्या मेंढीला ते बघून वाटलं असेल, ‘अरे! हिच्या अंगावर पण लोकर? आपल्यातलीच कोणीतरी दिसतीय..!’ असं समजून ख्याली-खुशाली विचारायला म्हणून ती जवळ गेली असेल आणि त्या मुलीच्या आईने दगड मारून तिला हाकललं असेल..बिचारी मेंढी..आपल्या मैत्रिणींना म्हणाली असेल, “कलियुग आहे बघ. आजकाल ‘मेंढीसकीच’ राहिली नाहीये! जुन्या काळातल्या मेंढ्या किती प्रेमाने वागायच्या एकमेकींशी..!”

देवमासा मोठ्या जहाजाला बघून घाबरला असेल, मधमाश्या चुकून ‘artificial flowers’ वर मध मिळायच्या अपेक्षेने येऊन गंडल्या असतील, मांजराने चुकून computerच्या ‘mouse’वर झडप घातली असेल आणि सापाला प्रभुदेवा किंवा हृतिकचा डान्स बघून गंमत वाटली असेल!

वनस्पती विश्वातल्या गंमती-जंमतींनापण अगदी उधाण आलं असेल! काही आंबे पटकन पिकावेत म्हणून ‘artificial ripening’ पद्धतीने त्यांना पिकवलं असेल आणि त्यांना बघून त्यांचे मित्र घाबरले असतील! मग आंब्यांच्या विश्वात theories मांडल्या गेल्या असतील. कुणाचं म्हणणं असेल की त्यांना ‘अकाली वृद्धत्व’ आलंय. मग काहीजणांना ‘पा’ सिनेमा आठवला असेल! आंब्यांमधला Einstein तर म्हणाला असेल, “आपण नक्कीच ‘Speed of light’ पेक्षा जास्त वेगाने जाऊन आलोय. ‘time lag’ झालाय मित्रांनो! म्हणूनच आपण तेवढेच राहिलोय आणि ह्यांची वयं वाढलीयत..!!

गुलाबाचं वेगळ्याच रंगाचं कलम बघून ‘बाबा लाल गुलाब’ ‘आई लाल गुलाबाला’ त्या दुसऱ्यांच्या पोराकडे बघून म्हणाले असतील, “बघितलंस ते? हे असं होतं आंतरजातीय विवाह केल्याने! पोरांवर संस्कार केले नाहीत की हे असं बघायला मिळतं!” पण गुलाबातले अब्दुल ‘कलाम’ म्हणाले असतील, “आपण या ‘कलम’ पद्धतीचं स्वागतच केलं पाहिजे! ही मानवाच्या तंत्रद्यानाची झेप आहे..!”

Seedless द्राक्षांना हे कायमचं दु:ख असेल की आपण कधी आई होऊ शकणार नाही! ‘कापा फणस’ ‘बरक्या फणसाला’ म्हणाला असेल, “लोकं भाजी करतील तुझी एक दिवस. ते शिजवतील तुला. तयारी ठेव. मी तुला आधीच सांगितलंय ‘बरंका’!” आणि केळी केळफुलाला म्हणाली असतील, “Don’t be fool! आम्हाला कच्चं खाल्लं तरी केळफुलाची भाजी खूप ‘tasty’ असते! त्यामुळे तू भी गया रे..!”

पण ही गंमत-जंमत, हे रुसवे-फुगवे, ही सुखं-दु:खं अजून काही वर्षांतच संपून जातील. भारतातल्या चिमण्यांनी factoryच्या चिमणीतून येणाऱ्या धुरामुळे कधीच देश सोडलाय. वाढत्या प्रदूषणामुळे त्या लवकरच जगही सोडतील. आता वाघासमोर येणारा प्रत्येक माणूस ३ पंजांचा असतो. आणि त्या वाघाने हल्ला केला नाही तरी त्याला प्राणाला मुकावे लागते. त्यांचीही संख्या दिवसेंदिवस कमी होतीय. आणि हे सगळं मेंढ्यांची मेंढीसकी कमी होतीय म्हणून नाही, तर माणसाची माणुसकी कमी झालीय म्हणून होतंय..
कोण जाणे, अपरिमित वृक्षतोड होऊन त्या जागी कॉंक्रीटचं जंगल झाल्यामुळे पृथ्वी विचार करत असेल की ‘माझे पूर्वीचे मऊ, मुलायम केस आता खूप राठ झालेत. एकदा शाम्पू लाऊन ते खसाखस धुतले पाहिजेत.’ आणि म्हणूनच ज्वालामुखी आणि विनाशकारी महापूर येऊ घातले असतील...


(आमोद आगाशे आणि सुशांत खोपकर यांच्या 'विनोदाची चादर' या लेखमालेतला हा दुसरा लेख)

Thursday, April 22, 2010

आई

आई..

तो तांदूळ काही वेगळा नसतो,
तूरडाळपण तीच असते.
भूकेचाही प्रश्न नसतो खरंतर,
ती तुझ्या हाताचीच चव असते.


घरासारखं घर असतं ते,
त्याला चार भिंती आणि एक छप्पर असतं.
पण त्याची ओढ आणि त्यातली प्रसन्नता,
याला कारण तुझंच अस्तित्व असतं.


मी काढलेलं चित्र जेमतेमच असतं खरं म्हणजे,
मी केलेली कवितापण ठीकच असते.
पण त्यावेळी मी मोठा कलावंत असतो आणि,
तुझ्या डोळ्यातलं कौतुक, ही त्याचीच पावती असते.


दृष्ट काढून काही होत नसतं आई,
ती केवळ अंधश्रद्धा असते.
पण तरीही मी सुरक्षित राहतो,
कारण त्यावर तुझी श्रद्धा असते.


घरी कधी वाद होतात तर कधी भांडणं,
प्रत्येकाचाच ‘मी’पणा अधून-मधून डोकावतो.
पण तरीही नाती घट्ट राहतात,
कारण आमच्या ‘मी’पणाला देखील तुझाच लळा असतो!


कुणीच कुणाचं नसतं ग इथे,
प्रत्येक जण स्वतःमधे बुडलेला असतो.
पण एकटेपणा जाणवत नाही कधी बघ.
आई, तुझं प्रेम हा खूप मोठा आधार असतो..

Saturday, April 3, 2010

तत्वज्ञान

• शिऱ्या तुला खरं सांगू..काही अर्थच राहिला नाहीये बघ आयुष्याला! जखडून गेलोय बघ आपण सगळीकडून. काही मनासारखं करताच येत नाही..नाही करायचंय Engineering! अगदीच नाही..पण मग प्रतिष्ठित career कुठून होणार? पैसा कुठून मिळणार…
* मग का आलास Engineering ला? नव्हती आवड, तर नाही यायचं इकडे..
• वाह बेटा शिऱ्या! जसं काय तू तुझ्या आवडीने आलायस इकडे. हातात Screw Driverच घेऊन जन्माला आला होतास ना तू! ऊSSऊSS करत रडण्याऐवजी स्क्रूSSस्क्रूSS करत रडला होतास! आणि स्वतःचाच पाळणा dismantle करायला निघाला होतास ना! काय बोलतोयस..
मला सांग, महाराष्ट्रात दर वर्षी किती मुले १२ वी देत असतील?
* काय माहिती..
• आकडा कितीपण असू देत. त्यातली ८०% मुलं तरी Engineering किंवा Medical CET देतात. बरोबर?
* बरोबर.
• मला सांग, जगात एवढ्या fields आहेत. निसर्ग या एवढ्या सगळ्या मुलांना Engineering किंवा Medical मधेच आवड आणि गती देतो का? निसर्गाला कळतं होय, या fieldsमधे scope जास्त आहे म्हणून..? सालं झूठ आहे सगळं! सगळ्या बाता साल्या...सगळ्यांना कागदावरचे गांधीजी हवेत आणि नंतर जॉर्ज वॉंशिंग्टन!
* खरं आहे तुझं..
• अरे जगात खूप चांगली कामं आहेत. जी करायची गरज आहे. मला समाजकार्य करायला आवडतं..भारतात किती मागासलेली, गरीब खेडी आहेत. त्यांचा विकास करता येईल. हे किती चांगलं कार्य आहे.. गरज आहे देशाला त्याची. पण याला Commercial aspect शून्य आहे. उद्या जायचो मी खेडयापाड्यांचा विकास करायला, खाण्यापिण्याची बोंब व्हायची माझ्या आणि त्या खेडयातच कायमचं राहायची वेळ यायची माझ्यावर!
या उलट Computer field बघ. १९९० च्या आधी आम्हा सगळ्या Engineersचे interest Mechanical किंवा Civil Engineering होते. आणि त्यानंतर आता सगळ्यांची आवड Computer Engineering झालीय..! शिऱ्या तुला सांगतो..एकवेळ कोड झालेली मुलगी सून म्हणून स्वीकारतील लोकं, पण coding येत नसेल तर आजकाल कुत्रही विचारात नाही तुम्हाला! का असं?
* आणि हे आयुष्यातलं मोठं 'कोडं'च आहे! नाही का?
• तुला jokes सुचतायत शिऱ्या?
• अरे लेका विचार कर, जर आवडीचं काम नाही मिळालं करायला, तर पोटापाण्यासाठी राबणं म्हणजे गुरा-ढोरांसारखंच झालं की रे! निम्मं आयुष्य जाईल आपलं ऑफिसात, जे आवडत नाहीये, तेच करत बसण्यात! काही अर्थ आहे का रे?
* अरे, मग जे काम मिळालंय ते आवडीने करूयात ना..
• म्हणजे compromise! ना? मनाची समजूत घाला स्वतःच्या. अरे किती फसवायचं स्वतःला सांग. ही शाळेतली लहान मुलं टप्पाटप आत्महत्या करतायत ना.. काही उगाच नाही रे..त्यांना कळलं की नाहीये आयुष्याला काही अर्थ आणि त्यांना compromiseही करायचं नव्हतं. म्हणून ‘Give me some sunshine’ म्हणत म्हणत गेली बिचारी..
* छ्या सौऱ्या काहीतरीच.. अरे ‘I want to grow up once again’ असं म्हणायला काही अर्थ तरी आहे का? आधी एकदा तरी grow व्हा, againचं पुढे बघू की! तुला आत्महत्या हा option वाटतो?
• नाही रे! मुळीच नाही..लढूयात की! पण प्रवाहाबरोबर नाही जायचंय बघ. प्रवाहाबरोबर जाणं खूप सोपं असतं रे..नुसतं तरंगायचं..प्रवाह नेतो बरोबर आपल्याला मग..ही जी सगळी career oriented लोकं आहेत ना, काय हवं असतं त्यांना..? Degree? मग छान नोकरी? छोकरी? गाडी..बंगला..भरपूर पैसा..सगळ्या सुखसोयी..पण पुढे काय? What Next? आत्तापर्यंत हजारो,लाखो लोकांनी हे सगळं कमावलं असेल..पण is that it? घाम गाळून हे सगळं कमवून श्वास सोडून द्यायला आहे हे आयुष्य? काय अर्थ आहे रे...?
* का? तुला नकोय हे सगळं? आणि..छोकरी पण नकोय..??
• नाही, असं नाही रे! पण हे सगळं कमावणं हेच आयुष्याचं अंतिम ध्येय कसं असू शकतं..? आणि छोकरी म्हणालास तर आजकालच्या पोरी, तुला सांगतो शिऱ्या...अक्कल गहाण टाकून आल्यात देवाकडे! अरे, मुलगा कसा आहे, काही फरकच पडत नाही त्यांना! त्याच्याकडे भरपूर पैसा असेल, एकुलता एक मुलगा असेल, मोठया पोस्टवर असेल तर झाल्या एका पायावर तयार! माझी सानिया मिर्झा...शोएब मलिक?? तिची बुद्धी नक्कीच 'लिक' होत असणार बघ..!
* तुझी सानिया मिर्झा..?!
• माझी म्हणजे भारताची रे! 'भारत माझा देश आहे' म्हणतो ना..म्हणून माझी म्हटलं! आता खेळेल पाकड्यांकडून! देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे रे.. जागत नाहीत पोरी अस्मितेला आजकाल..आणि ती ‘B’ divisionची अस्मिता.. एवढं सगळं दिलंय देवाने..तिला तो 'बाल की दुकान' चिन्मय आवडला..?! जगात काय होतंय बघ रे शिऱ्या..!
* बरं...म्हणजे मुद्दा 'अस्मितेचा' आहे तर..अस्मिता चव्हाणचा!
• नाही रे शिऱ्या..तुला कळत नाहीये...मी सांगायचा प्रयत्न करतोय, की तू कुठूनही बघ. आयुष्याला काहीही अर्थ नाहीये..जन्माला आलो जगायचं..जा म्हटलं की जायचं..! खेळ मांडलाय नुसता..खेळ!
पण नाही शिऱ्या.. तो खेळसुद्धा अक्षय कुमार होऊन खेळायचा..
* अक्षय कुमार?
• खिलाडी रे! बासंच! अशी fight मारुयात ना..काहीतरी करूनच दाखवूयात! काय करता येईल रे? काय वाटतं...?
* खरं सांगू..?
• बोल ना..
* अभ्यास करूयात का..? उद्या पेपर आहे रे!
• काय रे शिऱ्या तू..?!
* बर मग बसू चर्चा करत..होऊ दोघं जणं नापास! चल बोलू आयुष्यावर..
• च्यायला १ तास झाला? १५ मिनिटंच ब्रेक घेतला होता ना..! शिऱ्या होईल का रे अभ्यास? मला जाम tension आलंय..अरे खूप वाजलेत रे..झोपुयात का? उद्या ४ वाजता उठून करू.. होईल ना..?!

~~~~~~~~~~~~~

• चल शिऱ्या बस मागे..
* काय रे, कसा होता पेपर?
• चांगला होता..झाला बघ एकदाचा..परीक्षा संपली..फार सुटल्यासारखं वाटतंय बघ.. ह्या Pulsar ची मजा काही औरच आहे! कसलं design आहे..खासंच! असं मस्त ८० चा speed..समोर मोठ्ठा मोकळा highway..लोणावळ्याचा रस्ता..आणि समोरून येणारा गारेगार वारा.. हा वारा म्हणजे, असं राजा चालताना समोर शे-सव्वाशे लोकं मुजरा करतात ना.. तसाच मुजरा घालतोय असं वाटतंय! ही life आहे बघ गडया...असं पावसाळी वातावरण..त्या टपरीवरची कांद्याची खेकडा भजी आणि वाफाळता चहा.. अहाहा! मज्जानु life!
* खरं आहे बघ! कसलीच फिकीर नाही! अरे, ती कालची चर्चा पुढे नेऊयात..? आयुष्यात काय करायचं वगैरे..
• करू रे..सावकाश करू..आत्ता डोक्याला कसला ताप नकोय बघ..आत्ताच परीक्षा संपलीय..आता फक्त enjoy करायचं...!!


'माणूस जेव्हा खराखुरा आनंदी असतो ना, तेव्हा त्याला तत्वज्ञान कधीच सुचत नसतं.. पण तेव्हाच नियती त्याला तत्वज्ञान सुचवायची तयारी करत असते..आणि म्हणूनच माणूस सतत आनंदी राहू शकत नाही.'- सुर्फी’s law